महाराष्ट्रात कोविड रुग्णांमध्ये पुन्हा प्रचंड वाढ

महाराष्ट्रात कोविड रुग्णांमध्ये पुन्हा प्रचंड वाढ

नवी दिल्ली: मुंबईतील कोविड-१९ रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४५५ दिवसांवरून ३७१ दिवसांवर आल्यामुळे शहरातील १८ दशलक्ष रहिवाशांच्या सुरक्षेसाठ

ऑनलाईन शिक्षणाचा उहापोह
लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे कसोटीचे!
देशात ४८ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

नवी दिल्ली: मुंबईतील कोविड-१९ रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४५५ दिवसांवरून ३७१ दिवसांवर आल्यामुळे शहरातील १८ दशलक्ष रहिवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या १९ सप्टेंबरपर्यंत कोविड-१९ आजाराच्या रुग्णांमध्ये देशभरात वाढ होत होती. या साथीचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या शहरी भागांमध्ये मुंबईचा समावेश होता. २१ फेब्रुवारीला रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ३.१९ लाख झाली आहे आणि कोविडने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११,५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात पुणे शहरामधील रुग्णांची संख्या मुंबईतील रुग्णसंख्येहूनही अधिक आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने नुकताच चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

भारताली कोविड साथीने कळस गाठलेला असताना मुंबईमध्ये दररोज सुमारे २,००० नवीन रुग्णांची भर पडत होती, असे महाराष्ट्राच्या कोविडविषयक आकडेवारीवर नजर टाकली असता दिसून येते. मात्र, फेब्रुवारी १९-२० या दोन दिवसांत मुंबईमध्ये ६,००० नवीन रुग्णांची भर पडल्याचे ‘लाइव्ह मिंट’च्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.

सध्या नव्याने आढळणाऱ्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण पुढील पाच जिल्ह्यांतील आहेत: पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई आणि अमरावती. यात मुंबईचा वाटा ११ टक्के आहे. अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबईतील कोविड-१९ साथीचा उद्रेक नोव्हेंबर महिन्यापासून काहीसा शमू लागला होता. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यास व त्याद्वारे देशाच्या आर्थिक राजधानीतील व्यवहार पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली होती. लक्षणीय बाब म्हणजे राज्य सरकारने ५ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहे पुन्हा उघडण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उपनगरी रेल्वेगाड्याही सुरू केल्या. मात्र फेब्रुवारी महिन्यातच रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

मुंबईमध्ये शहर प्रशासन सध्या उपनगरांवर लक्ष केंद्रित करत आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, अलीकडील काळात आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश उपनगरांमधील आहेत.

सध्या रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही कोविडची दुसरी लाट वगैरे नाही, तर नागरिकांकडून होत असलेल्या हलगर्जीचा परिणाम आहे, असे मत मुंबईतील कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख संजय ओक आणि महाराष्ट्राचे प्रधान आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी वृत्तपत्रांशी बोलताना व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र ही कोविडची ‘दुसरी’ लाट आहे की पूर्वीच्याच लाटेचा भाग आहे याचे निरीक्षण राज्य सरकार पुढील दोन आठवडे करणार आहे, असे २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सांगितले.

एकंदर रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, एखाद्या इमारतीत किमान पाच सक्रिय कोविड-१९ रुग्ण असतील तरच ती सील करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिकेने (बीएमसी) घेतला आहे आणि गेल्या आठवड्याच्या अखेरीस अशा १३,०५ इमारती सील करण्यात आल्या आहेत असे समजते.

महाराष्ट्रासारख्या कोविड-१९ रुग्णांची संख्या पुन्हा वाढलेल्या राज्यांना देखरेख वाढवण्याचे तसेच लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे निर्देश केंद्र सरकारनेही दिले आहेत.

मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी संकलित केलेल्या आर्थिक पाहणी अहवाल-२०२१ मध्ये गेल्या वर्षभरात कोविड-१९ साथीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महाराष्ट्र सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. या साथीचा सामना करण्यातील महाराष्ट्र सरकारची कामगिरी देशातील अन्य सरकारांच्या तुलनेत सर्वांत वाईट होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: