एका पाकिस्तानी पत्रकाराचे भारतातील मित्राला पत्र

एका पाकिस्तानी पत्रकाराचे भारतातील मित्राला पत्र

गेल्या वर्षी तू एक व्हिडिओ शेअर केला होतास. या व्हिडिओत भारत व पाकिस्तानातल्या दोन मुली स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एकमेकांचे राष्ट्रगीत गात होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला नाही की त्याला अधिक रेटिंग मिळाले नाही की तो बातमीचा मोठा मथळा ठरला नाही. कारण त्यात सनसनाटी काही नव्हतं. आपलं नशीब की या दोन मुलांवर देशद्रोह केल्याचा आरोप कुणी केला नाही.

कराचीत रहिवासी भागात विमान कोसळले; ६६ ठार
इम्रान –मोदी समोरासमोर, पण संवाद टाळला
भारतीय माध्यमांकडून अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार

प्रिय विजयन,

आज रमझान संपतोय या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला व तुमच्या देशातल्या नागरिकांना पाकिस्तानतर्फे शुभेच्छा पाठवते. तुमच्या देशातल्या सार्वत्रिक  निवडणुका संपून नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले आहेत. आता त्यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणावाचे संबंध निवळतील का? वास्तविक कोणत्याही नजीकच्या देशांचे संबंध चांगले असावेत अशी अपेक्षा असते. अमेरिका-कॅनडा यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत आणि त्यांच्यामध्ये सौहार्दाचे संबंध आहेत. पण आपल्या दोन देशातले संबंध धर्म व राष्ट्रवादामुळे बिघडले गेले आहेत.

राजकारणात धर्म येणे ही घातक गोष्ट असते. पाकिस्तानने त्याचा अनुभव घेतला आहे. आता भारत, गोवंश संरक्षणाच्या मुद्दयावरून जमावाची झुंडशाही, दलितांवरचे अत्याचार अशातून आमच्यासारख्या मार्गावर जात आहे. आमच्या देशात ईशनिंद कायद्याच्या आडून ७० जणांनी प्राण गमावले आहेत तसेच काहीसे भारतात चित्र आहे.

आपल्या दोघांकडे अण्वस्त्रे आहेत पण आपण आपल्याच जनतेला दोन वेळचे अन्न खायला देऊ शकत नाही, त्यांना गरजेपुरते कपडे देऊ शकत नाही, योग्य शिक्षण देऊ शकत नाही. हे जटील प्रश्न समोर दिसत आहेत  म्हणून आपल्याला अशा लोकांच्या कल्याणाकरिता आपले बिघडलेले संबंध सुधारण्याची गरज आहे. पाकिस्तान हा पश्चिम आशियाचा भाग नाही तर तो दक्षिण आशियाचा भाग आहे हे कृपया समजून घेतले पाहिजे.  त्यासाठी हिंदू-मुस्लिम अशा संकुचित नजरेतून न पाहता बहुसांस्कृतिकतेच्या नजरेतून आपल्याला पुढील पावले टाकायला लागतील.

गेली काही वर्षे अत्यंत धामधुमीची गेली आहेत. तुमच्या काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारीला जो व्हॅलेंटाइन डे म्हणून जगभर साजरा केला जातो, ज्या दिवशी एकमेकांना गुलाबाचे फुल देण्याची रीत आहे त्या दिवशी एक काश्मिरी युवक आत्मघाती हल्लेखोर होऊन भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला करतो ही घटना चिंताजनक आहे.

असे हल्ले करणारे जात्यंध, कडव्या मानसिकतेचे गुलाम असतात. २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या अस्मा जहांगिर यांच्या घरावर असाच जात्यंधांकडून हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला करणाऱ्यांची कट्‌टर धार्मिक मानसिकता पाहून व त्यांचे प्रमुख सूत्रधार ओळखून अस्मा जहांगीर यांनी हल्लेखोरांना माफ केले होते. पण तरीही परिस्थितीत काही फरक पडला नाही.

आपले युवक कोणत्या विद्वेषाचे बळी पडले आहेत? तरुणांना नोकऱ्या द्या म्हणजे ते हिंसा करणार नाहीत असे अरुणा रॉय म्हणाल्या होत्या. बेरोजगारी व त्याला जोडून अपमान हातात आल्यास तरुण हिंसेकडे प्रवृत्त होतो, हे समजून घेतले पाहिजे.

तुला माहीत असेल, पुलवामा हल्ल्यानंतर ‘व्हाइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ वाहिनीवर आपण सर्वांनी एकत्र चर्चा केली होती आणि या कार्यक्रमाला रेटिंगही मिळालं नाही. त्याचे कारण काय आहे ते तुला  माहितेय? कारण आपण दोघेही जण अनेक मुद्द्यांवर सहमत झालो होतो. दोघांनाही आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असे आपले मत बनले होते, मानवाधिकाराचे पालन करण्याची दोघांनाही गरज आहे, असा निष्कर्ष आपण काढला होता.

भारताने काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन पूर्णपणे थांबवले पाहिजे. यामध्ये सैनिकांचाही समावेश केला पाहिजे कारण तेही दहशतवादाला बळी पडत अाहेत. काश्मीरमधील गेल्या १५ वर्षाची एकूण आकडेवारी काढता गेल्या पाच वर्षांत या राज्यात मरण पावलेल्या सैनिकांची संख्या १५ वर्षांत जेवढे सैनिक मरण पावले आहेत त्यापेक्षा अधिक आहे. माझी भूमिका पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला स्वायत्तता दिली पाहिजे, अशी आहे. ‘द गूड तालिबान, बॅड तालिबान’ हे धोरण बंद केले पाहिजे. हे धोरण बंद करणे हे आमच्याच फायद्याचे आहे.

गेल्या वर्षी निवडणुका झाल्यानंतर पाकिस्तानमधील परिस्थिती थोडी सुधारत आहे. येथे सत्तांतरही शांततेत झाले. पण भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पुलवामा घटनेनंतर मोठा तणाव दोन्ही देशांमध्ये तयार झाला होता.भारताने पाकिस्तानवर आरोप केले होते.

पाकिस्तानातही अनेक वाईट घटना घडल्या आहेत. हा देश अनेक धर्माच्या प्रभावाखाली असलेल्या राष्ट्रांकडून वेढला गेला आहे त्यामुळे तो स्वत:ला असुरक्षित समजतो. ८०च्या दशकात सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्यानंतर एका लष्करप्रमुखाने नास्तिक अशा कम्युनिस्टांचा नि:पात करण्यासाठी अमेरिका-सौदी अरेबियाची मदत घेतली होती व दहशतवादाला प्रोत्साहन दिले होते. त्यावेळचे मुजाहिदीन पुढे तालिबान, अल-काईदाकडे वळाले. हा दहशतवाद आम्हाला सोसावा लागला. २००१ नंतर आजपर्यंत पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात सुमारे ७० हजार नागरिक व १० हजाराहून अधिक सैनिक ठार झाले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

२४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या या संघर्षाच्या घटनांना सतत प्रक्षेपित करत असतात आणि त्याने वातावरणात तणाव निर्माण होत असतो. मोदींसारख्या नेत्याला हे माहिती आहे. म्हणून ते प्रचारसभेत भारताकडची अण्वस्त्रे सणात वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांसारखी नाहीत असे पाकिस्तानला उद्देशून बोलतात. त्यांच्या अशा विधानांना स्त्रियांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. मला आठवते १९९८मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या घेतल्या तेव्हा मी एक व्यंगचित्र काढले होते. या व्यंगचित्रात – ‘Who will pee furthest in South Asia’असा मथळा दिला होता.

मला असे विचारायचे आहे की, आपण गरीबी निर्मूलनाकडे, निरक्षरतेकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? हॉनर किलिंगमधून महिलांवर होणारे अत्याचार आपण केव्हा रोखणार?

‘द पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी’ (पीआयपीएफपीडी) या संस्थेच्या माध्यमातून आपण मतपरिवर्तनाचे प्रयत्न करत आहोत. काश्मीर प्रश्न हा केवळ त्याच्या भौगोलिकतेशी निगडित नसून त्यामध्ये लोकांच्या इच्छा-आकांक्षाचा समावेश आहे. आणि त्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे, हे समजून घेतले पाहिजे.

आज काश्मीरी नागरिकांना भारतातील कट्‌टर उजव्या विचारसरणीच्या समर्थकांकडून सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची भाषा केली जात आहे. आजचा सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या एकमेकांवर गरळ ओकत आहेत. त्यातून असे वाटत आहे की दोन्ही देशांना एकमेकांवर हल्ला करण्याची इच्छा आहे. पण आपल्याला माहित आहे की हे सत्य नाही.

गेल्या वर्षी तू एक व्हिडिओ शेअर केला होतास. या व्हिडिओत भारत व पाकिस्तानातल्या दोन मुली स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एकमेकांचे राष्ट्रगीत गात होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला नाही की त्याला अधिक रेटिंग मिळाले नाही की तो बातमीचा मोठा मथळा ठरला नाही. कारण त्या सनसनाटी काही नव्हतं. आपलं नशीब की या दोन मुलांवर देशद्रोह केल्याचा आरोप कुणी केला नाही.

आणखी एक घटना आहे गेल्या मार्चमधील. कोलकाता ते कराची, लंडन, ऑस्लो ते सॅनफ्रान्सिको ते लॉस एंजेलिस, तू दिल्लीत मी बोस्टनमध्ये होते, आपण सर्वांनी २० शहरांत ‘ग्लोबल स्टँडआउट फॉर पीस इन साऊथ एशिया’ या बॅनरखाली एक शांतता मोर्चा काढला होता. या मोर्चात हिंसाचार झाला असता तर ही घटना व्हायरल झाली असती.

आपण आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. जर युरोपमधले पारंपरिक शत्रू फ्रान्स व जर्मनी एकत्र येत असतील, तर भारत व पाकिस्तानने एकत्र का येऊ नये? आपला एक संघ का होऊ नये? आपल्याला व्हिसाची का गरज आहे? आपण सर्वांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, भेटले पाहिजे, प्रवास केला पाहिजे, व्यापार केला पाहिजे. यासाठी आपण आपले सर्व अहंकार, स्वार्थ, स्वाभिमान बाजूला ठेवले पाहिजेत. मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवले पाहिजेत. कट्‌टरवाद्यांना दिले जाणारे बळ बंद केले पाहिजे.

मला माहित आहे की, ही प्रदीर्घ लढाई आहे पण आपल्याला ती लढावी लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

काळजी घे,  लवकरच भेटू

बीना

(बीना सरवार पाकिस्तानमधील पत्रकार आहेत)

मूळ लेख येथे पाहा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: