फेसबुक आणि ‘आरएसएस’शी संबंधीत मोठा खुलासा

फेसबुक आणि ‘आरएसएस’शी संबंधीत मोठा खुलासा

व्हिसल ब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी फेसबुकचे आचरण आणि त्यातील गंभीर त्रुटींविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पाकिस्तान चीनच्या ‘विषारी वायूं’मुळे हवेचे प्रदूषण: भाजप नेता
राज्यसभा निवडणुका : गुजरात काँग्रेस आमदारांची चौकशी शक्य
भाजपचा राष्ट्रवाद पोकळ आणि घातकहीः मनमोहन सिंग

फेसबुकच्या माजी कर्मचारी आणि व्हिसल ब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी फेसबुकचे आचरण आणि त्यातील गंभीर त्रुटींविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी यासंदर्भात यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे (एसईसी) तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, हॉगेनने आपल्या तक्रार पत्राबरोबर जोडलेल्या पुराव्यांमध्ये भारताशी संबंधित फेसबुकचे गैरवर्तन पुढे आणले असून, विशेषतः उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांची नावे त्यात समाविष्ट आहेत.

आरएसएसशी संबंधित फेसबुक पेजेसद्वारे ‘भीतीचे वातावरण निर्माण करणारा मजकूर कसा पासरवला जातो, याचे व्हीसल ब्लोअरने वर्णन केले आहे.

फेसबुक “जागतिक विभाजन आणि वांशिक हिंसाचाराला” कसे प्रोत्साहन देत आहे हे दाखवण्यासाठी कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देत “राजकीय संवेदनशीलता” या नावाखाली अशा गटांविरुद्ध (शक्यतो आरएसएसशी संलग्न) पुरेशी कारवाई केलेली नाही, असे फ्रान्सिस हॉगेन यांनी दाखवून दिले आहे.

फ्रान्सिस हॉगेन या डेटा शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी मे २०२१ पर्यंत फेसबुकबरोबर काम केले आहे. केंब्रिज अॅनालिटिका नंतर हा दुसरा मोठा खुलासा आहे, ज्यामुळे फेसबुक पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.

या प्रकरणाबाबत हॉगेन अमेरिकन संसदेसमोरही उपस्थित राहणार आहे.

‘व्हिसल ब्लोअर एड’ या संस्थेने हॉगेनच्या वतीने एसईसीकडे तक्रार दाखल केल्याचे वृत्त सीबीएस न्यूजने गेल्या सोमवारी रात्री जाहीर केले.

व्हिसल ब्लोअर फ्रान्सिस हॉगेनच्या मते, फेसबुकच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या संस्थात्मक उणीवांची पूर्ण जाणीव असतानाही ते फेसबुकवर द्वेषयुक्त भाषण आणि धोकादायक राजकीय वक्तृत्वाला जागा देत आहेत.

फेसबुक भारताला ‘टियर -0’ श्रेणीमध्ये ठेवते. अशा देशांना या श्रेणीत ठेवण्यात आले आहे, ज्यांच्यावर  महत्त्वाच्या निवडणुकांदरम्यान अधिक लक्ष दिले जाते. भारताव्यतिरिक्त या वर्गात ब्राझील आणि अमेरिका हे फक्त दोनच देश आहेत.

ही एक चांगली गोष्ट आहे, कारण ‘टियर -2’ आणि ‘टियर -3’ देशांमध्ये फेसबुक निवडणुकीच्या वेळी फेसबुक विशेष लक्ष देत नाही. मात्र दुसऱ्या बाजूने बघितले तर अशा वर्गीकरणाला फारसे महत्त्व नाही, कारण ‘फेक न्यूज’ शोधण्यासाठी फेसबुकतर्फे अमेरिकेसाठी ८७ टक्की संसाधने आणि उर्वरित जगासाठी केवळ १३ टक्के संसाधने वापरली जातात.

ही परिस्थिती आणखी चिंताजनक आहे कारण अमेरिका आणि कॅनडा मिळून एकत्रीतपणे फेसबुककहा वापर करणारे फक्त १० टक्के सक्रिय लोक आहेत. मात्र तेथे अधिक संसाधने खर्च केली जात आहेत.

प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. या खुलाश्यामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी समोर आली आहे की द्वेषयुक्त भाषणांवर ‘०.२’ टक्के’ आणि हिंसा भडकवणाऱ्या सामग्रीवर केवळ तीन ते पाच टक्के कारवाई करण्यास फेसबुक सक्षम आहे.

व्हिसल ब्लोअरच्या मते, आरएसएसचे समर्थन असणाऱ्या पेजेस द्वारे आणि वापरकर्ते गटांद्वारे मुस्लिमविरोधी गोष्टी कशा पसरवल्या जात आहेत, याची फेसबुकला पूर्ण जाणीव आहे.

“अशा अनेक अमानुष पोस्ट लिहिल्या जात आहेत जिथे मुस्लिमांची तुलना ‘डुकरे’ आणि ‘कुत्रे’ अशी करण्यात आली आहे, असे एका कागदपत्रात म्हटले आहे. यासह, कुराणाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत, की यामुळे पुरुषांना त्यांच्या घरातील महिलांवर बलात्कार करण्याची परवानगी मिळते.

अशा पोस्ट शोधून त्यावर कारवाई करण्याची तांत्रिक क्षमता नसल्याचे फेसबुकतर्फे यंपूर्वी सांगण्यात आले आहे. कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले होते, की अशा पोस्टवर कारवाई करण्यातील महत्त्वाची अडचण म्हणजे, फेसबुकची यंत्रणा हिंदी किंवा बंगाली भाषेत अशी सामग्री पकडण्यासाठी सक्षम नाही.

मात्र फेसबुकने अलीकडेच म्हटले आहे, की हिंदी, बंगाली, उर्दू आणि तमिळ या चार भारतीय भाषांचा समावेश कंपनीच्या प्रणालीमध्ये द्वेषयुक्त भाषण शोधण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

व्हिसल ब्लोअरच्या वकिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये ‘फेक न्यूज’ सोशल मीडियावर वाढत्या प्रमाणात कशा प्रकारे शेअर केल्या जात आहेत आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही याचाही उल्लेख आहे.

एका अंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देऊन असे म्हटले आहे, की  ‘भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्ये फेसबुकवर प्रति तास अंदाजे १ दशलक्ष ते १.५ दशलक्ष बनावट बातम्यांना लाईक्स, शेअर किंवा कमेंट्स प्राप्त होतात.’

व्हिसल ब्लोअरच्या मते फेसबुकची संकल्पना ‘डीप री-शेअर’ अशी आहे. याचा अर्थ असा की जर एखादी पोस्ट अनेक वेळा शेअर केली जात असेल, तर त्यामध्ये सनसनाटी, हानिकारक किंवा दाहक सामग्री असण्याची शक्यता जास्त असते.

यासंदर्भातील तक्रारीमध्ये पश्चिम बंगालचा नमुना सर्वेक्षण सादर करण्यात आले आहे. व्हिसल ब्लोअरचे म्हणणे आहे, की पश्चिम बंगालमधून शेअर केलेलया ४० टक्के पोस्ट या बनावट आहेत.

यासह, व्हिसल ब्लोअर फ्रान्सिस हॉगेनने असेही उघड केले आहे, की फेसबुक ‘एका वापरकर्त्याची अनेक खाती’ असल्यास त्या शोधण्यास सक्षम नाही.

यासंदर्भात मोठा प्रश्न असा आहे की कंपनी ‘डुप्लिकेट’ खाती बंद करण्यासाठी काही खरे प्रयत्न करत आहे की ही खाती बंद केल्याने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ‘गुंतवणूक’ कमी होईल याची त्यांना भीती वाटते.

‘लोटस महल’ नावाच्या दस्तऐवजाच्या आधारावर, हॉगेन म्हणाल्या, की भाजप आयटी सेल बनावट खाती वापरुन नरेटीव्ह बदल करण्यात कसे यशस्वी होतात, याची फेसबुकला संपूर्ण माहिती आहे.

फेसबुकवर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

गेल्या महिन्यात वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्राने मिळवलेल्या गोपनीय कागदपत्रांवरून असे दिसून आले, की फेसबुकने क्रॉसचेक (XCheck) नावाचा एक कार्यक्रम विकसित केला आहे,  जो सेलिब्रिटी, राजकारणी आणि पत्रकार यासारख्या उच्च-प्रोफाइल लोकांना नियमांची पायमल्ली करण्याची परवानगी देतो आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास प्रतिबंध करतो.

याआधी, वॉल स्ट्रीट जर्नलने स्वतःच एका बातमीत सांगितले होते की, नाराजीच्या भीतीने फेसबुक इंडियाने भाजप नेत्याच्या मुस्लीमविरोधी पोस्टवर कारवाई कशी केली नाही.

या बातमीत  म्हटले होते, की भारतातील दक्षिण आणि मध्य आशियाच्या प्रभारी फेसबुकच्या धोरण संचालक आंखी दास यांनी भाजपचे नेते टी. राजा सिंह यांच्याविरोधात फेसबुकच्या द्वेषयुक्त भाषणाच्या नियमांच्या अंमलबजावणीला विरोध केला होता, यामुळे कंपनीच्या संबंधांवर परिणाम होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

त्याचप्रमाणे, द गार्डियनने आपल्या एका बातमीत दावा केला होता की फेसबुकने भारतात बनावट खाती  काढून टाकण्याची योजना आखली होती, परंतु त्यात भाजपच्या एका खासदाराचेही नाव असल्याचे कळताच, ते मागे हटले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: