दिवाळीऐवजी भाजपचा ‘जश्न-ए-द्वेष’

दिवाळीऐवजी भाजपचा ‘जश्न-ए-द्वेष’

एका हिंदुत्ववादी कार्यकर्तीने स्त्रियांनी टिकली न लावल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे आणि दिवाळीचा उल्लेख 'प्रेमाचा व प्रकाशाचा उत्सव’ असा करणाऱ्यांच्या माथी या सणाच्या 'अहिंदूकरणाचे’ पातक लादले आहे.

अंगणवाडी सेविकांना २ हजार भाऊबीज भेट
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; २८ टक्के महागाई भत्ता
दिव्यांचा अंधःकार

तेजस्वी सूर्या हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. शिवाय ते एक चिडखोर आणि धर्मांध तरुण आहेत. ‘दहशतवादाला धर्म नसतो. पण दहशतवाद्यांना नक्कीच धर्म असतो आणि तो बहुतेकदा इस्लाम असतो’ अशा अर्थाचे त्यांनी गेल्या वर्षी केलेले ट्विट त्यांच्याच पक्षाच्या सरकारलाही प्रक्षोभक वाटले होते आणि सरकारने ते मागे घेण्यास ट्विटरला सांगितले होते.

आता सूर्या यांनी ‘फॅबइंडिया’ या नामवंत ब्रॅण्डवर ‘जश्न-ए-रिवाज’ या उर्दू वाक्प्रचाराचा उपयोग केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. या वाक्प्रचाराचा अर्थ होतो ‘परंपरा साजरी करणे’. यातील परंपरेसाठी वापरलेल्या उर्दू शब्दाचे स्पेलिंग ‘ravaaj (रवाज)’ असे असायला हवे होते, ‘riwaaz’ नव्हे, पण ती बाब वेगळी. ही दिवाळीच्या सणासाठी केलेली जाहिरात होती.

सूर्या यांनी केलेल्या या ट्विटमध्ये अनेक धक्कादायक बाबी आहेत. भाषा (उर्दू) आणि धर्माचा (सूर्या यांच्या भाषेत ‘अब्राह्मनायझेशन’) संबंध जोडण्यातील आळशीपणा आणि धार्मिक विद्वेष ही त्या धक्कादायक बाबींपैकी एक. या जाहिरातीतील कपडे आणि ते घालणाऱ्या मॉडेल्स यांवर त्याने असाच विचित्र आक्षेप घेतला आहे. मॉडेल्सपैकी तिघी साडीत आहेत, एक कुर्ता-पायजमामध्ये आहे, तर एक सलवार-कमीजमध्ये आहे. हे भारतीय पोशाख नाहीत असा दावा सूर्या यांनी केला आहे.

उर्दू ही भारतातील अधिकृत मान्यता असलेल्या भाषांपैकी एक आहे आणि तिचे ‘मूळ’ खऱ्या अर्थाने ‘भारतात’ आहे. सूर्या यांनी जाहिरातीवर आक्षेप घेणारे ट्विट ज्या इंग्रजी भाषेत केले आहे, तिचे मूळ भारतात नाही. उर्दू शब्दांचे उच्चार चुकीचे केले जात असले, तरी बॉलिवूडसाठी ही प्रमुख भाषांपैकी एक आहे. मुघलांनी दिवाळीचे वर्णन करण्यासाठी ‘जश्न-ए-चरागन’ अर्थात दिव्यांचा उत्सव हा वाक्प्रचार वापरला होता.

आता सलवार-कमीज आणि कुर्ता या वस्त्रप्रकारांचे मूळ कदाचित भारतामध्ये नाही हे सर्वांना माहीत असले, तरी आधुनिक वस्त्रांशी धार्मिक ओळख जोडणे हे अत्यंत हास्यास्पद आणि आक्रमक आहे हे आपल्यापैकी बहुतेकांना मान्य होईल (पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याशी कदाचित सहमत नसतील). आणकी एका हिंदुत्ववादी कार्यकर्तीने स्त्रियांनी टिकली न लावल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे आणि दिवाळीचा उल्लेख ‘प्रेमाचा व प्रकाशाचा उत्सव’ असा करणाऱ्यांच्या माथी या सणाच्या ‘अहिंदूकरणाचे’ पातक लादले आहे. या ताईंनी आपल्या बंदुकांमधील दारूगोळा पंतप्रधान कार्यालयांतूनच भरून घ्यावा, अशी सूचना मी करेन. कारण, दिवाळीचे वर्णन ‘प्रकाशाचा उत्सव’ असे करायला पंतप्रधान कार्यालयाची काहीच हरकत नाही. स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या देशांमधील भारतीय वकिलाती दिवाळीचे वर्णन नेहमीच ‘फेस्तिवल दे ला ल्युशेस’ करतात. भाजपने या वकिलातींनाही मेमो पाठवायला हवा.

ही जाहिरात त्वरेने मागे घेण्याच्या ‘फॅब इंडिया’च्या निर्णयाचे मला वाईट वाटले पण आश्चर्य वगैरे वाटले नाही. ‘जश्न-ए-रिवाज’ हे मुळी दिवाळीचे वर्णन नव्हतेच हा त्यांचा दावाही पळपुटेपणाचाच वाटतो. मोठे भारतीय ब्रॅण्ड्स आणि कंपन्या हिंदुत्ववादी विद्वेषापुढे डगमगून जात आहेत हे सत्य आहे. गेल्या वर्षी ‘टाटा समूहा’च्या ‘तनिष्क’ या ब्रॅण्डनेही मिश्रसमुदायांच्या घरातील संस्कृतीचे दर्शन घडवणारी एक सुंदर जाहिरात याच कारणाने मागे घेतली होती. याउलट, मुस्लिम मुलगा व हिंदू मुलगी यांच्या पार्श्वभूमीवर होळीचे चित्रण करणाऱ्या ‘सर्फ एक्सेल’ या ब्रॅण्डच्या एका हृदयस्पर्शी जाहिरातीवरही विद्वेषपूर्ण हल्ला झाला होता. मात्र, या ब्रॅण्डने या हल्ल्याचा धैर्याने सामना केला. कदाचित ‘सर्फ एक्सेल’ हा ब्रॅण्ड ‘एचयूएल’सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीचा होता हा भेदाचा मुद्दा असावा.

‘फॅबइंडिया’ आणि ‘तनिष्क’ या ब्रॅण्ड्सने या वादात न पडण्याचा मार्ग अवलंबला, यामागील कारण त्यांच्या जाहिराती विचित्र होत्या किंवा त्या जाहिरातींमुळे ग्राहक दूर जाण्याचा धोका होता हे खचितच नव्हते. त्यांनी माघार घेतली, कारण, भारतामध्ये सगळे काही कायद्यानुसार होत नाही हे त्यांना चांगले माहीत आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते सहजपणे दमदाटी व हिंसा करू शकतात आणि त्याचा फटका त्यांच्या दुकानांना व कर्मचाऱ्यांना बसू शकतो हे या ब्रॅण्ड्सना चांगलेच माहीत आहे. यात पोलीस कार्यकर्त्यांना हवी ती मदत करतील हेही आले. हिंदुत्ववादी विचारांच्या विरुद्ध दिशेने उभे राहिल्यास विविध मार्गांनी लक्ष्य केले जाऊ शकते हे त्यांना माहीत आहे. त्रास देण्याचे अनेक मार्ग आहेत: ‘भावना दुखावल्याप्रकरणी’ पोलीस केस केली जाऊ शकते, करविषयक छापा पडू शकतो, प्रवर्तन संचालनालय एखाद्या क्षुल्लक तक्रारीवरून समन्स जारी करू शकते. कंपनी आणि तिच्या मालकांना न्यायालयीन कितीतरी वर्षे न्यायालयीन लढाई लढत बसावी लागू शकते.

त्यामुळे ‘फॅबइंडिया’ आणि अन्य काही ब्रॅण्ड्सवर भित्रेपणाची टीका करण्याचा मोह पडला तरी तो आवरला पाहिजे आणि आपला राग योग्य दिशेला वळवला पाहिजे. योग्य दिशेला म्हणजे केवळ सूर्या आणि अन्य हिंदुत्ववादी ट्रोल्सकडे असे नाही, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय नेतृत्वाकडे. हिंदू आणि हिंदुत्व धोक्यात आहे हे देशातील हिंदूंना पटवून देण्याचे काम हेच लोक गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. हिंदुत्ववादी प्रचाराने ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘यूपीएससी जिहाद’ आणि ‘व्हेंडर जिहाद’ यांसारख्या द्वेषपूर्ण संकल्पना यापूर्वीच आणल्या आहेत आणि आता त्यांच्या हाती ‘अॅड जिहाद’ नावाचे नवीन कोलीत सापडले आहे. हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करायची आणि त्यातून भारतातील अल्पसंख्याक समुदाय व बहुसंख्य हिंदू यांच्यातील दुही वाढवत न्यायची हेच त्यांचे लक्ष्य आहे.

सूर्या यांनी एका उर्दू वाक्प्रचारावर सहज हल्ला चढवला, कारण, उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात हेच केले होते आणि त्याची पावती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘उत्तम प्रशासना’बद्दल त्यांचे कौतुकही केले होते. भाजपने जन्माला घातलेल्या या विचित्र राजकीय अन्नसाखळीत, जे राजकीय नेते मुस्लिम, इस्लाम आणि ‘अब्राह्मणी’ पंथांवर जास्तीतजास्त हल्ला, चढवतील ते पक्षातील उतरंडीत वेगाने वर चढत जाणार हे नक्की. हा विकार नाहीसा करणे भारतासाठी अत्यावश्यक आहे.

मूळ लेख:  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: