अहमदनगरमध्ये पुन्हा जातीयवादी अत्याचार : महिलेची हत्या

अहमदनगरमध्ये पुन्हा जातीयवादी अत्याचार : महिलेची हत्या

अहमदनगर/वडझिरे: अहमदनगरपासून ५५ किलोमीटर अंतरावरील वडझिरे नावाच्या खेड्यात राहणारी अस्मिता गायकवाड नावाची २० वर्षांची मुलगी गेल्या तीन वर्षांपासून सतत

२ साधूंची हत्या; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता
विनोद दुआंवरची राजद्रोहाची तक्रार रद्द
बीबीसी वर्ल्ड न्यूजवर चीनमध्ये बंदी

अहमदनगर/वडझिरे: अहमदनगरपासून ५५ किलोमीटर अंतरावरील वडझिरे नावाच्या खेड्यात राहणारी अस्मिता गायकवाड नावाची २० वर्षांची मुलगी गेल्या तीन वर्षांपासून सतत तक्रारी दाखल करत आहे. पोलिसांकडे आणि राज्य सरकारकडे दाद मागण्याच्या या प्रवासात तिच्याजवळ जमलेल्या कायदेविषयक कागदपत्रांच्या थप्प्याच्या थप्प्या तिच्या एका खोलीच्या घरात दिसतात. अस्मिता दाद मागत आहे राहुल साबळे नावाच्या २७ वर्षांच्या तरुणाने केलेल्या लैंगिक छळाच्या आणि जातीयवादी वर्तनाच्या विरोधात. मात्र, या प्रवासात तिला आणि तिच्या कुटुंबाला छळाचा सामना कसा करावा लागत आहे, हे या कागदांच्या थप्प्यांतून दिसून येते. महाराष्ट्रातील “जातीयवादी अत्याचारां”चा जिल्हा अशी ओळख मिळालेल्या अहमदनगरमधून पुन्हा एकदा एक धक्कादायक गुन्हेगारी घटना पुढे आली आहे.

अस्मिताला अनेक वर्षं त्रास दिल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी साबळे तिच्या घरी पोहोचला आणि तिला बोलावू लागला. अस्मिताच्या आई सविता गायकवाड (त्यावेळी वय ३६) यांनी दाराशी उभं राहून त्याला अडवलं. त्यांच्या प्रतिकारामुळे संतापलेल्या साबळेने त्यांच्यावर एका मागोमाग एक चार गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. “त्याने माझ्या आईच्या डोक्याशी गन धरली आणि म्हणाला की, तुम्ही तुमच्या मुलीसाठी काहीही करू शकता, तर मग मरा तिच्यासाठी,” अस्मिता सांगते.

सविताच्या आईचा खून करण्यापर्यंत मजल मारण्यापूर्वीही साबळेने गायकवाड कुटुंबाचा अनेक प्रकारे छळ केला आहे. मात्र, पोलिसांनी कधीच त्याच्याविरोधात कारवाई केलेली नाही, अशी अस्मिताची तक्रार आहे. काहीवेळा तर पोलिसांनी आरोपीला मदत केल्याचा तसेच प्रोत्साहन दिल्याचा गायकवाड कुटुंबाचा आरोप आहे.

सविता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना शेजाऱ्यांपैकी कोणीही या कुटुंबाच्या मदतीला आले नाही. अस्मिता आणि तिचे मामा (सविता यांचे मोठे भाऊ संतोष) यांनी सविता यांना उचलून गावाबाहेरील रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साबळे घटनास्थळावरून निसटला आणि आजपर्यंत फरारच आहे.

अस्मिताला साबळे २०१७ सालापासून, ती १७ वर्षांची असल्यापासून, त्रास देत आहे. वडझिऱ्यापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील रांधे नावाच्या गावात साबळे राहतो. तो रोज अस्मिताचा पाठलाग करायचा. एका तथाकथिक सवर्ण हिंदू माणसाशी लढण्याची ताकद अस्मिताच्या कुटुंबात नाही याची जाणीव साबळेला असल्याने त्याचा छळ अधिक तीव्र झाला होता. तो तिचा रस्ता अडवून तिच्याकडे लग्नाची मागणी करायचा आणि लग्नाला नकार दिल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकीही द्यायचा, असे अस्मिता सांगते. गेल्या काही दिवसांपासून ती पोलिस आणि मॅजिस्ट्रेटसमोर पुन्हापुन्हा हेच सांगत आहे.

“आम्ही गरीब असलो तरी आईने व मी साबळेशी लढण्याचा निर्धार केला होता,” असेही अस्मिता सांगते. २०१८ मध्ये छळ असह्य होऊन अस्मिताने पारनेर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याच्या (अॅट्रॉसिटी प्रतिबंध कायदा) व भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली साबळेविरोधात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी बरीच टाळाटाळ केल्यानंतर अखेर तिची तक्रार नोंदवून घेतली. साबळेला एका आठवड्यासाठी तुरुंगातही ठेवण्यात आले होते. त्यानंतर अस्मिताच्या वाटेला न जाण्यासह आणखी काही अटींवर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, सुटकेनंतर साबळेचे धैर्य आणखीनच वाढले, असे अस्मिता सांगते. तो तिला फोन करू लागला, तिच्या दारात येऊन उभा राहू लागला, मित्रांकरवी तिच्यावर पाळत ठेवू लागला. तो तिच्या कॉलेजच्या वर्गात येऊन तिच्या शेजारी बसायला पण अन्य विद्यार्थी व प्राध्यापक हस्तक्षेपास किंवा तिला मदत करण्यास तयार नसायचे. अस्मिता शिक्षणाला लागणारा पैसा मिळवण्यासाठी एका मिनरल वॉटर बॉटलिंग कंपनीत काम करत होती. त्या कंपनीतही साबळे यायचा असे ती म्हणते.

गनच्या धाकाने लग्न

११ फेब्रुवारी २०१९ रोजी कंपनीत निघालेल्या अस्मिताला साबळेने जबरदस्तीने गाडीत ओढले आणि तो तिला ८५ किलोमीटर प्रवास करून पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घेऊन गेला. १२ फेब्रुवारी रोजी त्याने तिच्या डोक्याला गन लावून जबरदस्तीने तिच्याशी लग्न लावले.

लग्नानंतर साबळे अस्मिताला त्याच्या रांधे येथील घरी घेऊन गेला. या घरात त्याचे आईवडीलही होते. अस्मिता सांगते, “तो मला रोज मारत असे. त्याच्या आईनेही माझा छळ केला. ते मला शिवीगाळ करायचे आणि जातीवरून शिव्याही द्यायचे. त्या घरातून माझी कधी सुटका होईल ही आशाच मी सोडून दिली होती.” कुटुंबियांनी अनेकदा अस्मिताला भेटायचा प्रयत्न केला पण त्यांना दरवेळी हाकलून देण्यात आले, असे अस्मिताची धाकटी बहीण द वायरला सांगते.

त्या घरात चार महिने काढल्यानंतर एक दिवस साबळे घरी नसताना अस्मिता तेथून निसटली. ती तेथून बसने मुंबईला गेली आणि नवी मुंबईत एका नातेवाईकांकडे काही महिने राहिली.

आईच्या मृत्यूला पोलिस जबाबदार

साबळेची आर्थिक परिस्थितीही यथातथाच आहे. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्पन्नाच्या मर्यादित साधनांवर चालतो. जेमतेम एक एकर जमीन आहे. मात्र, त्याचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. तो पारनेर पोलिस ठाण्यात पोलिसांसोबत फिरायचा आणि त्यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याच्या बाता मारायचा, असा अस्मिताचा दावा आहे.

पोलिसांकडे वारंवार केलेल्या तक्रारींमध्ये यातील प्रत्येक आरोपाचा उल्लेख आहे, असे ती सांगते. त्याच्याशी लढणे सोपे नाही हे तिला समजते पण तिचीही हार मानण्याची तयारी नाही. “त्याने जेव्हा जेव्हा मला किंवा माझ्या आईला धमकी दिली, तेव्हा तेव्हा आम्ही पारनेर पोलिस ठाण्यात गेलो. पोलिस आम्हाला काय कटकट आहे, असे म्हणून घालवून देत होते. आम्ही दाद दिली नाही की ते तक्रार नोंदवून घ्यायचे पण गुन्ह्यांचे स्वरूप ‘अदखलपात्र’ करून टाकायचे,” अस्मिता म्हणते. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १६४ खाली न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे (मॅजिस्ट्रेट) दिलेल्या जबाबात तिने पोलिस निरीक्षक पवार आणि कॉन्स्टेबल विनोद रोहिदास बोरगे यांची नावेही घेतली आहेत. हे दोघे आरोपीसोबत मिळालेले आहेत असा आरोप तिने केला आहे.

“पोलिसांनी त्वरित कारवाई केली असती, तर कदाचित आज माझी आई जिवंत असती. त्यांनीच माझ्या आईला ठार मारले,” असे म्हणत अस्मिता त्यांच्या निष्क्रियतेला दोष देते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0