सीसीटीव्हीतून २४ तास पाळत; साईबाबा यांचा अन्नत्यागाचा इशारा

सीसीटीव्हीतून २४ तास पाळत; साईबाबा यांचा अन्नत्यागाचा इशारा

सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे
इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र
पुरावे नष्ट करण्यासाठी जामियातले सीसीटीव्हीही पोलिसांनी फोडले

नवी दिल्लीः माओवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणात नागपूरमध्ये अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील माजी प्रा. जीएन साईबाबा यांनी अन्नत्याग करण्याचा इशारा दिला आहे. साईबाबा यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी तुरुंग प्रशासनाने त्यांच्या संडास व बाथरूममध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. ही पाळत बंद करावी, सीसीटीव्ही काढून टाकावेत, अन्यथा अन्नत्याग करू असा इशारा साईबाबा यांनी दिला आहे. सीसीटीव्ही काढण्याच्या संदर्भात साईबाबा यांची पत्नी व भावाने महाराष्ट्राचे गृहमंत्री वळसे-पाटील यांना पत्र लिहिले आहे.

साईबाबा यांना पिण्याच्या पाण्याची बाटलीही कारागृह प्रशासनाने देण्यास मनाई केली आहे. या विरोधात साईबाबा यांच्या वकीलांना दाद मागितली आहे.

साईबाबा यांची पत्नी वसंता कुमारी व भाऊ जी. रामदेवुदूने गेल्या आठवड्यात मंगळवारी पत्र लिहिले आहे. या पत्रात साईबाबा यांना ठेवलेल्या अंडासेलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्या कॅमेऱ्यांतून संडास व बाथरूममध्ये पाळत ठेवण्यात येते. या कॅमेऱ्यांमुळे साईबाबा यांना संडास व आंघोळीलाही जाता येत नाही, ही पाळत २४ तास असल्याने अशा परिस्थितीत ते कसे राहतील अशी तक्रार या पत्रात मांडण्यात आली आहे. २४ तास पाळत ठेवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे साईबाबा यांना मदत करणाऱ्यांमध्येही भीती निर्माण झाली असून आपण कॅमेऱ्यामध्ये दिसू व त्याने पुढे काही कायदेशीर प्रश्न निर्माण होतील अशी भावना मदत करणाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तुरुंग प्रशासनाची ही कृती धमकावणे, भय निर्माण करणे व अपमान करण्याची आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास अखंड पाळत ठेवण्यामुळे साईबाबा यांचे व्यक्तिगत जीवन, खासगीपण व स्वातंत्र्य याचाही संकोच झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

साईबाबा यांना हृदयासंदर्भात काही आजार असून त्यांना रक्तदाब, पक्षघातासह अनेक आजार आहेत. त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचारही मिळत नाहीत, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. साईबाबा यांच्या ९० टक्के शारीरिक क्षमता नष्ट झाल्या असून ते व्हीलचेअरवर असतात.

२०२०मध्ये साईबाबा यांनी पुस्तके, कपडे व औषधे मिळत नसल्याच्या कारणावरून तुरुंगात अन्नत्याग केला होता.

२०१७मध्ये साईबाबा यांना माओवादी गटांशी संबंध ठेवल्याप्रकरणी गडचिरोली येथील स्थानिक न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.

मूळ बातमी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: