काँग्रेसची सूत्रे सध्या सोनियांकडेच

काँग्रेसची सूत्रे सध्या सोनियांकडेच

नवी दिल्लीः काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासंदर्भातील सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची ७ तासांची बैठक अत्यंत वादळी झाली. दिवसभर काँग्रेसमधील विसंवाद ट्विटरच

बरे झाले, मोदी आले…
इच्छाधारी विश्लेषकांच्या भाऊगर्दीत…
ट्रम्प यांच्या महाभियोग चौकशीस संसदेची मंजुरी

नवी दिल्लीः काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासंदर्भातील सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची ७ तासांची बैठक अत्यंत वादळी झाली. दिवसभर काँग्रेसमधील विसंवाद ट्विटरच्या माध्यमातून बाहेर येत होते. वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले व नंतर ते मागे घेण्यात आले. अखेर पुढील ६ महिने काँग्रेस पक्ष आपला अध्यक्ष निवडेपर्यंत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीच काम पाहतील यावर एकमत झाले. नव्या अध्यक्ष निवडीची बैठक लवकरच बोलावण्यात येईल व ती सहा महिन्याच्या आता बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सोनिया गांधी यांनी पक्षाचे संघटन अधिक मजबूत व त्यात परिवर्तन आणण्यासाठी व नवा अध्यक्ष निवडीपर्यंत पक्षाचे अध्यक्षपद सांभाळावे, असे कार्यकारिणीचे मत बनले. कार्यकारिणीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर आपला विश्वास केला असे काँग्रेसचे एक नेते पी.एल. पुनिया यांनी सांगितले.

काँग्रेसमधील विसंवाद

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होण्याआधीच सोनिया गांधी यांनी आपले अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी नवा अध्यक्ष शोधण्याचे काम पक्षाने सुरू करावे असे सांगितले. त्यावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व अन्य नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदावर राहण्याचा आग्रह केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद व अन्य नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा मुद्दा सोनिया गांधी यांनी या बैठकीत उपस्थित केला. सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्या नेत्यांवर राहुल गांधी यांनी निशाणा साधला. राजस्थान व मध्य प्रदेशात पक्ष ताकदीने लढत असताना व त्यादरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसताना असे पत्र का लिहिले गेले, हा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

कार्यकारिणीची बैठक सुरू झाल्यानंतर तासाभरातच सोनियांना पत्र लिहिणार्यांचे भाजपशी संधान आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केल्याचे वृत्त बाहेर आले व त्यावर कपिल सिब्बल यांनी ट्विटरवर आपण काँग्रेससाठी गेली ३० वर्षे काम केले असे प्रत्युत्तर दिले. राजस्थानच्या पेचप्रसंगात काँग्रेसला हायकोर्टातून विजय मिळवून दिल्याचा व आपल्या आयुष्यात भाजपला कुठे समर्थन केले आहे, असा प्रतिप्रश्न व उद्विग्नता व्यक्त केली.

पण बराच गदारोळ झाल्यानंतर असे विधान राहुल गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केलेच नाही, असे पक्षप्रवक्ते सुरजेवाला यांनी स्पष्ट केल्याने सिब्बल यांनी आपले ट्विट मागे घेतले. नंतर सिब्बल यांनी राहुल गांधी यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व आपण असे काहीच बोललो नसल्याचे स्पष्ट केले, अशा मजकुराचे दुसरे ट्विट केल्यानंतर हे वादळ शमले.

या गदारोळात गुलाम नबी आझाद यांच्यावरही राहुल गांधी नाराज असल्याचे वृत्त पसरले. पण नंतर आझाद यांनी असे काहीच घडले नसल्याचे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांतील एक गट चुकीचे अर्थ लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

२३ नेत्यांच्या पत्रात काय होते?

गेले सहा वर्षांत दोन लोकसभा व अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षामध्ये परिवर्तन आणावे, पक्षाची मजबूत बांधणी करावी, जबाबदारीत्व द्यावे, नियुक्त प्रक्रियेला मजबूत करावे व पराभवाचे वस्तुनिष्ठ आकलन करावे अशा मागण्या असलेले पत्र काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले होते.

सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत असल्याने या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवले गेले होते.

या पत्रात पक्षात वरून खालीपर्यंत सर्व स्तरांवर बदल करावेत, देशातील तरुण वर्ग मोदींना मतदान करत आहे, या वर्गाशी काँग्रेस संवाद साधू शकत नाहीये, देशातील काँग्रेसचा जनाधार वेगाने कमी होत आहे असे मुद्दे मांडण्यात आले होते.

या पत्रावर स्वाक्षरी करणार्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, विवेक तन्खा, मुकेल वासनिक, जितीन प्रसाद, भूपिंदर हुड्डा, राजेंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पीजे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित आदींच्या स्वाक्षर्या होत्या.

काँग्रेसचे पुनरुज्जीवन हे देशासाठी अनिवार्य असून ते लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असा या पत्रात तर्क देण्यात आला होता.  देशापुढे भय, असुरक्षितता, बेरोजगारी, महासाथीमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, सीमा संरक्षण, वाढती धर्मांधता असे प्रश्न निर्माण झाले असून त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पक्षाला आपल्या रचनेत आतून परिवर्तन व बदल करावे लागणार आहेत, त्यासाठी सत्तेतील विकेंद्रीकरण, प्रत्येक राज्यातील काँग्रेस पक्षाला सशक्त करणे यावर पक्षाला काम करावे लागणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षात सर्व पातळीवर निवडणुका आवश्यक असून पक्षाच्या संसदीय मंडळाचीही तत्काळ स्थापना करणे गरजेचे असल्याचे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले होते.

काँग्रेस नेतृत्वाबद्दल असलेली अनिश्चितता, पक्षातील अंतर्गत संघर्ष यामुळे सामान्य कार्यकर्ता पक्षावर नाराज असून तो दूर होत असल्याची खंत या पत्रात मांडली गेली होती. प्रमुख विरोधी पक्ष भाजपाशी दोन हात करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला जात नाही, पक्षातील नेते स्वतःच्या व पक्षाच्या पराभव करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे पक्ष कमजोर होत असून एक पूर्णकालिक व प्रभावी नेतृत्व पक्षाला मिळाल्यास पक्ष बांधणीला वेग येईल, सर्व राज्यांमध्ये असे नवे नेतृत्व आणावे, असे मुद्देही यात नोंदवले गेले होते.

या पत्रात गांधी-नेहरु घराणे हे पक्षाचे अभिन्न अंग असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0