बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी : नितीश कुमार यांचा राजीनामा

बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी : नितीश कुमार यांचा राजीनामा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सकाळी जदयु आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबतच

नाराज नीतीश कुमार
चारा घोटाळाः ५व्या खटल्यात लालूंना ५ वर्षांचा कारावास
‘बिहार मे भाजपा बा…’

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सकाळी जदयु आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली होती.

नितीश मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता राज्यपाल फागू चौहान यांना भेटण्यासाठी गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि राजीनामा पत्र सादर केले. नितीश राजभवनात पोहोचले तेव्हा समर्थकांचा मोठा जमाव ‘जिंदाबाद’च्या घोषणा देत होता.

नितीश कुमार त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी रवाना झाले. राबडी देवी यांच्या घरातून तेजस्वी आणि नितीश कुमार एकत्रच बाहेर आले.

यानंतर राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष आणि काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे नव्या आघाडीच्या विधिमंडळ पक्षांची बैठक सुरू झाली. यामध्ये नितीश कुमार यांची महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. नितीश पुन्हा तेजस्वी यादव यांच्यासोबत राजभवनात जाऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील, असे समजते.

याआधी सकाळी जदयु विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश यांनी भाजपवर आपला अपमान केल्याचा आरोप केला. त्याचवेळी त्यांनी भाजपवर त्यांचा पक्ष फोडण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप केला. २०१७ पर्यंत राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि त्यांचा भाऊ तेज प्रताप यादव नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. जदयु, लालू यादव यांचा पक्ष राजद आणि काँग्रेस यांच्या मदतीने हे सरकार स्थापन झाले होते. नितीश यांनी भाजपशी संबंध संपवून ही युती केली होती. तेजस्वी आणि त्यांचा भाऊ तेज प्रताप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी नंतर युती तोडली आणि भाजपबरोबर सरकार स्थापन केले होते.

बिहारमध्ये सत्तेत असलेला जनता दल युनायटेड (जदयु) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. केंद्रीय मंत्री अमित शहा हे सतत जदयुमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोप नितीश कुमार यांनी केला.

जदयुचे वरिष्ट नेते आरसीपी सिंग यांनी कालच पक्षाच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. नितीश कुमार यांनी आरसीपी सिंग हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. २०१७ मध्ये सिंग हे जदयुच्या कोटयातून नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले होते. सिंग यांना राज्यसभेची उमेदवारी नितीश यांनी नुकतीच नाकारली, त्यामुळे सिंग यांना केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता.

२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश यांचा पक्ष जदयुने २४३ जागांपैकी ४५ जागा जिंकल्या. भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या. जदयुने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीश यांना मुख्यमंत्री बनवून त्यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत २०२२ मध्ये राष्ट्रीय जनता दलाने ७९ जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९ जागा जिंकल्या आहेत. बहुमताचा आकडा १२२ आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0