लोकराजाची स्मृतीशताब्दी

लोकराजाची स्मृतीशताब्दी

शुक्रवार ६ मे २०२२ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी आहे. 

खनिज समृद्ध पण गरीब अफगाणिस्तान
उत्तरप्रदेश जिंकला तरी भाजपचा पराभवच होणार!
भयमुक्तीचे आग्रही स्वगत

२६ जून १८७४ रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला आणि ६ मे १९२२ रोजी ते कालवश झाले. युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते. ‘एक वेळ गादी सोडून देईन पण बहुजनोद्धाराचे कार्य सोडणार नाही’, असे म्हणणारे ते दुर्मीळ राजे होते.

छत्रपती शाहू महाराजांना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे कुर्मी समाजाने २५ एप्रिल १९१९ रोजी ‘राजर्षी ‘ही पदवी दिली. तसेच शाहू महाराज प्रमुख पाहुणे आणि पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या ‘माणगाव परिषदे’चेही हे शताब्दी वर्ष झाले. शाहूरायांच्या कोल्हापूर संस्थानातील ‘माणगाव’ येथे २१ व २२ मार्च १९१९ रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली होती.

फुले, शाहू व आंबेडकर ही विचारपरंपरा मानवतेच्या सूत्राने गुंफलेली आहे. माणगाव परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘पंडित’ आणि ‘विज्ञानाचे भूषण ‘असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. तसेच अस्पृश्यांना ‘आपल्या जातीचा पुढारी करा’ असे आवाहनही केले आणि डॉ आंबेडकर यांना आपला पुढारी निवडल्याने ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत हा आशावाद व्यक्त केला. आपल्या या भाषणात त्यांनी करवीर संस्थानात अस्पृश्यांवर अन्याय करणारी हजेरीची पद्धत का नष्ट केली हेही सांगितले. आणि वेठबिगारी पद्धतीलाही नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला. अस्पृश्य वर्गाकरिता आपण केलेले प्रयत्न बाबूराव यादव यांनी छोट्याशा पुस्तिकेद्वारे नोंदवून ठेवल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली आपल्या संस्थानातील शेकडा ५० टक्के जागा नोकरीसाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला होता. तसेच त्या भरल्याचा अहवाल दर तीन महिन्यांनी ते तपासत असत. कुस्ती आणि शिकार यासाठी लागणारे शरीर सामर्थ्य, राजकारण व राज्यकारभार यासाठी आवश्यक असणारा मुत्सद्दीपणा , दूरदर्शीत्व, योग्य माणसांची पारख, गुणग्राहकता, नाट्यकला यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती, धर्म व समाजसुधारणेसाठी लागणारी क्रियाशीलता, सत्ता व संपत्तीचा लोकोद्धारासाठी वापर करण्याची तळमळ, विषमता नष्ट करून समतेची प्रस्थापना करण्यासाठी सर्व पावले उचलण्याची क्षमता अशा अनेक गुणांनी राजर्षी शाहूंचे व्यक्तिमत्व समृद्ध बनले होते.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने २००३ सालापासून शाहूराजांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे कारण महाराजांनी समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचे कृतिशील कार्य केले. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्व लोकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, राष्ट्रीय एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता राखण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे वचन आहे. यासाठी राज्यघटनेत मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये समाविष्ट केली आहेत. ज्याची सुरुवात राजर्षिनी आपल्या राज्यकारभारात केली होती. शाहू राजांना समता अभिप्रेत होती आणि त्यासाठी ते आग्रही होते. त्यांची भूमिका स्पष्ट होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू राजांचे विचार एकमेकास पूरक होते. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाबाबत म्हटले होते की, समतावादाचे ध्येय सर्वांना समतेने वागवणे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय असताना सर्वांना समतेने वागवून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही व्यक्तींना समानतेने वागवल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समता प्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणे होय.’ समानांच्या मध्ये समता नांदू शकते. असमानांना समान मानणे म्हणजे विषमता जोपासणे होय. हे लक्षात घेतले की राजर्षी राज्यकारभाराची सूत्रे सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी किती गांभीर्याने राबवत होते हे लक्षात येते.

कागलकर जयसिंगराव घाटगे यांचे ते सुपुत्र.१८८४ साली शाहू राजेंना दत्तक घेतले गेले. १८९४ साली त्यांनी प्रत्यक्ष राजसूत्रे स्वीकारली. या घटनेचे लोकमान्य टिळकांनी ‘दुग्धशर्करा योग ‘म्हणून वर्णन केले होते. त्यापूर्वी गाजलेल्या बर्वे प्रकरणात कागलकर जयसिंगराव घाटगे म्हणजे शाहूराजांचे वडील, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी एकमेकांना मदत केली होती. नंतर शाहू महाराजांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद स्वीकारून संस्थेला मोठी मदत केली होती.

वेदोक्त प्रकरणात लोकराजे आणि लोकमान्य यांचे संबंध दुरावले. यात अर्थातच छत्रपती शाहू महाराजांची भूमिका बरोबर होती. पुढे महाराजांनी सनातन्यांशी दोन हात करण्यासाठी सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही भरीव स्वरूपाचे काम केले. अनेक वसतिगृहे उभारली. फी माफी, विद्यावेतन, सक्तीचे शिक्षण, राजाराम कॉलेजची स्थापना याद्वारे शैक्षणिक चळवळ गतिमान केली. आपले संस्थान सर्वार्थाने सुजलाम -सुफलाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसराची जी समृद्धी दिसते आहे त्यात शाहूराजांच्या दूरदृष्टीचा फार मोठा वाटा आहे. तसेच त्यांनी संस्थानाबाहेरही विपुल काम केले, अनेकांना मदत केली. विधायक कामे उभी केली.

लोकराजे शाहू महाराजांनी राधानगरी धरणापासून ते चहाच्या मळ्यापर्यंत आणि लहानमोठ्या उद्योगधंद्यापासून ते दलित माणसाच्या चहाच्या टपरीपर्यंत फार मोठे सर्वांगीण विकासाचे काम केले. अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतही त्यांनी मोठी कामगिरी केली. ‘राजर्षी शाहू: वसा आणि वारसा’ ही कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेली पुस्तिका इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीने डिसेंबर १९९७ मध्ये प्रकाशित केली होती. त्याच्या समारोपात कॉ. पानसरे लिहितात ‘…सामाजिक समतेसाठी शाहू महाराजांनी संघर्ष केला. ती सामाजिक समता अजून प्रस्थापित व्हायची आहे. सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आपणास नव्या जोमाने, नव्या विचाराने चालू ठेवला पाहिजे….जयजयकाराच्या गदारोळात विचारांची पीछेहाट होऊ नये, प्रतिमांचे पूजन करतांना विचारांचे दफन होत नाही, याची दक्षता घ्यावी. प्रतिमा पुजावी पण तेवढेच करून थांबू नये. महाराजांचा विचार समजून घ्यावा, पण तेवढेच करून थांबू नये, तर त्या विचारांआधारे कार्य करावे, राजर्षी शाहू महाराज हा एक कार्यकर्ता राजा होता हे लक्षात ठेवावे.”

अशा या बुलंद व्यक्तिमत्वाच्या आणि दिलदार पण पहाडी काळजाच्या राजाचा पुतळा भारताच्या संसदेच्या प्रांगणातही १७ फेब्रुवारी २००९ रोजी दिमाखात उभा करण्यात आला आहे. लोकशाहीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात या राजाचा पुतळा उभा होतो यातच त्यांचे लोकराजेपण स्पष्ट होते. वयाच्या अवघ्या ४८ व्या ते कालवश झाले. इतिहासाच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशी उक्ती आणि कृती केलेल्या या लोकराजाला स्मृतीशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन…|

प्रसाद कुलकर्णी, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0