काँग्रेसला झटका; जितीन प्रसाद भाजपमध्ये

काँग्रेसला झटका; जितीन प्रसाद भाजपमध्ये

नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे युवा नेते जितीन प्रसाद यांनी बुधवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. उ. प्रदेशातील आगामी

राज्याच्या संमतीविना ‘आयएएस’ना केंद्रात घेण्याचा प्रस्ताव
प्रश्न: आपले आणि आमदारांचे – ४
सोनियांची विरोधी पक्षांना एकजुटीची हाक

नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे युवा नेते जितीन प्रसाद यांनी बुधवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. उ. प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा झटका समजला जात आहे. जितीन प्रसाद काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटचे समजले जात होते. गेल्या वर्षी काँग्रेसमधून ज्योतिरादित्य शिंदे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वर्षभरात प्रसाद हे आणखी एक नेते पक्षातून बाहेर पडले आहेत.

बुधवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल व भाजपचे खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत प्रसाद यांना दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात भाजप सदस्यत्वाची शपथ दिली.

भाजपमध्ये प्रवेश घेण्याआधी जितीन प्रसाद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

जितीन यांच्या भाजप प्रवेशानंतर उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने राज्यातील भाजपची शक्ती अधिक वाढली असल्याचे म्हटले आहे.

असंतुष्ट नेता

काँग्रेसमध्ये सक्रीय अध्यक्ष हवा व पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर निवडणुका व्हावे अशी मागणी करणार्या २३ असंतुष्ट काँग्रेस नेत्यांमध्ये जितीन प्रसाद यांचे नाव होते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना हे पत्र पाठवल्यानंतर उ. प्रदेश काँग्रेसमध्ये जितीन यांच्याविरोधात गटबाजी सुरू झाली होती. काही दिवसांनी उ. प्रदेशच्या लखीमपुर खीरी जिल्हा काँग्रेस समितीने एक प्रस्ताव मंजूर करत जितीन प्रसाद यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यावरही वाद झाला होता.

जितीन प्रसाद हे पश्चिम उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणाच्या दृष्टीने  प्रभावशाली काँग्रेस नेता नव्हते. ते स्वतः सलग दोन लोकसभा निवडणुका व एक विधानसभा निवडणूक हरले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला निवडणुकांच्या दृष्टीने फारसा फरक पडेल याची शक्यता नाही. पण गेल्या तीन पिढ्या त्यांचे कुटुंब काँग्रेसशी जोडले गेले होते.

भाजपमध्ये प्रवेश करताना जितीन प्रसाद यांनी भाजप हा सच्चा राष्ट्रीय पक्ष असून तो देशहितासाठी कार्यरत असल्याचा दावा केला. आपण लोकांची मदत करू शकत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गेली अनेक वर्षे आपण काँग्रेसमध्ये कार्यरत होतो, त्यामुळे या पक्षाचा आपण ऋणी आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांचे आपण आभार मानतो पण आता आजन्म भाजप कार्यकर्ता म्हणून काम करत राहू, असे ते म्हणाले.

२००४च्या लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदा जितीन प्रसाद शाहजहांपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी ते यूपीए-१ सरकारमध्ये पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. त्यानंतर २००९मध्ये त्यांनी धौरहरा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे यूपीए-२ सरकारमध्ये त्यांना पुन्हा पेट्रोलियन, नैसर्गिक वायू, रस्ते परिवहन, महामार्ग, मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले.

पण २०१४मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकांत पराभव पत्करावा लागला. उ. प्रदेशच्या राजकारणातील एक ब्राह्मण जातीचा चेहरा म्हणून त्यांनी पुढे यायचा प्रयत्न केला होता. त्यादृष्टीने २०१७ची उ. प्रदेशातील विधानसभा निवडणुकांत त्यांनी तिलहर येथून निवडणूक लढवली. पण त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे २०१९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांनी धौरहरा येथून निवडणूक लढवली, त्याही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: