वादग्रस्त सीएएचे कौतुक : राष्ट्रपतींवर टीका

वादग्रस्त सीएएचे कौतुक : राष्ट्रपतींवर टीका

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे ‘ऐतिहासिक’ अशा शब्दांत कौतुक केल्याबद्दल का

बहुसंख्याकवादाच्या राजकारणावर विद्यार्थ्यांचा उद्रेक
‘दगडाला दगडाने व तलवारीला तलवारीने उत्तर’
प्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्‌टी

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे ‘ऐतिहासिक’ अशा शब्दांत कौतुक केल्याबद्दल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी प्रकट करत त्यांचा निषेध केला. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात राष्ट्रपिता म. गांधी यांच्या एका विधानाचा आधार घेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केल्याने म. गांधींची इच्छा पुरी झाली असे म्हटल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. विरोधक बेंच वाजवत होते. त्यातही राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरू ठेवले.

आपल्या भाषणात राष्ट्रपतींकडून सीएएवरून देशभर झालेल्या हिंसाचाराची सोयीस्कर दखल घेतल्यानेही विरोधक नाराज झाले होते. हिंसेने देश कमकुवत होतो. ‘नवा भारत’ घडवण्याच्या दृष्टीने या जनतेने या  सरकारला बहुमत दिले आहे. पण लोकशाहीच विसंवाद अटळ असतात त्याने ती समृद्ध होते असे ते म्हणाले. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत व भारतीय म्हणून आपली देशाप्रती कर्तव्य आहेत हे विसरता कामा नये, असे कोविंद म्हणाले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विरोध करणाऱ्या सदस्यांमध्ये बसणे पसंत केले. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या पहिल्या रांगेत बसले होते.

कोविंद यांनी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवण्याच्या संसदेच्या निर्णयाची तारीफ केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून स्वागत केले. ३७० कलम रद्द केल्याने या नव्या केंद्रशासित प्रदेशाला देशाला जे फायदे मिळत होते ते मिळतील असे ते म्हणाले. या दोन केंद्रशासित प्रदेशात विकासही मोठ्या प्रमाणात गती घेईल असा दावा त्यांनी केला.

दरम्यान शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व विरोधकांनी संसदेच्या आवारातील म. गांधी यांच्या पुतळ्यापाशी जमून भारत बचाओचे नारे दिले. सरकारच्या सर्व धोरणांना विरोध प्रकट करण्यासाठी १४ पक्षांचे सदस्य सेंट्रल हॉलमध्ये सर्वात मागच्या रांगांमध्ये बसले होते.

राष्ट्रपतींचे भाषण संपताच गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीताराम येचुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला. देशभरात सीएए व एनआरसीवरून आंदोलने व हिंसाचार होत असताना राष्ट्रपती याला सरकारची उपलब्धी म्हणत आहेत, हे लाजीरवाणे असल्याची प्रतिक्रिया गुलाम नबी आझाद यांनी दिली. जेएनयूमध्ये दिवसाढवळ्या चेहरे झाकून गुंड घुसतात, त्याला सरकारचा पाठिंबा असतो. देशातल्या भाजपशासित राज्यात ३१ जणांना सीएएच्या विरोधात आंदोलन केले म्हणून गोळ्या झाडण्यात येतात त्याचा उल्लेख टाळत राष्ट्रपती सरकारचे यश म्हणत असतील तर ते निषेधार्थ आहे, असे ते म्हणाले.

तर आनंद शर्मा यांनी आजचा दिवस देशाचा अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका केली. देशाचे विभाजन करण्याचे राजकारण सुरू असताना राष्ट्रपती त्याचे कौतुक करतात. या सरकारला राज्य घटनेचीच चाड नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: