‘दिग्विजय सिंहांनी जे करायला हवं होतं ते मी केलं’

‘दिग्विजय सिंहांनी जे करायला हवं होतं ते मी केलं’

प्रज्ञा ठाकूर यांच्या विजयाची घटना आपल्या देशाची शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या जगात असा एकही देश नाही, -अगदी पाकिस्तानही नाही- की जेथे दहशतवादी कृत्यात सहभागी असलेला आरोपी संसदेत निवडून येतो!

बिहार : २७९ कोटींच्या इलेक्टोरल बाँडची विक्री
म्यानमारमध्ये आँग सान सूकींच्या पक्षाला बहुमत
काश्मीर केंद्रशासित असेपर्यंत निवडणूक लढवणार नाहीः अब्दुल्ला

मी भोपाळमध्ये राहणारा, सेक्युलर विचारधारा मानणारा एक पत्रकार आहे. मी नुकतीच प्रज्ञा ठाकूर यांच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत भोपाळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

माझ्या मते प्रज्ञा ठाकूर यांच्या विजयाची घटना आपल्या देशाची शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या जगात असा एकही देश नाही, -अगदी पाकिस्तानही नाही- की जेथे दहशतवादी कृत्यात सहभागी असलेला आरोपी संसदेत निवडून येतो! अशा उमेदवाराच्या निवडणूकीला आव्हान देणे आपल्या कुणालाही जमत नसेल तर ती बाब गंभीर व त्याहूनही वाईट आहे.

भोपाळच्या १२ लाख मतदारांनीही या निवडणुकीला आव्हान दिलेले नाही. आणि आश्चर्य म्हणजे मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री झालेले व प्रज्ञा ठाकूरकडून पराभव पत्करावे लागलेले काँग्रेसचे पराभूत नेते दिग्विजय सिंह यांनीही या निवडणुकीला आव्हान दिलेले नाही.

मला असे वाटते की, दिग्विजय सिंह यांच्याकडे नैतिक अधिष्ठान नसल्याने त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या निवडणुकीला आव्हान दिलेले नसावे. कारण त्यांची स्वत:ची प्रचारयंत्रणा धर्म आणि साधुसंत यांच्या भरवशावर होती. भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी त्यांनी असा मार्ग धरला.

दिग्विजय सिंह यांच्या प्रचारात ‘कम्प्युटर बाबा’ नावाचे एक साधू उतरले होते. त्यांनी हजारो साधुंचा एक यज्ञ केला होता. मिर्ची बाबा नावाचे आणखी एक साधू होते. त्यांनी दिग्विजय सिंह हे जिंकले नाहीत तर आपण समाधी घेऊ अशी घोषणा केली होती.

या एकूण प्रचारात दिग्विजय सिंह श्रद्धाळू हिंदू म्हणून स्वत:ला मिरवत होेते. आपण उपासतपास ठेवतो, रोज पूजा करतो, मंदिरात जातो असे ते मतदारांना सांगत होते. प्रज्ञा ठाकूर व संघपरिवाराकडून आपण हिंदूविरोधी ठरवले जाऊ नये या भीतीपोटी दिग्विजय सिंह अशा मार्गाने प्रचार करत होते. धुव्रीकरण रोखण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अर्थातच आमच्यासारखे उदारमतवादी त्यांच्या बाजूने होते पण पुढे दिग्विजय सिंह यांच्या प्रचाराची दिशा पाहता आम्हा सर्वांचा हिरमोड झाला.

प्रज्ञा ठाकूर यांच्या निवडणुकीविरोधात न्यायालयात जावे असा सल्ला दिग्विजय सिंह यांना यांच्या अनेक निकट मित्रांनी सल्ला दिला होता. पण सिंह यांनी आता न्यायालयात जाऊन काही उपयोग नाही अशी भूमिका घेतली. पण मला न्यायालयात जाण्याची गरज वाटू लागली.

ती संधी मला अचानक योगायोगाने मिळाली. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर व त्यांचे काही सहकारी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीच्या विरोधात भोपाळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मला मिळाली. एका जवळच्या मित्राने मला जबलपूर येथे हर्ष मंदर व त्यांचे सहकारी येणार असल्याचे सांगितले व ही मंडळी प्रज्ञा ठाकूरच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. हर्ष मंदर यांच्या सोबतचे एक वकील उत्कर्ष मिश्रा यांनी मला ८ जुलैला जबलपूरला यायला सांगितले. त्या दिवशी याचिका दाखल करण्याचा अंतिम दिवस होता.

भोपाळ ते जबलपूर या संपूर्ण प्रवासात माझ्या मनात प्रज्ञा ठाकूर यांच्या विखारी व विषारी प्रचाराच्या घटना फिरत होत्या. त्याचबरोबर मालेगाव बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष आरोपी असलेल्या व्यक्तीच्या विरोधात आपण याचिका दाखल करत आहोत याचेही मला समाधान वाटत होते.

पण मला सतत वेदना होत होत्या. मला आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेत  नथुराम गोडसेची स्तुती करणारे विधान केल्याप्रकरणी प्रज्ञा ठाकूर यांना आपण आयुष्यात माफ करणार नाही असे विधान केले होते. त्यानंतर भाजपने प्रज्ञा ठाकूरच्या विरोधात एक कारणे दाखवा नोटीसही काढली होती. या नोटीशीला प्रज्ञा ठाकूर उत्तर देतील असे वाटले होते पण तसे काहीच झाले नाही. त्यांनी आपल्या विधानावर एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी खंतही व्यक्त केली नाही.

भाजपने दिग्विजय सिंह यांच्याविरोधात जेव्हा प्रज्ञा ठाकूर यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा आम्हा सर्वांना वाटले की प्रज्ञा यांचा पराभव अटळ आहे. देशात मोदी लाट असली तरी प्रज्ञा ठाकूर यांच्या शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करण्यामुळे त्या भोपाळमधून जिंकून येऊ शकत नाहीत अशी खात्री होती.

जबलपूरला उतरल्यावर मी उच्च न्यायालयातले एक वकील अरविंद श्रीवास्तव यांच्या कार्यालयात उत्कर्ष यांची भेट घेतली. अरविंद श्रीवास्तव हे माकपचे राज्यसचिव आहेत. आम्ही याचिकेत सादर करावयाच्या कागदपत्रांविषयी बोललो. मी याचिकेच्या प्रत्येक पानावर सह्या केल्या. या याचिकेला पुरावा म्हणून शेकडो कागदपत्रे आम्ही सादर केली.

अरविंद श्रीवास्तव हे सगळे पुरावे पाहून निर्धास्त झाले. प्रज्ञा ठाकूर यांची निवडणूक या पुराव्यांवरून नक्कीच रद्द ठरू शकते असा त्यांचा एकूण आत्मविश्वास होता. पण माझ्या मनात जरा शंका होती. भारतातील न्यायालयीन प्रक्रिया अतिशय संथ असल्याने या प्रकरणाच्या सुनावणीला किती दिवस चालेल यावर मी अनिश्चित होतो.

उत्कर्ष मिश्रा यांनी या याचिकेचे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले ते या स्वरुपाचे आहेत.

  • आपल्या प्रचारात प्रज्ञा ठाकूर यांनी धार्मिक भावनांचा आधार घेऊन मतांचे आवाहन केले जो लोकप्रतिनिधी कायदा १९५१मधील सेक्शन १२३(३)नुसार भंग ठरतो.
  • प्रज्ञा ठाकूर यांनी प्रचारात धार्मिक भावना चेतवणे, जातीयवादी विधाने करणे, प्रतिस्पर्ध्यावर खोटे आरोप करणे असे अनेक प्रकार केले होते. त्याचे एकेक पुरावे या याचिकेत होते.

१८ एप्रिल रोजी प्रज्ञा ठाकूर एका सभेत म्हणाल्या होत्या, की मी निवडणूक लढवणार नाही कारण मी संन्यासी आहे. सत्ता ही माझ्यासाठी नव्हे. मी मार्गदर्शक आहे. मी सत्तेला मार्गदर्शन करेन. पण हे धर्मयुद्ध आहे. मी धर्मयुद्धासाठी आलेले आहे. मी येथे ईश्वराचे आदेश घेऊन आले आहे नेतागिरी करण्यासाठी नव्हे. मला परमेश्वराने हे धर्मयुद्ध लढण्याचे आदेश दिले आहेत.

१९ एप्रिलला त्यांनी हेमंत करकरे हे देशद्रोही व धर्मद्रोही असल्याचे विधान केले. मीच त्यांना तुम्ही मरून जाल अशा शाप दिला होता.

२० एप्रिलला “राम मंदिर हम बनायेंगे एवम भव्य बनायेंगे. हम तोडने गए थे ढांचा, मैंने चढकर तोडा था ढांचा इसपर मुझे गर्व हैं. मुझे ईश्वरने शक्ती दी थी, हमने देश का कलंक मिटाया हैं”

२० एप्रिलला त्या म्हणाल्या मला अभिमान आहे की राम मंदिरात काही निरुपयोगी वस्तू होत्या त्या आम्ही फेकून दिल्या.

गेल्या ७० वर्षांत आपल्या देशात मंदिरेही सुरक्षित नाहीत. मशीद तोडल्यानंतर हिंदूंमध्ये स्वाभिमान जागृत झाला आहे. आपण भव्य राममंदिर बांधणार आहोत. राम राष्ट्र हैं, राष्ट्र राम हैं..

५ मे स्त्रीचा अपमान झाला की बदला घेतला जातो. ते आपला धर्माशी याचा संबंध जोडून बदला घेतात.

२०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अभिराम सिंग वि. सी.डी. कोमाचेन खटल्यात कोणत्याही उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराची जात, धर्म काढल्यास तो प्रयत्न मतदारांवर प्रभाव टाकण्याचा असतो असे निरीक्षण नोंदवले आहे.

आमच्या याचिकेत प्रज्ञा ठाकूर यांनी राम मंदिर, शहीद हेमंत करकरे, बाबरी मशीद यासंदर्भात केलेली विधाने ही मतदारांवर प्रभाव टाकणारी आहेत असा आरोप केला आहे. शिवाय अशी विधाने करून समाजात धार्मिक, जातीय फूट पाडण्याचे प्रयत्न आहेत असेही म्हटले आहे.

या याचिकेत आम्ही भाजपचे एक ज्येष्ठ नेते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) प्रज्ञा ठाकूर यांना धार्मिक आधारावर मत मागण्याच्या प्रयत्नांत मदतही करत असल्याचे म्हटले आहे. १९ एप्रिल २०१९मध्ये टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नरेंद्र मोदी यांनी पाच हजार वर्षांची संस्कृती असलेल्या धर्माची सांगड दहशतवादाशी घालणाऱ्यांना प्रज्ञा ठाकूर यांची उमेदवारी एक चपराक असल्याचे विधान केले होते. जी संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’वर विश्वास ठेवते तिच्यावर दहशतवादाचे आरोप केले जात असल्याचे परिणाम काँग्रेसला चांगलेच भोगावे  लागतील असेही ते म्हणाले होते.

१७ मे २०१९ मध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना हिंदू दहशतवादाचे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात हा सत्याग्रह असल्याचे विधान केले होते. प्रज्ञा ठाकूरवर खोटे खटले दाखल केले, त्यांना तुरुंगात अडकवलं, हा मत मिळवण्याचा एक कट होता असेही विधान शहा यांनी केले होते.

२० एप्रिल २०१९मध्ये उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात दाखल केलेले सर्व खटले खोटे असून काँग्रेसने त्याबद्दल माफी मागितली पाहिजे असे विधान केले होते.

६ मे २०१९मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रज्ञा ठाकूर यांना दिलेली उमेदवारी ही हिंदूंना दहशतवादी संबोधणाऱ्यांना प्रत्युत्तर असल्याचे विधान केले होते.

१८ एप्रिल २०१९मध्ये भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी दिग्विजय सिंह यांच्या विरोधात प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय योग्य होता असे विधान केले होते. दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवादासारखा खोडसाळ प्रचार करून या धर्माविषयी संशय निर्माण केला, अशा व्यक्तीच्या विरोधात योग्य उमेदवाराची गरज होती तो निर्णय भाजपने घेतला असे मत व्यक्त केले होते.

वरील सर्व उदाहरणे कायद्याचा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग करणारी आहेत असे आमचे म्हणणे आहे.

२५ एप्रिल २०१९रोजी प्रज्ञा ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांना दहशतवादी ठरवून त्यांच्या विरोधात आपण उभे राहिलो असल्याचे एक विधान केले. एखाद्यावर खोटे आरोप करून त्याला दहशतवादी ठरवणे हा सेक्शन १२३(४)चा भंग अाहे.

मला माहिती नाही की ही याचिका न्यायालयात केव्हा सुनावणीस येईल आणि तिचे पुढे काय होईल. पण प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात उभे राहणे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

राकेश दीक्षित, हे भोपाळमधील पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: