अमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओतून दिशाभूल करणारी माहिती!

अमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओतून दिशाभूल करणारी माहिती!

कोविड-१९ची साथ आणि परिणामी आलेली लॉकडाउनची परिस्थिती यामुळे आलेला ताण व उडालेली घबराट जशी काही कमीच होती, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी को

गुजरातमधील अतिरिक्त मृत्यूंची कथा
कोरोनाविरोधातल्या लढाईचा हा ‘गोल्डन अवर’- मुख्यमंत्री
अॅलोपॅथी खरंच ‘स्टुपिड’ आहे का?

कोविड-१९ची साथ आणि परिणामी आलेली लॉकडाउनची परिस्थिती यामुळे आलेला ताण व उडालेली घबराट जशी काही कमीच होती, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेशी संपर्क आलेल्या माशा कोरोना विषाणूचा प्रसार वाढवू शकतात या दाव्यावर आधारित एक संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला.

बच्चन यांनी अशी चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी शास्त्रीय माहिती बघण्याचे कष्ट घेतले असते तर बरे झाले असते!

आता आपण या पूर्णत्वास न गेलेल्या तथ्यांपासून समजून घेण्यास सुरुवात करू. गेल्या आठवड्यात लॅन्सेट गॅस्ट्रोएंटेरोल हेपॅटोल जर्नलमध्ये एक शास्त्रीय माहितीवर आधारित पत्र प्रसिद्ध झाले. यामध्ये श्वसनमार्गात व विष्ठेच्या नमुन्यांमधील न्यू कोरोना विषाणू आढळल्याची माहिती संशोधकांनी दिली होती. (विषाणूच्या अस्तित्वाची पुष्टी रिअल-टाइम रिव्हर्स-ट्रान्स्क्रिप्शन पोलीमरेज चेन रिअॅक्शन अर्थात आरटी-पीसीआर पद्धतीने करण्यात आली होती. ही पद्धत किचकट पण खात्रीशीर आहे.)

कोविड-१९ची लागण झालेल्या एकूण ९८ रुग्णांपैकी ७४ जणांच्या (रुग्णगटापैकी ७६ टक्क्यांच्या) श्वसनमार्गाचे तसेच विष्ठेचे नमुने संशोधकांनी गोळा केले. यातील ४५ टक्के रुग्णांच्या विष्ठेत विषाणू आढळला नाही पण त्यांच्या रेस्पिरेटरी स्वॅब्जमध्ये, लक्षणे जाणवण्यास सुरुवात झाल्यापासून सरासरी १५.४ दिवस विषाणूचे अस्तित्व होते. ज्या ५५ टक्के रुग्णांच्या विष्ठेत विषाणूचे अस्तित्व आढळले, त्यांच्या रेस्पिरेटरी स्वॅब्जमध्येही, लक्षणे दिसण्यास सुरुवात झाल्यापासून सरासरी १६.७ दिवस, विषाणूचे अस्तित्व आढळले. त्यांच्या विष्ठेच्या नमुन्यांमध्ये, लक्षणे जाणवणे सुरू झाल्यापासून, सरासरी २७.९ दिवस विषाणूचे अस्तित्व होते.

अशा रितीने, कोविड-१९ झालेल्या रुग्णांच्या विष्ठेच्या नमुन्यांत कोरोना विषाणूचे अस्तित्व रेस्पिरेटरी स्वॅबमध्ये होते त्या तुलनेत ११ दिवस अधिक राहिल्याचे दिसून आले. मात्र, ४५ टक्के रुग्णांच्या आतड्यांत कोरोना विषाणू दिसून आले नाहीत (म्हणूनच त्यांच्या विष्ठेचे रिपोर्ट्स निगेटिव होते).

(हा विषाणू जठर, छोटे आतडे आणि गुदाशयामध्ये असलेल्या एसीईटू रिसेप्टर्सचा वापर करून जठर-आतड्याच्या मार्गात प्रवेश करतो.)

यामध्ये संशोधकांनी नोंदवलेली काही निर्णायक निरीक्षणे पुढीलप्रमाणे: ए) जठरआतड्यातील लक्षणांचा संबंध विष्ठेतील विषाणूच्या अस्तित्वाशी नव्हता; बी) विष्ठेत विषाणू विस्तारित काळ राहिल्याचा संबंध आजाराच्या तीव्रतेशी नव्हता; आणि सी) विष्ठेतील विषाणूचा संबंध प्रतिविषाणू (अँटि-व्हायरल) उपचारांशी होता.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या श्वसनमार्गातील स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव आले तरी नियमितपणे त्याच्या शौचाचे नमुने आरटी-पीसीआर पद्धतीने तपासत राहावेत असे या पत्राच्या लेखकांनी सुचवले होते. मात्र, विष्ठेतील विषाणू अजून वाढ होण्याजोगा (व्हायेबल) आहे का हे आपण आरटी-पीसीआर चाचण्यांच्या आधारे तरी निश्चित करू शकलो नाही हेही त्यांनी मान्य केले आहे. तसेच हा विषाणू विष्ठेमार्फत संक्रमित झाला अशी एकही केस पाहण्यात आली नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे “या मार्गाने प्रादुर्भाव पसरणे क्वारंटाइन स्थळी, रुग्णालयांत किंवा स्वयंअलगीकरणाच्या परिस्थितीत शक्य नाही असे यातून दिसते” असे त्यांनी अखेरीस म्हटले आहे.

विष्ठेतील कोविड-१९ची वाढण्याची तसेच प्रादुर्भावाची क्षमता निश्चित करण्यासाठी आपल्याला आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र, या शास्त्रीय पत्रावरून आपण काही निष्कर्ष काढू शकतो. उदाहरणार्थ, नवीन कोरोनाविषाणू श्वसनमार्गाच्या तुलनेत विष्ठेत अधिक काळ राहतो पण विष्ठेतील विषाणूची वाढ होऊ शकते का किंवा तो प्रादुर्भाव करू शकतो का याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोविड-१९चे संक्रमण माश्यांद्वारे होऊ शकते असे याचा या पत्रात कोठेही उल्लेख नाही.

हिंदुस्तान टाइम्समध्ये २६ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमध्ये या ज्येष्ठ अभिनेत्यांना उद्धृत करून देण्यात आलेला मजकूर आश्चर्य वाटण्याजोगा आहे. “जर घरातील माशी प्रादुर्भाव झालेल्या विष्ठेवर बसली आणि मग ती माशी खाद्यपदार्थांवर बसली, तर त्यामुळे आजार पसरू शकतो. तेव्हा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपण देशाला पाणंदमुक्त करण्यासाठी आंदोलन केले तसेच याविरोधातही आपण एक जनआंदोलन सुरू केले पाहिजे.” अमिताभ बच्चन यांनी स्वत: रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओत ही माहिती दिली असल्याचे बातमीत म्हटले आहे.

वृत्तपत्राच्या बातमीत बच्चन यांच्या माश्यांबद्दलच्या दाव्याला लॅन्सेटमधील अभ्यासाचा संदर्भ देण्यात आला आहे आणि कोरोना विषाणू विष्ठेमार्फत संक्रमित होऊ शकते या दाव्याला कोणत्याही शास्त्रीय निबंधातील परीक्षणाद्वारे पुष्टी मिळालेली नाही.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेला संदर्भ हा संभाव्य दात्यांकडून केल्या जाणाऱ्या स्टूल ट्रान्सप्लाण्टशी आहे. स्टूल ट्रान्सप्लाण्ट डोनर्समध्ये कोविड-१९ची लक्षणे आहेत का, हे तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्याभरात कोविड-१० प्रभावित देशांमध्ये प्रवास केला आहे का आणि/किंवा ते प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींच्या निकट संपर्कात आले आहेत का हे तपासले जावे अशी शिफारस या बातमीत करण्यात आली आहे.

या टिप्पणीला आणखी एका अभ्यासाचा संदर्भ आहे. कोविड-१९चा प्रादुर्भाव झालेल्या ७३ रुग्णांसोबत हा अभ्यास करण्यात आला. त्यातील निम्म्या रुग्णांच्या शौचाच्या नमुन्यांमध्ये १ ते १२ दिवसांपर्यंत विषाणू आढळत होता. सुमारे २३ टक्के रुग्णांच्या श्वसनमार्गातील नमुन्यांच्या चाचण्या निगेटिव आल्या, तरी शौचाच्या नमुन्यांच्या चाचण्या पॉझिटिव येत होत्या. यावरून या विषाणूचा प्रादुर्भाव आतड्यांमध्ये होते याचा पुरावा मिळाला आहे आणि विष्ठा-मौखिक मार्गाने संक्रमण “शक्य” आहे असे दिसून आले आहे, असे हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी नोंदवले आहे. मात्र, या मार्गाने विषाणू प्रादुर्भाव करू शकतो का याबद्दल कोणताही शास्त्रीय दावा करणे त्यांनी टाळले आहे.

कोरोनाविषाणूच्या वैश्विक साथीने सध्या अवघ्या जगाला स्तब्ध केले आहे. वैज्ञानिक उत्तरे शोधण्यासाठी संघर्ष करत आहेत तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती ढासळू लागली आहे. या नवीन आजाराच्या वेगवेगळ्या अंगांविषयी जवळपास प्रत्येक देशात वेगवेगळे मतप्रवाह तयार झाले आहेत. लोकांच्या हालचालींवर निर्बंध आले आहेत आणि ते योग्यही आहे. याच काळात आपण धीराने वागले पाहिजे. आपण आपला सारासार विचार शाबूत ठेवून वैज्ञानिक नियतकालिकांतून माहिती मिळवली पाहिजे. ते शक्य होत नसेल, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटच्या होमपेजवर कोरोनाविषाणूबद्दल सर्व माहिती दिलेली आहेच.

वर्तमानपत्रांचे मथळे सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात अनेकदा दिशाभूल करतात आणि गोंधळात भर घालतात. आता लोकांनी केवळ अर्हताप्राप्त वैज्ञानिकांवर विश्वास ठेवावा अशी वेळ आलेली आहे.

माहितीचा प्रसार करण्यासाठी सेलेब्रिटीज करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय असले, तरी त्यातून अजाणतेपणी गोंधळ निर्माण होऊ शकतो. सध्या शांत राहणे कधी नव्हते एवढे महत्त्वाचे आहे.

दीपक नटराजन, हे दिल्लीस्थित कार्डिओलॉजिस्ट आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: