इराणमध्ये अडकलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण?

इराणमध्ये अडकलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण?

नवी दिल्ली : इराणमध्ये अडकलेल्या किमान २५४ भारतीय यात्रेकरूंना नोव्हेल कोरोना विषाणूमुळे होणारा COVID-19 आजार झाल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे, अस

नियमांची कडक अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री
राज्यात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही
कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द

नवी दिल्ली : इराणमध्ये अडकलेल्या किमान २५४ भारतीय यात्रेकरूंना नोव्हेल कोरोना विषाणूमुळे होणारा COVID-19 आजार झाल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे, असे इराणमधील कोम येथे अडकलेल्या यात्रेकरूंनी ‘द वायर’ला पाठवलेल्या नावांच्या यादीतून स्पष्ट झाले आहे.

“द वायर’ला मिळालेली यादी अधिकृतरित्या तयार केल्यासारखी वाटत आहे पण या यादीचे उगमस्थान स्पष्ट करणारी कोणतीही खूण त्यावर नाही. ही माहिती जर खरी असेल, तर करोना विषाणूची लागण झालेल्या भारतीयांचा आकडा सध्याच्या आकड्याच्या (भारतात ११३, परदेशात १७) तिप्पट होईल.

ही यादी दूतावासातील अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवरून पाठवली, असे कारगिलमधून यात्रेसाठी गेलेले शेख अली यांनी सांगितले. हीच माहिती कोममधील आणखी पाच जणांनी ‘वायर’ला दिली.

या यादीमध्ये नावे, पासपोर्ट क्रमांक आणि त्यांनी भारतात परत येण्यासाठी बुक केलेल्या तिकिटांचे पीएनआर क्रमांक आहेत. यादी २५४ जणांची असून, हे सर्व इराणमधील भारतीय यात्रेकरून आणि विद्यार्थी आहेत. ‘कोम कोविड पीओएस’ या नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमार्फत ही यादी यात्रेकरू व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आली आहे. याचे स्क्रीनशॉट्स ‘द वायर’कडे आहेत. या ग्रुपवर यादी पाठवणाऱ्या दूतावासातील अधिकाऱ्यांशी ‘वायर’ने संपर्क साधला असता, ते फॉरवर्डेड डॉक्युमेंट होते, असे सांगत स्रोत सांगण्यास त्याने नकार दिला.

कारगिल आणि लेह भागातून इराणमध्ये झियारतसाठी गेलेल्या सुमारे ८५० यात्रेकरूंची ६ ते १० मार्चदरम्यान करोना विषाणूसाठी चाचणी करण्यात आली. त्यांना तेहरानमधील भारतीय दूतावासात नेऊन त्यांचा नेजल स्वॅब घेण्यात आला. यापैकी ज्यांच्या चाचण्या पॉझिटिव आल्या त्यांची नावे व्हॉट्सअॅपवरून पाठवण्यात आली. यात्रेकरूंनी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत किंवा ते परत भारतात कधी येऊ शकतील याबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही, असे लेहमधील टूर ऑपरेटर असगर अली यांनी सांगितले. असगर अली यांनाही करोनाची लागण झाली आहे.

जयशंकर यांचे संसदेतील निवेदन

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या प्रयत्नांचा मुख्य भर यात्रेकरूंवर असेल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गेल्या आठवड्यात सांगितले होते. भारताने इराणला जाणा-येणाऱ्या सर्व फ्लाइट्स २६ फेब्रुवारीपासून बंद केल्या आहेत. यातील बहुतेक जण करोना विषाणूचा प्रसार सर्वाधिक असलेल्या कोम शहरात आहेत. त्यांच्या निवासाच्या स्वरूपामुळे संपर्काचा धोका वाढतो. वय हाही लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे, असे ते १३ मार्च रोजी म्हणाले.

भारताने सर्वप्रथम इराणमध्येच नमुने घेण्यासाठी वैद्यकीय पथक पाठवले होते. हे नमुने पुण्यातील नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये आणले गेले. भारतीय हवाई दलाच्या विमानातून गेल्या आठवड्यात इराणमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना भारतात आणले गेले. मात्र, यातील एक जथ्ता केवळ ५८, तर दुसरा ४४ यात्रेकरूंचा होता याबद्दल काही जणांनी नाराजी व्यक्त केली. काही यात्रेकरूंच्या कुटुंबियांची नावे परत आणावयाच्या यादीमध्ये नसल्याने त्यांनी येण्यास नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, इराणमध्ये करोनाची चाचणी पॉझिटिव आलेल्या भारतीय नागरिकांबाबत भारत सरकारने आजपर्यंत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यानंतर यात्रेकरू व विद्यार्थ्यांना संमिश्र फ्लाइट्समुळेही परत आलेल्यांची संख्या वाढली.

१६ मार्चपर्यंत एकूण ३८९ भारतीय इराणमधून परत आले. त्यांतील २०५ यात्रेकरू होते. इराणमध्ये करोनाची साथ पसरली तेव्हा सुमारे १,१०० यात्रेकरू तेथे होते, त्यातील ६००० भारतीय नागरिक होते. आत्तापर्यंत केवळ १७ भारतीय नागरिकांना परदेशांमध्ये करोनाची लागण झाली आहे, असे भारताने अधिकृतरित्या म्हटले आहे. यामध्ये जपानमधील डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील १६ जणांचा, तर यूएईमधील एकाचा समावेश आहे. हे सर्वजण परदेशांतच आहेत. चाचणी पॉझिटिव आलेल्यांना भारत परत आणणार नाही हे स्पष्ट धोरण आहे. अनेक देश चाचणी निगेटिव आल्याच्या प्रमाणपत्राशिवाय लोकांना परत पाठवत नाही आहेत, हेही यामागील कारण आहे. भारतीय नागरिकांना ज्या देशांमध्ये करोनाची लागण झाली आहे, त्या देशांनी त्यांच्यावर चांगले उपचार करणे अपेक्षित असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयातील COVID 19 समन्वयक दामू रवी यांनी १२ मार्च रोजी स्पष्ट केले आहे.

इराणमधील यात्रेकरूंन ‘पॉझिटिव’ रुग्णांची यादी पाठवण्यात आल्याची कल्पना परराष्ट्र खात्याला आहे. मात्र, त्याच्या अस्सलतेबद्दल त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. याबाबतचा आकडा प्रसिद्ध केला तर उगाच घबराट पसरेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या १६ मार्च रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, इराणमध्ये १४,९९१ जणांना करोना विषाणूची लागण झाली असून, त्यातील ८५३ जणांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ करोनाच्या साथीबाबत चीन आणि इटलीपाठोपाठ इराणचा क्रमांक लागतो.

भारतीय यात्रेकरू स्वखर्चाने १५ हॉटेल्समधून राहत आहेत. चाचणी पॉझिटिव आलेल्यांना वेगळे ठेवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. उदाहरणार्थ, इसार हॉटेलमध्ये चाचणी पॉझिटिव आलेल्या कारगिलमधील ३१ जणांना ठेवण्यात आले आहे. चाचणी पॉझिटिव आलेले एका मजल्यावर, तर निगेटिव आलेले दुसऱ्या मजल्यावर अशी विभागणी करण्यात आली आहे. मात्र, यात दूतावासाचा संबंध नाही, तर यात्रेकरू स्वत:च हे करत आहेत, असे मोहम्मद हुसैन यांनी सांगितले. त्या यादीनुसार हुसैन यांची चाचणीही पॉझिटिव आली आहे.  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा खर्च भारत सरकार करत असल्याचा दावा केला आहे.

काही हॉटेल्समध्ये कोणतेही विलगीकरण नाही. आपल्यातील २४ जणांना लागण झाली असूनही सर्व एकत्र राहत आहेत. याबाबत दूतावासाने कोणतीही मदत केलेली नाही, असे अली यांनी सांगितले. चार ते सहा जण एका खोलीत राहत असल्याने बाकीच्यांनाही लागण होण्याचा धोका आहे. लक्षणे दिसू लागलेल्यांना मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे शेख अली यांनी सांगितले. यातही दूतावासाने कोणतीही मदत केली नाही, असा त्यांचा आरोप आहे.

“स्थानिक डॉक्टरांना यात्रेकरूंची भाषा कळत नाही. यात्रेकरूंजवळील पैसे संपत आले आहेत. मात्र, सरकारने आमच्यासाठी काय नियोजन केले आहे हे आम्हाला कळत नाही. चाचण्या निगेटिव आलेल्यांना परत घेऊन जाणार असे आम्ही ऐकत आहोत पण आमचे काय होणार माहीत नाही,” असे त्या यादीनुसार चाचणी ‘पॉझिटिव’ आलेले मोहम्मद हसन म्हणाले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: