कोरोना आणि ऑनलाईन अध्यापनाची विवेकशून्यता

कोरोना आणि ऑनलाईन अध्यापनाची विवेकशून्यता

आज आपल्या आजूबाजूला अगदी बालवर्गाच्या मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण ऑनलाईन अध्यापन व अध्ययनात बुडून गेलेले दिसत आहेत. परीक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती, वैयक्तिक आकांक्षा, स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड, या सगळ्यांत शिक्षण आणि त्याचा मानवी आयुष्यातील उद्देश याचाच आपल्याला विसर पडला आहे.  शिक्षणाच्या मानवी आयुष्यातील उद्देशावर प्रकाश टाकणारा हा लेख.

भाजपशी निकटचे संबंध असलेले मनोज सोनी यूपीएससीचे नवे अध्यक्ष
५० वर्षांत भारतात ४ कोटी ५८ लाख महिला ‘बेपत्ता’
कमलनाथ सरकारचे भवितव्य आज ठरणार

आज जेव्हा कोरोना व्हायरसने आपण ‘गृहीत धरलेले’ जग हादरवून टाकले आहे आणि व्यापक प्रमाणावर मानसिक चिंता आणि अस्तित्वाची अनिश्चितता निर्माण केली आहे, अशा महत्वपूर्ण टप्प्यावर आपण शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ म्ह्णून अत्यंत वाईट पद्धतीने अयशस्वी ठरलो आहोत, याविषयी मला खेद वाटते. या गोंधळलेल्या क्षणी शिक्षणाचा अर्थ आणि उद्देश याविषयी पुनर्विचार करण्याऐवजी आपण केवळ ऑनलाइन अध्यापनासाठी योग्य अ‍ॅप्स कशी वापरायची जेणेकरून ‘सामाजिक अंतराच्या’  अडथळ्यावर विजय मिळवता येईल अशा तांत्रिक प्रश्नांना महत्व देताना दिसत आहोत. हे करणे म्हणजे कृत्रिमरीत्या ‘सर्वसामान्य पारिस्थिती’ असल्यासारखे दाखवणे आणि आपल्या आयुष्यात मूलभूतपणे काहीही बदलले नाही असा आव आणण्यासारखे आहे. म्ह्णूनच आपण तीच पाठ्यपुस्तके, तोच अभ्यासक्रम, तीच स्वगते, त्याच परीक्षा आणि त्याच असाइनमेंट या बरोबर यावेळी ऑनलाईन अध्यापन’ या  अद्भुत तंत्रज्ञानाच्या जोरावर पुढे जाऊ शकतो असे आपल्याला वाटत आहे.

कोरोना संबंधित मानसिक शोषणाची जाणीव करून घ्या. व्यक्तीला मृत्यू ही आता सांख्यिकी संकल्पना वाटत नाही. तो खरा आहे. त्याचे अस्तित्व इथे आहे. हा विषाणू कोणत्याही क्षणी आपल्या बंदिस्त समुदायात शिरू शकतो आणि आपल्याला आपणच खोकतोय आणि श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा परिस्थितीत सापडू शकतो. पण त्याचवेळी एक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लॅपटॉपवर त्याचे समाजशास्त्राचे प्राध्यापक ‘स्नोबॉल नमुना पद्धती’ आणि सामाजिक संशोधनाची ‘तंत्रे’ शिकवताना आढळतात. हे विवेकशून्य नाही का? किंवा, मध्यमवर्गीय कुटुंबातील बारा वर्षाच्या एका मुलाला टाळेबंदीमुळे एका लहान खोलीत अस्वस्थ आणि गुदमरल्यासारखे वाटत असूनही ‘ऑनलाइन अध्यापन’ पुढे जाणे आवश्यक असल्यामुळे ’त्याला कुटुंबात उपलब्ध असलेला एकमेव स्मार्टफोन वडिलांकडून उधार घ्यावा लागतो. त्यावर त्याचे गणिताचे शिक्षक त्यांना जीवन विरोधी ‘टक्केवारी’ किंवा ‘नफा-तोटा’ ही प्रकरणे पूर्ण करताना दिसतात, हे विवेकशून्य तर आहेच पण असंवेदनशील आहे. ही एक प्रकारची हिंसा आहे.

जर शिक्षण खरोखरच जीवनदायी आहे, तर शिक्षणाने तरुण मनांना जागृत केले पाहिजे. त्यांच्या जाणिवेतील सखोल पातळीवर जाऊन कोविड -१९ ने निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांना मानसिक सामर्थ्य दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर लयबद्ध संवाद निर्माण करून त्यांच्या समस्या आणि शंका समजून घेतल्या पाहिजेत. आत्ता भय सामान्य आहे, बळींना बदनाम केले जात आहे आणि ‘अंतर राखणे’ हे नवा परवलीचा (संभाषित) शब्द झाला आहे. अशा परिस्थितीत आपण स्वतःबरोबरचे आणि जगाबरोबरचे संबंध पुन्हा पारिभाषीत करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. आणि म्हणून आत्ता शाळेतील विद्यार्थी चतुर्भुजाची घनता कशी मोजतात हे शिकले नाहीत किंवा त्यांनी मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची दहा कारणे पाठ केली नाहीत, तरी त्याने काही बिघडणार नाही. आत्ता गृहपाठ आणि प्रकल्पाचे काम ‘अपलोड’ करण्याचा ताण नाही, तर जखम भरून काढणारा स्पर्श महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे, महाविद्यालय / विद्यापीठाचे प्राध्यापक यांनी नित्याचे वर्ग चालवून लेविस-ट्रॉस यांचा ‘संरचनावाद’  किंवा थर्मोडायनामिक्सचा  सिद्धांत यावर व्याख्यान दिले नाही, तरी त्याने मानवी बुद्धिमत्तेचे नुकसान होणार नाही. खरं तर, काळाची गरज ही जागृत बुद्धिमत्ता, सखोल धार्मिकता आणि गहन संवेदनशीलता यांचे एकत्रीकरण आहे. एक शिक्षक म्हणून आपण या प्रक्रियेत भाग घेऊन अधिकृत अभ्यासक्रमाच्या पलीकडे पाहू शकतो का?

या संदर्भात मला तीन मुद्दे मांडावेसे वाटतात. पहिला मुद्दा, आपल्याला हे समजून घ्यावे लागेल, की कोरोना व्हायरसने आधुनिकतेची स्वतःची धारणा नष्ट केली आहे. या आधुनिकतेच्या धारणेमध्ये निसर्गावर मानवाचे वर्चस्व असल्याची संकल्पना, तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर अमर्यादित ‘प्रगतीवर’ आधुनिकतेचा असलेला आत्ममग्न विश्वास आणि तिची भाकीत, नियंत्रण आणि व्यवस्था स्थापना करण्याची शक्ती यांचा समावेश होतो. म्हणूनच जर आपण विमर्शक (Reflexive) आणि ग्रहणक्षम (Receptive) असू, तर आपल्याला नवीन प्रश्नांचा सामना करावा लागेल. उदाहरणार्थ:- आपण अभिमानी जेत्यांसारखे न जगता भटक्यांसारखे नम्र जगणे कसे शिकू शकतो? आपण आपले पर्यावरणाशी असलेले सेंद्रिय नाते कशा प्रकारे पुनर्स्थापित करू शकतो? त्या दृष्टीने आपण हा विचार केला पाहिजे, की आपण अण्वस्त्रे, अंतराळ संशोधन, मेगा रुग्णालये आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची जी उपासना करतो ती किती आभासी आहेत. हा अदृश्य विषाणू अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या आत्मविश्वासाच्याही चिंधड्या करू शकतो, या वस्तुस्थितीचा सामना आपण कसे करणार आहोत? म्हणजेच आपण नवीन जगाच्या शोधात आधुनिकतेची शिकवण कशी पुसून टाकणार आहोत?

दुसरे म्हणजे कोरोना व्हायरस आणि संबंधित टाळेबंदीने आपल्याला स्वतःच्या अंतर्मनाचा सामना करण्यास भाग पाडले आहे आणि हे सोपे नाही. कारण आधुनिकतेच्या युगात आपण प्रामुख्याने ‘बाह्य’ क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे; जगात काम करण्यासाठी आपण तांत्रिक कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे आणि याचा परिणाम म्हणजे आपल्यातील बरेचजण आपले भय आणि राग, अहंकार आणि आक्रमकता,  वेदना आणि उत्कटता किंवा आपली स्वप्ने आणि प्रार्थना या अंतर्मनातील जाणिवा समजून घेण्याची कला गमावून बसलो आहोत. खरंतर, आपली ‘बाह्य-दिग्दर्शित’ जाणीव आपल्या आंतरिक जाणीवा समजून घेण्यास असमर्थ आहे. जगभर आपल्याला मानसिक उबग, कंटाळवाणेपणा, अर्थहीनता आणि घरगुती हिंसाचाराची पुनरावृत्ती दिसून येते आहे यात काही आश्चर्य नाही. म्हणूनच, आपण आपल्या अंतःकरणाचे पोषण कसे करतो, सहनशक्ती आणि संयम कसे विकसित करतो, शांततेची तीव्रता कशाप्रकारे समजून घेतो आणि आपल्यातील अदृश्य शक्तींना कशाप्रकारे फुलू देतो हा खरा प्रश्न आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ या पुस्तकातील म्हाताऱ्याप्रमाणे आपण या संकटाच्या या क्षणाचे रूपांतर जीवनदायी आयुष्यात कसे करू शकतो?

तिसरा मुद्दा असा, की ‘अंतर’ आणि ‘ भयाने पछाडले जाणे’ याने आपल्याला पंगु बनवले आहे. तसेच सामूहिक विवेकासाठी आवश्यक प्रेम, विश्वास आणि मानवी स्पर्श यांच्या सामर्थ्याविषयी साशंक बनवले आहे. हेच संकट हुकूमशाही सरकारांना त्यांच्या नियंत्रणाच्या यंत्रणा वाढविण्यासाठी आणखी उत्तेजन देऊ शकते. ज्यातून पुढे शंका आणि संशयाची मानसिकता पसरवली जाऊ शकते. मग आपण मानवी सहवासाच्या उत्कट आनंदाशिवाय केवळ जैविक आणि धोरणात्मकरित्या जिवंत राहावे काय? आपण जगात नव्याने प्रेम आणि मानवी सहवासाचे सामर्थ्य पुनर्स्थापित करू शकतो का? ज्यामध्ये पन्नास सहप्रवासी विद्यार्थ्यांचा एक जिवंत वर्ग, हजारो सर्जनशील आत्म्यांचा एक निषेध मोर्चा किंवा शेकडो हास्यांनी भरलेले कॉफी हाऊस, या  सर्वांचा समावेश असेल. आज जेव्हा शालेय मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थी बंदिस्त आणि कोंडले गेले आहेत, तेव्हा याप्रकारचे प्रश्न त्यांना भेडसावत आहेत.

जर आपण शिक्षक आणि शिक्षकतज्ज्ञ म्हणून आपल्या शैक्षणिक पद्धती अस्तित्ववादी प्रश्न आणि समस्यांशी जोडण्यात असमर्थ ठरलो, तर आपण पूर्णपणे निष्ठुर आणि असंवेदनशील असल्याचे सिद्ध होईल. ‘झूम’ अ‍ॅपच्या फायद्या-तोट्यांवर चर्चा करणे, तसेच ‘योग्य’ वेळी अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे अर्थपूर्ण शिक्षण नव्हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जेंव्हा सारे जग कोसळले आहे आणि पुस्तकी ज्ञानाची निरर्थकता सिद्ध झाली आहे, अशावेळी जगण्याची सूक्ष्म कला शिकवणारे शिक्षण म्हणजेच अर्थपूर्ण शिक्षण होय.

अविजीत पाठक, हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

अनुवाद मधुरा जोशी यांनी केला आहे. त्या समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: