राज्यात खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण

राज्यात खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण

मुंबई: राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने सोमवारपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के

केंद्राकडून केवळ १ टक्का काश्मीरी सफरचंदाची खरेदी
शेळ्यामेंढ्यांच्या चारापाण्याची वानवा
परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर शेतकऱ्यांना अनुदान देणार

मुंबई: राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने सोमवारपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली असून कोकण विभागात मुसळधार पाऊस होत आहे. औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पुणे व कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी, नाशिक विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. १२ जुलैपर्यंत राज्यात ३६८ मिमी. पाऊस झाला आहे.

राज्यात ऊस पिकासह खरीपाचे क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आहे. गेल्या आठवड्यापासून पर्जन्यमानास सुरुवात झाल्याने पेरणीची खोळंबलेली कामे सुरू झाली आहे. काही ठिकाणी पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले.

कोकण विभागात खरीपाचे ४.४२ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ०.९८ लाख हेक्टर (२२.१७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात २१.१९ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी ११.२६ लाख हेक्टर (५३.१२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुणे विभागात ८.६७ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून आतापर्यंत ६.४१ लाख हेक्टर (७३.९९ टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरीपाचे क्षेत्र ८.०३ लाख हेक्टर असून ६.७३ लाख हेक्टर (८३.७७ टक्के) पेरणी झाली आहे.

औरंगाबाद विभागात २०.२३ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी १७.५२ लाख हेक्टर (८६.६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागात खरीपाचे क्षेत्र २७.९४ लाख हेक्टर असून त्यापैकी २४.२८ लाख हेक्टर (८६.९० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ३२.२४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २६.२९ लाख हेक्टर (८१.५५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागात १९.२६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ११.२९ लाख हेक्टर (५८.६५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

राज्यात अद्यापही काही भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असून खरीपाशी निगडीत कामांबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात येत असल्याचे डवले यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: