सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर हाकलले जाईल – अमित शाह

सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर हाकलले जाईल – अमित शाह

‘या घुसखोरांना हाकलले पाहिजे की नाही,’ शाह त्यांच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये विचारत आहेत.

दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!
सह्याद्री आणि हिमालय…!
कोरोना संकटात अमित शहांच्या राजकीय आरोळ्या

कैथल/लोहारू/मेहम: हरयाणामध्ये राज्याच्या निवडणुकांच्या आधी प्रचारमोहिमेतील भाषणांकरिता केंद्रीय गृहमंत्र्यांनी, विशेषतः निवडणुकांसाठीचा त्यांच्या आवडीचा विषय निवडला आहे. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रत्येक बेकायदेशीर घुसखोराला त्यांच्या घरी हाकलले जाईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मात्र अमित शाह यांचे हे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दिलेल्या वचनाच्या विरोधात आहे. आसाम नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सबद्दल त्यांना काळजी करण्याचे कारण नाही असे भारताच्या पंतप्रधानांनी बांगला देशच्या पंतप्रधानांना सांगितले आहे, व खरोखरच NRC द्वारे ‘बेकायदेशीर’ घोषित केलेल्या स्त्रीपुरुषांना ‘घरी पाठवण्याची’ भारताची योजना नाही हे निर्देशित केले आहे.

आसाममध्ये NRC बद्दल जो वाद चालला आहे, त्याचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले, “७० वर्षे, या घुसखोरांनी आपल्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप सरकार या सर्वांना एनआरसी मार्फत देशाबाहेर काढण्यास वचनबद्ध आहे.”

पुन्हा एकदा, हरयाणामध्ये अमित शाह आसाम एनआरसीची वकिली करत असले तरी आसाममध्ये त्यांच्याच पक्षाचा पवित्रा त्याउलट आहे. तेथील नेते हिमांत बिस्वा सरमा यांनी पक्षाला एनआरसीपासून वेगळे केले आहे. एनआरसीमध्ये अनेक हिंदूनाही वगळण्यात आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

“या घुसखोरांना हाकलले पाहिजे की नाही?” शाह पुन्हा पुन्हा सभांमध्ये विचारत आहेत, काँग्रेस आणि त्या पक्षाचे स्थानिक उमेदवार आणि वरिष्ठ नेते रणदीप सिंग सुरजेवाला हे एनआरसीची अंमलबजावणी करायला विरोध करत आहेत असा आरोप शाह करत आहेत.

“काँग्रेसच्या लोकांनी तिहेरी तलाक (ठरावाला), कलम ३७० आणि ३५अ रद्द करायला विरोध का केला हे त्यांना विचारा,” ते म्हणाले.

एनआरसी मुळे विशिष्ट धर्माचे लोक वगळले जात असतील तोवर शाह यांनी नेहमीच त्याचे समर्थन केले आहे. त्यांनी अलिकडेच बंगाल येथे वचन दिले, की मुस्लिम वगळता सर्व निर्वासितांना भारतात जागा असेल.

“जेव्हा आम्ही २०२४ साली पुन्हा तुमच्याकडे मते मागायला येऊ, तेव्हा त्यापूर्वीच आम्ही एक न् एक घुसखोर या देशाच्या बाहेर हाकललेला असेल,” असे ते कैथल येथे म्हणाले.

भाजप अध्यक्षांनी काँग्रेसवर टीका करताना, राजनाथ सिंग यांनी भारताच्या पहिल्या राफेल लढाऊ जेटची शस्त्रपूजा केली याची काँग्रेसच्या नेत्यांनी चेष्टा केली असेही ते म्हणाले.

“विरोधी पक्षांच्या मते, ते नाटक होते. यात त्यांची चूक नाही. त्यांना इटालियन संस्कृतीबद्दल जास्त माहिती आहे, भारताच्या संस्कृतीबद्दल कमी,” असे भाजप अध्यक्ष लोहारू मध्ये म्हणाले.

ते म्हणाले, काँग्रेस आणि इतर घराणेशाहीने बुजबुजलेले पक्ष वाळवीसारखे लोकशाहीला कुरतडत आहेत.

शाह असेही म्हणाले, की पूर्वीच्या कोणत्याही सरकारकडे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची हिंमत नव्हती, पण नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा सत्तेत आल्यानंतर संसदेच्या पहिल्याच सत्रात ते करून दाखवले.

“आम्हाला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती, कारण ते भाजपचे काम नव्हते, तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न होता,” काँग्रेसकडे इशारा करत ते म्हणाले.

ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीर राज्य भारतीय संघराज्यात पूर्णपणे समाविष्ट नाही अशी देशातील लोकांची भावना होती. कलम ३७० आणि ३५अ हे त्यामधील अडथळे होते.

ते म्हणाले, हरयाणातील अनेक सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरसाठी जीव गमावले आहेत.

(पीटीआयच्या बातम्यांवरून)

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: