फेसबुकच्या धोरणावर कंपनीतल्या ११ कर्मचाऱ्यांचे पत्र

फेसबुकच्या धोरणावर कंपनीतल्या ११ कर्मचाऱ्यांचे पत्र

नवी दिल्ली/बंगळुरूः फेसबुकच्या वरिष्ठ अधिकारी आंखी दास व त्यांच्या सोबत काम करणार्या अन्य बड्या अधिकाऱ्यांना  कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून आता प्रश्न विचा

‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा
लोकशाहीत हस्तक्षेपः काँग्रेसचे झुकरबर्गला पत्र
फेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार

नवी दिल्ली/बंगळुरूः फेसबुकच्या वरिष्ठ अधिकारी आंखी दास व त्यांच्या सोबत काम करणार्या अन्य बड्या अधिकाऱ्यांना  कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. रॉयटर्सने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार हे वृत्त दिले आहे.

रॉयटर्सने फेसबुकमध्ये काम करणार्या ११ कर्मचाऱ्यांनी लिहिलेले एक पत्र पाहिले असून या पत्रात या कर्मचाऱ्यांनी मुस्लिमविरोधी अप्रचार रोखण्यासाठी कंपनीने कडक पावले उचलावीत व भारतातील फेसबुकच्या चिथावणीखोर भाषणासंदर्भातील धोरणामध्ये सुधारणा आणाव्यात, अशी मागणी केली आहे. या कर्मचार्यांनी फेसबुक इंडियाच्या कार्यालयात सर्वधर्मिय कर्मचाऱ्यांचा समावेश व्हावा अशीही मागणी केली आहे.

भारतात जे काही घडले त्याने वेदना झाल्या असून त्या प्रत्येक कर्मचार्याला झाल्या आहेत. फेसबुक मुस्लिम समाजासाठी काय पावले उचलेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास

फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास

भारतामध्ये फेसबुकच्या माध्यमातून मुस्लिमांच्या विरोधात चिथावणी खोर मजकूर व संदेश पसरवले जात असतात. पण त्याला रोखणारे कंपनीचे धोरण पर्याप्त नसून अशा मजकुरावर निर्बंध आणण्याबाबत सक्त पावले उचलली जावीत, अशी कर्मचार्यांची मागणी आहे.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने भारतातील फेसबुकविरोधात वादळ उठवणारे वृत्त दिले होते. भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांनी विरोध केल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर फेसबुकच्या विरोधात सर्वच थरातून संताप व्यक्त केला गेला.

दरम्यान आंखी दास यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

आंखी दास २०११पासून फेसबुक इंडियामध्ये काम करत असून त्या कॉर्पोरेट लॉबीमधल्या सर्वात प्रभावशाली समजल्या जातात. आंखी दास यांच्यासोबत काम करणार्या एका माजी कर्मचार्याने सांगितले की, त्या अत्यंत हुशार असून त्यांचे राजकीय लागेबंधे आहेत. तर अन्य एका माजी कर्मचार्याने आंखी दास या कंपनीत मोकळेपणाने सर्व मुद्द्यांवर बोलतात अशी माहिती दिली.

आंखी दास यांची बहिण रश्मी या भाजपच्या युवा संघटनेसोबत काम करत होत्या व तशी जाहीर कबुलीही त्यांनी दिली आहे. इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना रश्मी यांनी आपली बहिणी कणखर असून ती हे वादळ हाताळेल असा विश्वास व्यक्त केला.

रॉयटर्स

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0