कोविडच्या दुसऱ्या लाटेत भाजपच्या ९ नेत्यांची मुक्ताफळे

कोविडच्या दुसऱ्या लाटेत भाजपच्या ९ नेत्यांची मुक्ताफळे

हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या महासाथीचे गांभीर्य आपल्या सत्ताधारी नेत्यांमध्ये दिसत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पूर्णपणे अभाव या नेत्यांच्या एकूण वर्तनात दिसून आला आहे. त्यांच्याकडून केली जाणारी विधाने ही वास्तवाला नाकारून अत्यंत असंवेदनशील स्वरुपाची असून यातून कोरोना महासाथीविरोधातील आपली लढाई अधिक बिकट होत जाणार आहे.

दिवस बदलत असतात – ठाकरेंचा इशारा
पिगॅसस खरेदीः मोदी सरकार देशद्रोही – काँग्रेसचा आरोप
मोठा कट उघड : भाजप पदाधिकाऱ्याला अटक

कोविड-१९ ही जागतिक महासाथ आहे असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने ४१५ दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात आपण कोरोनाला २१ दिवसांत जिंकायचे आहे, असे वक्तव्य केले होते. या भाषणाला आता ३९० दिवस झाले आहेत. पण आता कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट दिसत असताना देशात गेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट कोरोना बाधित- सुमारे २० लाख- रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या काही दिवसांत अधिक वेगाने वाढण्याचीही भीती आहे.

हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या महासाथीचे गांभीर्य आपल्या सत्ताधारी नेत्यांमध्ये दिसत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पूर्णपणे अभाव या नेत्यांच्या एकूण वर्तनात दिसून आला आहे. त्यांच्याकडून केली जाणारी विधाने ही वास्तवाला नाकारून अत्यंत असंवेदनशील स्वरुपाची असून यातून कोरोना महासाथीविरोधातील आपली लढाई अधिक बिकट होत जाणार आहे. द वायरने गेल्या दोन महिन्यांत भाजपच्या काही नेत्यांची या कोरोना महासाथीमधील वादग्रस्त, अवैज्ञानिक, विरोधी पक्षांवर टीका करणारी विधाने वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • कोरोना महासाथीच्या अंतिम टप्प्यावर आपण आहोतः केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन

७ मार्चला जेव्हा भारतात कोरोनाची लाट हळूहळू पसरत होती तेव्हा आपल्या देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कोविड विरोधातील आपली लढाई जवळपास संपुष्टात आल्याचे विधान केले होते. आपण ही लढाई संपवत आलो आहोत पण तीन महत्त्वाची पावले आपल्याला उचलावी लागणार आहेत. एक म्हणजे कोविड लसीकरण मोहिमेपासून राजकारणाला दूर ठेवणे, दुसरे कोविडच्या लसीमागच्या विज्ञानावर विश्वास ठेवणे, आणि तिसरे, आपल्या जवळच्या निकटच्या सर्वांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्नशील असणे, असे ते म्हणाले होते.

हर्ष वर्धन यांनी मार्चमध्येच कोरोनाची लढाई संपुष्टात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यांना बहुतेक कोरोना विषाणूत बदल झाले आहेत, होत आहेत, याची कल्पना नसावी.

पण हर्ष वर्धन यांना डिसेंबर २०२०मध्ये जगात अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने धडकली होती, याची माहिती असणे गरजेचे होते. दुसरी बाब म्हणजे मार्चमध्ये भारताचा लसीकरण कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. त्याने संपूर्ण लोकसंख्या लसीकरणाच्या कवेत घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यांच्या अशा बेजबाबदारपणामुळे हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्याला परवानगी मिळाली. त्या बरोबर संपूर्ण एप्रिल महिना हा निवडणूक प्रचारांसाठी देण्यात आला.

सध्या देशातल्या लसीकरणाचा वेग पाहिला असता या वर्षाअखेर देशातील ७० टक्के लोकसंख्येला लस देण्यात येणार आहे. त्यामुळे हर्ष वर्धन कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे असा दावा करतात तेव्हा त्यांच्या दाव्यातील फोलपणा दिसून येतो.

  • ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात असली पाहिजेः पियुष गोयल

कोरोनाच्या दुसर्या महाभयंकर लाटेमुळे सर्वत्र ऑक्सिजनची तीव्र टंचाई दिसू लागली असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण हवे असे वक्तव्य करतात. राज्य सरकारांनी ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवावे. मागणीचे व्यवस्थापन हे पुरवठा व्यवस्थापनाएवढेच महत्त्वाचे असते. सध्याची कोविडची परिस्थिती पाहता प्रत्येक राज्याची ती जबाबदारी आहे, असे गोयल एएनआयला म्हणाले होते. जर मागणी वेगाने वाढून ती हाताबाहेर गेल्यास देशातल्या आरोग्य व्यवस्थेपुढे ते मोठे आव्हान असेल. आम्ही राज्य सरकारच्या मदतीसाठी आहोत पण राज्यांनी ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवावे असे ते म्हणाले. आपल्याकडे ऑक्सिजनच्या अतिवापराची व तो वाया जात असलेली आकडेवारी आली असल्याचेही ते म्हणाले होते.

गोयल यांचे वरील विधान सोशल मीडियावर टीकेस पात्र ठरले होते. #TooMuchOxygen हा ट्विटर हॅशटॅग गोयल यांच्या विधानाची टिंगल उडवणारा होता.

Scroll ने एका शोधपत्रकारिता केलेल्या वृत्तात केंद्राने ८ महिन्यांपूर्वी १६२ नवे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात ११ प्रकल्प उभे राहिले असून त्यापैकी केवळ ५ सुरू असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात गोयल यांनी भारत हा जगातील पहिला कोविडमुक्त देश असेल असे वक्तव्य केले होते. कारण भारताची १३० कोटी जनता ही महत्त्वाकांक्षी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

  • अशी गर्दी पूर्वी कधीही पाहिली नव्हतीः मोदी

आसाममध्ये आसनसोल येथील निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी गर्दी आपण पूर्वी कधी पाहिली नव्हती असे विधान केले होते. वास्तविक कोरोनाच्या काळात प्रचंड गर्दी होणेच ही साथ पसरण्याला आमंत्रण देणारी आहे. पण मोदींनी गर्दीला उद्देशून बोलताना, जिकडे पाहतो तिकडे माणसे, माणसे दिसत आहेत असे म्हटले. या सभेला हजारो लोकांनी मास्क घातलेला नव्हता. मोदींच्या प. बंगाल, आसाम, तामिळनाडू येथील भाषणांमध्ये गर्दी दिसून आली. पण त्यांनी अशा गर्दीवर भाष्य केले नाही. कोरोनाची परिस्थितीवर सरकार नियंत्रण आणत असल्याचे ते बोलत होते. पण गर्दी व कोरोना यांचा संबंध ते सांगत नव्हते.

  • महासाथ संपली आहे, मास्क वापरण्याची गरज नाहीः हिमंता बिस्वा सरमा

आसामचे आरोग्यमंत्री व भाजपचे आसाममधील एक बडे नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी एप्रिलमध्ये जेव्हा कोरोनाचा संसर्ग देशभर वाढत होता तेव्हा कोरोनाची महासाथ संपली असून मास्क वापरण्याची गरज नाही असे वक्तव्य केले होते. आसाममधील कोरोना संपला आहे, येथे कोणीही मास्क वापरू नये. जर त्याची गरज असेल तर ते मी सांगेन, असे सरमा म्हणाले होते.

  • माँ गंगेचे आशीर्वाद असल्याने कोरोना होणार नाहीः तीरथ सिंग रावत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री व भाजपचे एक नेते तीरथ सिंग रावत यांनी माँ गंगेचे आशीर्वाद असल्याने कोरोना पसरणार नाही असे वक्तव्य कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर केले होते. कोरोना व मरकजचा संबंध नाही असेही ते म्हणाले होते. कुंभ मेळा हा माँ गंगेच्या किनार्यावर होत असून तिचा आशीर्वाद प्रवाहाबरोबर वाहत असतो त्यामुळे येथे कोरोना पसरणार नाही, असे त्यांचे विधान होते.

  • कष्ट करणार्या भाजप कार्यकर्त्यांना कोविड होत नाहीः गोपाल पटेल

गुजरातमधील भाजपचे आमदार व राज्याचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री गोपाल पटेल यांनी कष्ट करणार्या भाजप कार्यकर्त्यांना कोविड-१९ होत नसून ते पूर्ण सुरक्षित असल्याचे विधान केले होते. मात्र याच पटेल यांना काही महिन्यांपूर्वी कोविड-१९ची लागण झाली होती.

  • कोविडविरोधातील भारताची लढाई जगाला प्रेरणादायीः मोदी

फेब्रुवारीमध्ये नरेंद्र मोदी यांनी कोविडविरोधातील भारताची लढाई जगाला प्रेरणादायी असल्याचा दावा केला होता. कोविड पसरला तेव्हा भारताचे कसे होणार यावर जग चिंताक्रांत होते. पण भारताची कोविड-१९ विरोधातील लढाई ही जगाला प्रेरणादायी असून भारताचा मानव केंद्री दृष्टिकोन हा जगासाठी चांगला आहे असे ते म्हणाले होते. मोदींच्या या वक्तव्यानंतर दोन महिन्यांनी भारतातील दैनंदिन कोविड रुग्णांची संख्या जगात सर्वाधिक होती.

  • कोरोनील कोविडवरील सहाय्यकारीः हर्ष वर्धन, गडकरी

योग गुरू रामदेव बाबा यांच्या कोरोनील या आयुर्वेद औषधाची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन व केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली. कोरोनील हे कोरोनावरचे औषध असल्याचा दावा रामदेव बाबा यांचा होता. त्याचे पुरावे असल्याचे दावे त्यांनी सांगितले होते. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने आपले पुरावे मान्य केल्याची थापही रामदेव बाबा यांनी मारली होती. पण आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने हा दावा फेटाळला होता.

 वय झाले की मरण येतेचः प्रेम सिंग गोयल

भाजपचे मध्य प्रदेशमधील मंत्री प्रेम सिंग गोयल यांनी भारतातील कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूंचा आकडेवारीवर भाष्य करताना माणसाचे वय झाल्यानंतर त्याला मृत्यू येतोच असे विधान केले होते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0