फेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार

फेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार

नवी दिल्लीः अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्तानंतर जीवे मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या आपल्याला येत असल्याची तक्रार फेसबुक इंडियाच्या पब्लिक

लोकशाहीत हस्तक्षेपः काँग्रेसचे झुकरबर्गला पत्र
‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा
फेसबुकच्या आँखी दास यांच्याकडून मोदींना थेट मदत

नवी दिल्लीः अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्तानंतर जीवे मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या आपल्याला येत असल्याची तक्रार फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास यांनी दक्षिण दिल्ली पोलिसांकडे नोंद केली. या धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आल्या व त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकविरोधात वादळ उठवणारे वृत्त दिले होते. भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांनी विरोध केल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तात भाजपचे तेलंगणचे आमदार टी राजा सिंह यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा उल्लेख होता. हे

आमदार धर्मांध भाषणे व वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरोधात आंखी दास यांनी फेसबुकने निर्धारित केलेली चिथावणीखोर भाषणांविरोधातील नियमावली लावू नये अशी भूमिका घेतली होती.

“मोदी यांच्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात कारवाई केल्यास त्याचा फेसबुकच्या भारतातील व्यवसाय संधींवर परिणाम होऊ शकेल, असे फेसबुकच्या वतीने भारत सरकारबरोबर लॉबींग करण्याची जबाबदारी असणाऱ्या दास यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्तात म्हटले होते. हे वृत्त फेसबुकच्या काही माजी आणि सध्या कार्यरत असणार्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

दरम्यान रविवारी आंखी दास यांनी पोलिसांना काही ट्विटर अकाउंटवरून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे सांगितले. पोलिसांनी या संदर्भात फिर्याद नोंदवून घेतलेली नाही पण त्यांनी तक्रारीवरून तपास सुरू केला आहे.

दिल्ली विधानसभा समिती दास यांना बोलावणार

दिल्ली विधानसभेतील शांतता व सौहार्द समितीने सोमवारी फेसबुकच्या अधिकार्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल असे सांगितले. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली दंगल भडकण्यात अन्य घटनांबरोबर सोशल मीडियातील फेक न्यूजचा भाग होता. यात फेसबुकचा किती नाकर्तेपणा वा दुर्लक्षपणा आहे याची चौकशी आंखी दास व अन्य सहकार्यांना समितीपुढे बोलावून केली जाईल, असे आम आदमी पार्टीचे आमदार राघव चढ्ढा यांनी सांगितले. समाजात चिथावणीखोर माहिती व फेक न्यूज पसरवण्यात फेसबुकचा वाटा असल्याच्या अनेक तक्रारी दिल्ली सरकारकडे आल्या आहेत, असे चढ्ढा म्हणाले.

संसदीय समितीही फेसबुकच्या अधिकार्यांना बोलावणार?

दरम्यान वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आलेल्या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी फेसबुकच्या अधिकार्याना बोलावण्याबाबत विचार केला जात असल्याचे संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी सांगितले.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: