ईव्हीएमवर राज ठाकरे यांचा निशाणा

ईव्हीएमवर राज ठाकरे यांचा निशाणा

‘ईव्हीएम’च्या प्रश्नासंदर्भात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला आपले म्हणणे सादर केले आणि त्यानंतर ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

‘मोदींच्या राज्यात सामान्य, गरीब नव्हे तर अब्जाधीश सुरक्षित’
सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला
चुकीच्या ट्विटमुळे सरदेसाई यांच्यावर कारवाई

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० मतदारसंघात घोळ झाला असून ईव्हीएमवर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. या मतदार संघात जास्तीत जास्त मतदान झाले आहे. पण झालेले एकूण मतदान व उमेदवारांना पडलेली मते यात घोळ अाहे. त्यामुळे बॅलेट पेपरद्वारेच मतदान व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली. ते दिल्ली दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपले एक निवेदन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिले.

या निवेदनात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी मनसेने केली आहे. पण निवडणूक आयुक्तांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता आम्हाला शून्य अपेक्षा असून केवळ औपचारिकता म्हणून ही भेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. उद्या आम्हाला कोणी विचारायला नको की तुम्ही निवडणूक आयोगात का गेला नाही? तर हा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून आम्ही येथे आल्याचे ठाकरे म्हणाले.

गेली २० वर्ष देशातील जनता ईव्हीएमवर संशय घेत आहे. भाजपही २०१४च्या अगोदर त्या विरोधात न्यायालयात गेला होता. पण २०१४ नंतर हा पक्ष गप्प आहे. मी पूर्वी अनेक राजकीय पक्षांनी एक पत्र लिहून बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हवं असे सूचवले होते. त्यावर कुणीच काही बोलले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ईव्हीएममधील चीप ही अमेरिकेत तयार होते आणि ती हॅक होऊ शकते तरीही आयोग बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तयार होत नाही. जर मॅच फिक्स असेल तर खेळून काय फायदा, असाही सवाल त्यांनी केला.

सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी केल्यास मतमोजणीस वेळ लागतो असे निवडणूक आयोग म्हणते. मग ज्या देशात दोन महिने निवडणूक चालते, तेथे मतमोजणीस वेळ लागल्यास बिघडते कुठे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. ही भेट ‘ईव्हीएम’च्या संदर्भात होती. असे स्वतः ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने, या भेटीला खूप महत्त्व आले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसला मदत होईल अशी भूमिका घेतली होती आणि विधानसभेसाठी काँग्रेसबरोबर मनसेच्या आघाडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0