अरुण खोपकर: आपले आणि परके 

अरुण खोपकर: आपले आणि परके 

आज संपूर्ण भारतात भीतीचे वातावरण आहे. संस्कृती ही भीतीच्या अंधारात वाढू शकत नाही. तिला वाढण्याकरता खुला प्रकाश, मोकळी हवा आणि मुबलक प्राणवायु लागतो. गळचेपीने तो कमीकमी होऊ लागतो, श्वास गुदमरतो. संस्कृती जेव्हा एकमेकींना कुशीत घेऊन वाढवू लागतात तेव्हाच त्यांची परस्परवाढ होते. इतिहासाचा हा निरपवाद नियम आहे.

शतमूर्खांचा लसविरोध
कोरोना आणि दक्षिण कोरीया
‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज

गेल्या काही वर्षात मराठी संस्कृतीला एक यक्षप्रश्न पडला आहे. तो म्हणजेआपले कोण आणि परके कोण?” राजकारणापासून सांस्कृतिक व्यवहारापर्यंत प्रत्येक क्षेत्रात होणाऱ्या कृतीत आणि विचारात त्याचे काय उत्तर दिले गेले, दिले जात आहे आणि जाणार आहे त्यावर मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा दर्जा आणि भवितव्य ठरणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालात पं. नेहरूंच्या प्रेरणेने विविध कलाक्षेत्रात राष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या. साहित्य अकादमीने विविध भारतीय भाषासंस्कृतीत परस्परसंवाद सुरू व्हावा ह्याकरता भाषांचे इतिहास, वाङमयकोश, चरित्रकोश, उत्तमोत्तम साहित्यकृतींची भाषांतरे . योजना धडाडीने सुरू केल्या. महाराष्ट्रराज्याच्या निर्मितीनंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांच्या नेतृत्वाखाली १९६०साली महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृतीमंडळाची स्थापना झाली. मराठीगुजराती, तमिळमराठी, उर्दुमराठी अशा अनेक दर्जेदार कोशांची झपाट्याने निर्मिती झाली. धर्मकोश, विश्वकोश, विविध भाषांचे कोश अशी भरभक्कम कामे योजून ती पूर्णत: आणि अंशत: पारही पाडली.

जेव्हा मराठी भाषेच्या नावाने चळवळ करण्यातला आर्थिक लाभ जाणवू लागला तेव्हा ह्या भाषेकरता काय करणे आवश्यक आहे ह्या प्रश्नाऐवजी भाषेवर काय कमावता येते ह्या प्रश्नालाकिंमतआली. जेव्हा संस्कृतीत फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती बळावतात तेव्हा संस्कृतीचा ऱ्हास आणि फूटपाड्यांचा अार्थिक विकास समप्रमाणात होतात. ह्या फुटीर वृत्तीबरोबर असहिष्णुता, झुंडशाही आणि हिंस्र प्रवृत्ती माजतात. एका गटाची झुंडशाही यशस्वी झाली की दुसऱ्याला बळ येते. पाचपन्नास इसमांचा लहानसहान गटही ब्र काढणाऱ्याला दटावू शकतो. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् | येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् || (घडे फोडून, कपडे फाडून अगदी गाढवावर बसूनही कोणत्याना कोणत्या प्रकारे प्रसिद्ध होता येते.)

आज संपूर्ण भारतात भीतीचे वातावरण आहे. संस्कृती ही भीतीच्या अंधारात वाढू शकत नाही. तिला वाढण्याकरता खुला प्रकाश, मोकळी हवा आणि मुबलक प्राणवायु लागतो. गळचेपीने तो कमीकमी होऊ लागतो, श्वास गुदमरतो. संस्कृती जेव्हा एकमेकींना कुशीत घेऊन वाढवू लागतात तेव्हाच त्यांची परस्परवाढ होते. इतिहासाचा हा निरपवाद नियम आहे. मराठी भाषेच्या सर्वसमावेशी सहिष्णुतेमुळे ती वाढली फोफावली. स्वभाषेच्या बहुस्रोती इतिहासाची जाण इतर भाषासंस्कृतीतून मिळणारा पौष्टिक आहार ह्या दोन्ही गोष्टी भाषेच्या आरोग्याला आणि वाढीला जरूरीच्या आहेत.

गेल्या सुमारे साठ वर्षात मराठी भाषेच्या नावाखाली दंगे, वित्तहानी प्राणहानीही झाली. मराठी भाषिकांना ही भाषा आपल्यावर लादली जाते असे वाटू लागले. हे केवळ एकाच गटाने, पक्षाने किंवा जातीने केले असे नाही. ज्याला ज्याला त्यातून राजकीय फायदा मिळत होता तिथे तिथे त्याने त्याने हात मारला. वादाच्या व्यासपीठावर येण्याकरता व्यासंग आणि विचार लागतो. तत्वप्रणालीत भावप्रणाली गुंफण्याकरता हृदयात अनुकंपा आणि करूणा नांदाव्या लागतात. फुटपाड्या जेव्हा हातात दगड घेतो तेव्हा त्याचे हृदय आधीच दगडाचे झालेले असते.

भाषा ही प्रेमातून अंकुरते, अनुभवाच्या आणि व्यासंगाच्या खतपाण्यावर वाढते. तिच्या फांद्या विस्तीर्ण होत होत सर्वच पांथस्थांना सुखसावल्या देतात. महाराष्ट्रातले अनेक जण बंगाली शिकले ते रवींद्रनाथांचे, शरच्चंद्रांचे, बंकिमचंद्रांचे आणि महाश्वेतादेवींचे शब्द वाचण्याकरता शिकले. उर्दु शिकले ते गालिब आणि मीर वाचण्याकरता. आज इरिना ग्लुश्कोव्हा, अॅन फेल्डहाऊस, देलरी, झोंटहायमर .ना मराठी संतांच्या प्रेमाने सातासमुद्रांपलिकडून आपसूक आणि अलगद महाराष्ट्रात आणले.

आज मराठी शिकावेसे वाटले तर त्याला मराठीच्या नावाने गर्जना करणाऱ्यांनी कोणती साधने उपलब्ध केली आहेत? नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी शिकण्याकरता काय सोयी आहेत? मराठी साहित्याचे कोणते महत्वाचे ग्रंथ उपलब्ध आहेत? वि. . भाव्यांचेमहाराष्ट्र सारस्वत’, श्री. ना. बनहट्टींचा मराठी रंगभूमीचा इतिहास, हरि नारायण आपट्यांच्या कादंबऱ्या, माधवराव पटवर्धनांचेछंदोविचार’, ना. . जोशींचे छंदशास्त्रावरील उत्तमोत्तम ग्रंथ, पु. शि. रेगे, भाऊ पाध्ये, मनोहर ओक आणि दिलीप चित्रे यांची पुस्तके मिळत नाहीत. मुंबई शहरावरची वसंत गुर्जरांचीगोदीसारखी दीर्घ कविता मिळत नाही. लोककवी मनमोहन, पठ्ठे बापुरावकिती नावे घेऊ?

शिवाजी महाराजांच्याआज्ञापत्रांतली मराठी ही साधी, नेमकी आणि अनुभवाधिष्ठित आहे. ‘हिंदुत्वाबद्दल वाखाणल्या जाणाऱ्या ह्या सहिष्णु महापुरूषाची भाषा किंवा मराठ्यांच्या इतिहासांच्या साधनातील मराठी वाचताना फारसी शब्दांचे प्रमाण किती मोठे आहे हे जाणवते. माधव ज्यूलिअन उर्फ माधवराव पटवर्धन यांनी दिलेल्या मराठीत रोज वापरल्या जाणाऱ्या फार्शी शब्दांच्या भल्यामोठ्या यादीतली निवडक उदाहरणे:

खुर्ची, मेज, पलंग, गुलाबदाणी, तबक, तस्त, समई, चहा, जर्दाळू, दालचिनी, पिस्ता, बदाम, मनुका, अंजीर, अनार, टर्बुज, खर्बुज, अफू, बिर्यानी, पुलावा, खिमा, फालूदा, डफ, ढोल, तबला, तुणतुणे, नगारा, नौबत, सतार, कवाली, ख्याल, गजल, मैफल, शाहीर, जल्सा, तमाशा, कलम, शाई, दौत, खलिता, जोडा, पायपोश, पायजामा, झगा, झबले, सुर्वार, अभ्रा, चादर, रजाई, कबूल, नाकबूल, जबाबदार, बेजबाबदार, तयार, जमा, खर्च . . (फार्शीमराठी कोश, सं. कै. माधव त्रिं. पटवर्धन, दुसरी आवृत्ती १९९७, वरदा प्रकाशन)

अरबी, तुर्की आणि मध्य आशियातल्या अनेक भाषांनीही मराठीच्या शब्दसंपत्तीत भर टाकली. संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंशाचे मराठीवर संस्कार झाले. गुजराथी, कानडी . भाषांतून शब्द मराठीत आले. विचार आणि भक्तीभाव एक झाले. ज्ञानेश्वरांचा विठ्ठल हाकानडाआहे. दाससाहित्याचा आणि कर्नाटिक कलासंगीताचा संस्थापक पुरंदरदासही विठ्ठलभक्त आहे. (त्याचे तखल्लुस किंवा अंकित (= कवीचे टोपण नाव) हेपुरंदर विठ्ठलअसे आहे.) भीमसेन जोशी ह्यांच्या मराठी संतवाणीसारख्याच त्यांच्या कानडी दासवाणीच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका आजही महाराष्ट्रात आणि कर्नाटकात घरोघर ऐकू येतात.

मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे ह्यांनीकर्नाटकी नाटक करीही आज्ञा मानून मराठी नाटकाचा प्रारंभ केला. किराण्या घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खॉंसाहेब यांनी महान कर्नाटक संगीतकार वीणा धनम्मल यांचे संगीत ऐकून आपल्याला मिळालेली एका बैठकीची संपूर्ण बिदागी त्यांना देऊन टाकली होती. खॉंसाहेबांच्या मृत्युची बातमी कळताचतुम्ही आपल्या तानपुऱ्याला सोडून कसे जाऊ शकता?” हा शोकाकुल प्रश्न वीणा धनम्मल यांनी खॉंसाहेबांच्या आत्म्याला विचारला.

तंजोरच्या भोसल्यांनी तमिळ आणि तेलगुमध्ये साहित्यनिर्मिती केली. कर्नाटक कलासंगीताला आणि नृत्याला राजाश्रय दिला. भारतीय कलासंगीतातल्या घराण्यांचे महापुरूष अल्लादिया खॉं साहेब, हद्दु हस्सू खॉं साहेब, फैयाज खॉं साहेब, उस्ताद अमीर खॉं, उस्ताद बडे गुलाम अली खां . मुस्लिम उस्ताद कोठून कोठून महाराष्ट्रात किंवा मराठी भाषिकांनी स्थापलेल्या संस्थानांत आले. ह्यांना आणि भारतरत्न भीमसेन जोशी, त्यांच्या गुरूभगिनी गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व . ना, महाराष्ट्रात पाऊल टाकताच त्यांना कधी मराठी म्हणून तर कधी हिंदु म्हणून जर मारेकऱ्यांनी मारझोड केली असती तर आज भारतीय संगीताची केवढी हानी झाली असती.

मुंबईतल्या चित्रपटव्यवसायाने उर्दुतल्या जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक मुन्शी प्रेमचंदांपासून, मंटो, राजिंदरसिंग बेदी, इस्मत चुगताई, कुरतुल्लईन हैदर आणि अगदी आज लोकप्रिय पटकथा गीते लिहीणाऱ्या जावेद अख्तरपर्यंतच्या मंडळीना इथे आणले. हिंदी चित्रपटांतल्या उर्दु गीतांनी भारताला विविध भावरंग सूक्ष्म भावच्छटा व्यक्त करणारे माध्यम दिले. मानवतावादी प्रगतीशीलतेचा निडर वारसा सांगणाऱ्या उर्दु साहित्याची पैदास जितकी उत्तर भारतात आणि दख्खनच्या पठारावर झाली तितकीच मुंबईत झाली.

मराठी सवर्ण समाजाच्या भिंती जसजशा पडू लागल्या तसतशी समाजाच्या विविध स्तरातली भाषिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढू लागली. दलित साहित्याने मराठी भाषेच्या शब्दभांडारात नवीन कोशाची गरज निर्माण करेलशी संपत्ती जमा केली आहे. संस्कृतीप्रमाणेच भाषेच्या एकत्वात अनेकत्वे सामावल्याखेरीज त्याला पूर्णत्व येऊ शकत नाही.

तुकोबा म्हणतातरोग पोटातला म्हणून आपला आणि औषधी रानातली म्हणून ती परकी का?” सुप्रसिद्धमराठी माणूसहा डबक्याबाहेरच्या जगात काही भरीव कामगिरीगुंडगिरी नव्हेकरेल तरच महाराष्ट्राचे उदारचरित आणि राजस रूपडे खुलेल. एरवी सर्वअस्मिताहा केवळ पोकळ वासा आहेत. मग घर कितीही बडे असो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: