देशात कोरोनाचे नवे ७०४ रुग्ण, राज्यात चिंतेची परिस्थिती

देशात कोरोनाचे नवे ७०४ रुग्ण, राज्यात चिंतेची परिस्थिती

नवी दिल्ली/मुंबई : देशात सोमवारी कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ७०४ रुग्ण आढळले तर २८ जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत एकाच दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी असू

राज्यात विमानतळावर आणखी कडक निर्बंध
कोविड आरटीपीसीआर चाचण्या, लसीकरण वाढवण्याचे निर्देश
कोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज  

नवी दिल्ली/मुंबई : देशात सोमवारी कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ७०४ रुग्ण आढळले तर २८ जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत एकाच दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी असून महाराष्ट्रात १२० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण बाधितांची संख्या ८६८ वर पोहचली असून मुंबईत ६८ तर पुण्यात ४१ नवे रुग्ण मिळाले आहेत. राज्यात कोरोनाचे बळी ४० झाले आहेत त्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण २० असून उर्वरित मृत्यू ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींचे झाले आहेत.

कोरोनाची लागण झाल्याने मुंबईत वोक्हार्ट व जसलोक ही रुग्णालये सील करण्यात आली आहेत. वोक्हार्टमध्ये ३ डॉक्टर व २६ नर्स तर जसलोकमध्ये १० कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

तबलिग जमातमुळे देशात १४९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ४,०६७ असून मृतांचा आकडा १०९ इतका झाला आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान, आसाम, ओदिशा, आंध्र प्रदेश, उ. प्रदेश, गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

जगभरात ७० हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सुमारे सव्वा दहा लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली होती पण ते क्वारंटाइनमध्ये होते. त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या १० हजाराच्या जवळ गेली असून इटलीमध्ये १५,८८७, स्पेनमध्ये १२,६४१ रुग्णांचा अद्याप मृत्यू झाला आहे.

१५ एप्रिलला काही राज्यात रेल्वे, विमानसेवा, शैक्षणिक संस्था सुरू करण्याच्या हालचाली

देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊन संपल्यानंतर काही राज्यात १५ एप्रिलपासून रेल्वे व विमान वाहतूक सुरू करण्याविषयीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी एक सामूहिक रणनीती तयार केली असून त्याअंतर्गत कोरोना विषाणू संसर्गाची माहिती त्वरित मिळवणे, त्या भागाला संपूर्णपणे सील करणे, कोरोनाचा संसर्गाची शृंखला तोडणे व अन्य भागात कोरोना संसर्ग पसरू नये याची खबरदारी घेणे आदी बाबींवर विविध खात्यांमध्ये समन्वय, चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय रेल्वेने आपल्या १७ झोनमध्ये कोणत्या रेल्वे सेवा सुरू करता येतील, याची चाचपणी सुरू केली आहे, रेल्वेची सर्व यंत्रणा १५ एप्रिलपासून सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचेही समजते.

स्वस्त दरातील सेवा देणार्या एअर एशिया इंडियाने १५ एप्रिलपासून तिकीट बुकिंग सुरू करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. पण केंद्रीय नागरी उड्डाण खात्याने आदेश दिल्यानंतरच बुकिंग सुरू होतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत बुकिंग सुरू करणार नाही असे म्हटले आहे पण इंडिगो, स्पाइसजेट, गो एअर या अन्य विमान कंपन्या १५ एप्रिलपासून देशी विमान वाहतूक सुरू करण्यास तयार असल्याचे समजते. स्पाइसजेट व गो एअरने मे महिन्यात आंतरराष्ट्रीय तिकिट बुकिंग चालू करणार असल्याचे म्हटले आहे.

शैक्षणिक संस्थाही सुरू?

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी १४ एप्रिलपर्यंत देशातील परिस्थिती पाहून शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून १४ एप्रिलनंतर जरी शाळा, महाविद्यालये सुरू करता आली नाहीत तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे ते म्हणाले. देशात ३४ कोटी विद्यार्थी संख्या आहे जी अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी आहे, ही आपल्या देशाची संपत्ती आहे असे निशंक म्हणाले.

राज्यांशी समन्वय

गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. या संवादात राज्यांना कोरोना रोखण्यासंदर्भात विशेष कृतीकार्यक्रम राबवण्यास सांगितले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक राज्याची तयारी कितपत आहे, यावरही चर्चा झाली. लॉकडाऊन संपल्यानंतर कोणत्या भागातील जनजीवन सुरू करायचे यावर राज्यांनी आपापल्या पातळीवर जिल्हानिहाय निर्णय घ्यायचा आहे. महाराष्ट्रात १४ एप्रिल नंतर काही भागात जनजीवन सुरू करण्याविषयी विचार करता येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: