तुफान पावसाचे मुंबईत ३१ बळी

तुफान पावसाचे मुंबईत ३१ बळी

मुंबईः  शहरात शनिवारी रात्री व रविवारी पहाटे व नंतर दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळून ३१ जण ठार

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरचे ‘निसर्ग’ संकट
पीएमसीतून १० हजार रु. काढण्यास परवानगी
‘मालाड दुर्घटनेला महापालिका जबाबदार’

मुंबईः  शहरात शनिवारी रात्री व रविवारी पहाटे व नंतर दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळून ३१ जण ठार झाले. चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारतनगरमध्ये १९ जण तर विक्रोळी येथील दुर्घटनेत १० जण ठार झाले. अन्य ठिकाणी एक जण मरण पावला. दुर्घटनेस्थळी एनडीआरएफ, अग्निशमन, महापालिका, पोलीस आदी यंत्रणांतर्फे तात्काळ बचाव व मदतकार्य सुरू झाले आणि अनेकांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रु.ची मदत जाहीर केली. रविवारी रात्रीच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले.

या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, रविवारी दिवसभर मुंबईसह उपनगर, मिरा-भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत होता. मुंबई शहरात व उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. सकाळीच रेल्वेची मध्य, पश्चिम व हार्बर सेवा ठप्प झाली होती. रेल्वे रुळावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणार्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्रामध्येच पाणी गेल्याने तेथे तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी पोहचले नाही.

रविवार रात्रीच्या मुसळधार पावसाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील विमान वाहतूकही पावणे एक ते साडेपाच दरम्यान बंद ठेवण्यात आली होती. काही विमान उड्डाणे अन्य ठिकाणी वळवण्यात आली होती. नंतर पहाटे सहाच्या सुमारास विमान वाहतूक सुरळीत झाली.

दरड कोसळून काही व्यक्ती मरण पावल्याची माहिती मिळताच आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, स्थानिक नगरसेवक उमेश माने, निधी शिंदे, राजेश्वरी रेडकर, दीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, रविवारी रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0