बालगृहातील २०९ विद्यार्थी १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण

बालगृहातील २०९ विद्यार्थी १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण

मुंबई: राज्यातील बालगृहातील २०९ विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता १२ वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि स

औषधांच्या प्रायोगिक वापराबाबतचे नियम धाब्यावर!
सामाजिक एकजूटीचे सनदी सेवेतील मुस्लिम अधिकाऱ्यांचे आवाहन
मोदींच्या सुरक्षिततेला काँग्रेसकडून धोका: भाजप

मुंबई: राज्यातील बालगृहातील २०९ विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता १२ वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मात करता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या मुलांचे कौतुक केले आहे.

राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना (चाईल्ड इन कॉन्फ्ल‍िक्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते.

अनाथ, निराधार बालके, एक पालक असलेली, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त/बाधित बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले आणि प्रमाणित केलेले, शाळेत न जाणारे बाल कामगार आदींना बालगृहात ठेवले जाते. या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असे नाही तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येते हे या निमित्ताने बालगृहांमधील मुलांनी दाखवून दिले आहे. या विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची वृत्ती, हुशारी जोखण्याचे काम महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केले असून त्यांना अभ्यासाला प्रोत्साहित केले आणि या मुलांनी अविरत मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासाला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या २९० पैकी पुण्यातील बालगृहाच्या मुलीने एकूण ९०.६६ टक्के गुण मिळवत बालगृहातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

राज्यात पुणे विभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील बालगृहातील सर्वाधिक ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या क्रमांकावर मुंबई असून येथील ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. ८० ते ९० टक्के गुण मिळवलेले ३४ विद्यार्थी आहेत. ७० ते ८० टक्के गुण मिळालेले ८६ विद्यार्थी, ६० ते ७० टक्के गुण मिळालेले ६९ विद्यार्थी तर ६० टक्क्यांहून कमी गुण मिळवत उत्तीर्ण झालेले १८ विद्यार्थी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0