बाबरी मशिदीच्या खाली मंदिर असल्याबाबत पुरातत्ववाद्यांमध्ये मतभेद

बाबरी मशिदीच्या खाली मंदिर असल्याबाबत पुरातत्ववाद्यांमध्ये मतभेद

"बाबरी मशिदीच्या खाली, प्रत्यक्षात आणखी जुन्या मशिदीच होत्या."

रामजन्मभूमीच्या निकालापर्यंत अयोध्येत १४४ कलम लागू
रामजन्मभूमी : विचित्र तर्क असलेला निकाल
अयोध्या खटल्याचा पुनर्विचार करण्याची सिविल सोसायटींची मागणी

नवी दिल्ली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) २००३ मध्ये बाबरी मशिदीच्या खाली मंदिर असल्याचा पुरावा सापडला आहे असा दावा केला होता. मात्र, त्याबाबत भारतीय पुरातत्ववाद्यांमध्ये एकमत नाही. अगदी खोदकाम करणाऱ्या समूहाच्या सदस्यांमध्येही त्यावर मतभेद आहेत.

ऑगस्ट २००३ मध्ये ASI ने अलाहाबाद न्यायालयात ५७४ पानांचा अहवाल सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी बाबरी मशिदीच्या खाली एक प्रचंड वास्तू असल्याचे पुरावे सापडले असल्याचे म्हटले होते. सुप्रिया वर्मा आणि जया मेनन या दोन पुरातत्त्वज्ञांनी सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने ASI च्या खोदकामाचे निरीक्षण केले होते. २०१० मध्ये त्यांनी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये लिहिलेल्या एका लेखात ASI चे निष्कर्ष मान्य नसल्याचे व त्यामागे काय कारणे आहेत हे सविस्तर लिहिले होते. या लेखानुसार, ASI ने खोदकामात वापरलेल्या विविध पद्धतींनाच या द्वयीने हरकत घेतली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार “ASI पुरातत्त्वज्ञांच्या मनामध्ये आधीपासून काही कल्पना ठाम असल्याचे स्पष्ट असल्याचेच दिसून येत होते.”

या लेखकांच्या मते देशातील संशोधकांवर ASI च्या असलेल्या वर्चस्वामुळे अहवालाला फारसे कुणीच आव्हान दिले नाही. “भारतातील किंवा भारताबाहेरील कोणत्याही संशोधकाला एखाद्या ठिकाणाचे संशोधन करायचे असेल, तिथे खोदकाम करायचे असेल तर ASI कडून परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे कोणतेही पुरातत्त्वज्ञ त्यांच्या किंवा त्यांच्या जुन्यापुराण्या पद्धतींच्या विरोधात बोलण्यास इच्छुक नसतात.”

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या वर्मा यांनी हफिंग्टन पोस्टशी बोलताना आपल्या निरीक्षणांबाबत सांगितले. त्या म्हणाल्या, “आजही, बाबरी मशिदीच्या खाली मंदिर असल्याचा कोणताही पुरातत्त्वशास्त्रीय पुरावा नाही.” त्यांच्या मते, “बाबरी मशिदीच्या खाली, प्रत्यक्षात जुन्या मशिदी होत्या.”

ASI ने मंदिर अस्तित्वात होते असे म्हणण्यासाठी ज्या तीन पुराव्यांचा वापर केला ते वर्मा यांच्या मते शंकास्पद आहेत.

  • पश्चिमेकडची भिंत: “पश्चिमेची भिंत हे मशिदीचे वैशिष्ट्य आहे. त्या भिंतींच्या समोर नमाज पढला जातो. ते देवळाचे वैशिष्ट्य नाही. देवळाची संरचना खूप वेगळी असते.”
  • पन्नास खांबाचे पाय: “हे पूर्णपणे काल्पनिक आहे आणि आम्ही न्यायालयामध्ये त्याबद्दल अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. ते ज्यांना खांबांचे पाय म्हणतात ते तुटलेल्या विटांचे तुकडे आहेत आणि त्यांच्या आतमध्ये चिखल आहे.”
  • वास्तुशास्त्रीय अंश: “या १२ [सर्वात महत्त्वाच्या वास्तुशास्त्रीय अंशां] पैकी कोणतेही खोदकामाच्या दरम्यान सापडले नव्हते. ते मशिदीच्या चुन्याच्या जमिनीवर पडलेल्या मलब्यामधून गोळा केले गेले होते… एका मंदिराचे, एका दगडी मंदिराच्या – ते दगडी मंदिर होते असेच म्हटले जाते – सामग्रीवर त्यांना जे काही मिळाले आहे त्यापेक्षा खूप जास्त कोरीव काम असायला हवे.”

१९८८ मध्ये विश्व हिंदू परिषदेने अयोध्या, मथुरा आणि वाराणसीमध्ये देवळे पाडली गेल्याचा मुद्दा उचलला. त्याच वर्षी बी. बी. लाल या ASI च्या तत्कालीन डायरेक्टर जनरल यांनी खांबांच्या पायांची छायाचित्रे घेतले जे त्यांच्या म्हणण्यानुसार १९७५ ते १९७८ या काळात अयोध्येमधून खोदकाम करून मिळवले होते. त्यांनी ही छायाचित्रे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियतकालिक असलेल्या मंथन मध्ये छापली तसेच वर्ल्ड आर्किओलॉजिकल काँग्रेसमध्येही सादर केली.

यातूनच भाजपला बाबरी मशिदीचा मुद्दा घेऊन मोठी राजकीय चळवळ उभारता आली, त्यातूनच १९९२ मध्ये मशिद पाडली गेली. १९९९ मध्ये रालोआचे सरकार आल्यानंतर खोदकामाचा विषय पुन्हा चालू झाला आणि २००२ मध्ये अलाहाबाद न्यायालयाने खोदकाम करण्याचा ASI ला आदेश दिला.

ASI चा शंकास्पद अहवाल

वर्मा यांच्या मते ASI ने अंतिम अहवालात अनेक मुद्दे वगळले आहेत. हफिंग्टन पोस्टशी बोलताना त्या म्हणाल्या, “तुम्ही संपूर्ण अहवाल वाचला तर त्यात कोणत्याही मंदिराचा उल्लेख नाही…तो एक साधारण अहवाल आहे. मात्र हाडे आणि मानवी सापळ्यांचे अवशेष याबद्दलचे प्रकरण गायब आहे. त्यांना ते सापडले, पण त्यांनी ते प्रकाशित केले नाही.

तसेच इतर प्रकरणे लिहिणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत, परंतु निष्कर्षामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही. आणि निष्कर्षामध्ये, अहवालाच्या अंतिम परिच्छेदामध्ये, ते म्हणतात, ही पश्चिमेकडची भिंत, खांबांचे पाय आणि काही वास्तुशास्त्रीय अंश हा पुरावा पाहता बाबरी मशिदीच्या खाली मंदिर होते. अक्षरशः तीन ओळींमध्ये हा निष्कर्ष दिला आहे. बाकी पूर्ण चर्चेमध्ये मंदिर सापडल्याची काहीही चर्चा नाही. खरे तर तोच पुरावा घेऊन आम्ही या निष्कर्षाप्रत आलो आहोत, की बाबरी मशिदीच्या खाली प्रत्यक्षात लहान लहान मशिदींचे दोन किंवा तीन टप्पे होते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: