दिशाच्या अटकेवर देश-विदेशातून सरकारवर टीका

दिशाच्या अटकेवर देश-विदेशातून सरकारवर टीका

नवी दिल्लीः पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शनिवार

दिशा रवी टूलकिट : पोलिसांकडे एकही पुरावा नाही
अपुरे पुरावे; दिशा रवी यांना अखेर जामीन
दिशा, निकिता, शांतनूवर गंभीर आरोप

नवी दिल्लीः पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शनिवारी बंगळुरूमधून २१ वर्षांच्या पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांना अटक केल्यानंतर सोमवारी या अटकेवर देशविदेशातून मोदी सरकारवर टीका झाली. विरोधी पक्षापासून देशविदेशातील अनेक पर्यावरण संघटना, सामाजिक संघटनांनी अशा अटकेवर नाराजी प्रकट केली. दिशाला केलेली अटक ही दमनशाहीचे उदाहरण असल्याचा या संघटनांचा आरोप होता.

दिशा रवी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या अटकेची माहिती मीडियापर्यंत सरकारने पोहचू दिली नाही. त्यांना झालेल्या अटकेची फिर्यादही वेबसाइटवर अपलोड करण्यात आली नाही, असे आरोप अनेक ज्येष्ठ वकिलांनी दिल्ली पोलिसांवर केले. दिशाला न्यायालयाने सुनावलेली शिक्षाही त्यांना वकील न देता झाली, असे या वकिलांचे म्हणणे होते.

वरिष्ठ वकील रेबेका जॉन यांनी पतियाला न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निर्णयावर निराशा व्यक्त करत घटनेतील कलम २२चे पालन करण्याचे आवाहन केले. न्यायतत्वाचे पालन केले पाहिजे, दिशाच्या प्रकरणात मूलभूत न्यायतत्व पाळली गेली नाहीत, असे त्या म्हणाल्या.

अन्य एक वकील करुणा नंदी यांनीही कायद्याचा दुरुपयोग करून दिशाला ताब्यात घेतल्याचे फायनान्शियल एक्स्प्रेसला सांगितले. टूलकिटमध्ये सहभाग असला असे जरी मानले तरी त्यावर देशद्रोहाचा आरोप तोही तरुण पर्यावरण कार्यकर्त्यांवर लावणे हा सरकारचा अत्यंत अहंकार आहे, सरकार आपल्यावर टीका करण्यांविरोधात सूडाची भावना ठेवते असे त्या म्हणाल्या.

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनीही सरकार पर्यावरण कार्यकर्त्यांवर दडपशाहीचे प्रयोग करत त्यांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप केला. तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्त्या बिल मॅककिबेन यांनी दिशा रवी यांच्यावर लावलेले आरोप हास्यास्पद असल्याचे स्पष्ट करत जी व्यक्ती स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी व राहण्यासाठी स्वच्छ ग्रहासाठी रस्त्यावर आंदोलन करते, समाजासाठी झटते त्यांच्यावरच सरकारकडून दहशतवादाचे आरोप लावले जातात यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

दिशा रवी यांच्या अटकेवर संयुक्त किसान शेतकरी संघटनेही टीका केली. दिशा रवी यांना तत्काळ सोडावे अशी मागणी आमची असल्याचे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह विमेन्स असो.च्या सचिव कविता कृष्णन यांनी दिशा रवी यांच्या सुटकेची मागणी करत पोलिस व सरकारने अशा कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करावे अशी मागणी केली. दिशा रवी यांच्यासारखे कार्यकर्ते हे भारतासाठी दिलासा आहेत, त्यांना आपल्या नव्हे तर पुढच्या पिढीची चिंता आहे. अशा व्यक्तींच्य टूलकिटवर गुन्हे दाखल करणे हे हास्यास्पद व दुर्दैवी आहे, असे कृष्णन म्हणाल्या.

मानवाधिकार व सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाश्मी यांनीही दिशा रवीच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले. कोणत्याही सामाजिक चळवळीतला व्यक्ती हा टूलकिट तयार करत असतो, त्यात नवे असे काही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचेही टूलकिट असते ते त्यांनी जाहीर करावे. आपली व्यवस्था मूर्खपणाच्या सर्व मर्यादा पार करत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे हसे होत असल्याचा आरोप हाश्मी यांनी केला.

दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंच्या प्रमुख सुनीता नारायण यांनीही दिशा यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त केले. वाढते तापमान हे जगासाठी धोका आहे. हा धोका सांगणारी युवा पिढी जगभरात आपला आवाज उठवत आहे, त्यांचा आवाज सर्वांपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यांची सुटका केलीच पाहिजे, असे नारायण म्हणाल्या.

देशभरातील ५० शिक्षक, विचारवंत, सामाजिक व पर्यावरण कार्यकर्त्यांच्या कोअलिशन फ़ॉर एनव्हॉयरमेंटल जस्टिस इन इंडिया या संघटनेनेही एक पत्रक जारी करून सरकार दिशा रवी यांना अटक करून मूळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष वळवत असल्याचा आरोप केला. कोविडमुळे निर्माण झालेली बेरोजगारी, पेट्रोलच्या वाढत्या किंमती, महागाई, पर्यावरण प्रश्न देशापुढे आ वासून उभे असताना सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे, असा आरोप या संघटनेने केला.

रविवारी त्यांना पतियाला हाउस न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आहे. पोलिसांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.

या संदर्भात दिशा रवी यांनी, टूलकिटमधील दोन ओळी संपादित केल्याचे सांगितले. माझा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून शेतकरी आपल्याला अन्न व पाणी देतात, ते आपले अन्नदाते आहेत, त्यांच्या आंदोलनाचा आपल्यावर प्रभाव पडल्याचे रवी यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात अन्य दोन कार्यकर्ते निकिता व शांतनु यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिशा रवी यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलेले टूलकिट आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केले होते. दिशा रवी यांनी हे टूलकिट शेअर करताना त्यामध्ये काही बदल केले होते व ते पुढे फॉरवर्ड केले असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे.

दिशा रवी या ‘फ्राइडे फॉर फ्यूचर इंडिया’ या संस्थेच्या भारतीय शाखेच्या संस्थापक सदस्य असून या संस्थेमार्फत पर्यावरण जागृती, जागतिक तापमान बदल या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पातळीवर प्रबोधनात्मक चळवळ चालवली जाते. फ्राइडे फॉर फ्यूचर ही आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून ग्रेटा थनबर्ग यांनी स्वीडनच्या संसदेबाहेर निदर्शने केली होती.

दिशा रवी या बंगळुरू येथील प्रतिष्ठित विमेन्स कॉलेजमधील माउंट कार्मेल शाळेच्या विद्यार्थीनी आहेत.

दिल्ली पोलिसांनी या अगोदर ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या टूलकिटसंदर्भात देशद्रोह, देशात अशांतता माजवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

टूलकिट प्रकरण काय आहे?

गेल्या ४ फेब्रुवारीला दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ट्विट केल्याने दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्या टुलकिटवर सायबर गुन्हा दाखल केला होता. धर्म व जातीच्या आधारांवर दोन समाजांमध्ये मत्सर पसरवणे व गुन्हेगारी स्वरुपाचे षडयंत्र रचणे असे आयपीसी १५३ अ व १२० ब अंतर्गत गुन्हे या टूलकिटवर लावण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी फिर्यादीत मात्र ग्रेटा थनबर्ग यांचा उल्लेख केलेला नव्हता. पण दिल्ली आंदोलनावर मत व्यक्त करणार्या सोशल मीडियावरच्या सुमारे ३०० हून अधिक अकाउंटवर आमचे लक्ष असल्याचे सांगितले होते.

ग्रेटा थनबर्गने ३ फेब्रुवारीला मी शेतकर्यांच्या सोबत आहे, त्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांना माझे समर्थन आहे. घृणा, धमकी किंवा मानवाधिकाराचे उल्लंघन याने त्यात बदल होणार नाही, असे ट्विट केले होते. त्यानंतर देशभर गदारोळ उडाला होता.

४ फेब्रुवारीला ग्रेटाने तिच्या टुलकिटवर फिर्याद नोंदवल्यानंतरही आपला शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचे पुन्हा ट्विट केले होते.

द हिंदूच्या वृत्तात दिल्ली पोलिसांनी आपल्या फिर्यादीत थनबर्गवर आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एक भाग असल्याचा आरोप करत देशाला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचा ठपका ठेवल्याचे म्हटले होते.

ग्रेटाने ट्विटरवर एक टूलकिट शेअर केले होते, त्याचीही फिर्यादीत नोंद आहे. या टूलकिटमध्ये शेतकर्यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळावा व भारतीय दुतावासांपुढे निदर्शने केली जावीत, यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत, याची माहिती आहे.

४ फेब्रुवारीला दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले होते.

त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणताही दुष्प्रचार भारताच्या एकतेला संपवू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताची प्रगती रोखू शकत नाही. भारत विकासाच्या दिशेने एकजूट असल्याचे ट्विट करावे लागले होते.

या दोन व्यक्तींव्यतिरिक्त अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस, यूट्यूबर लिलि सिंह आदींनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता.

त्या अगोदर भारतीय परराष्ट्र खात्याने तातडीने एक ट्विट करून भारतातील शेतकरी देशाचा एक अविभाज्य भाग असून त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे हरप्रकारे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे व त्यावर उत्तरही मिळत आहे. अशावेळी फूट पाडणार्या वक्तव्यांकडे लक्ष न देता सौहार्दपूर्ण वातावरण राहावे व त्याचे समर्थन करावे, अशी विनंती केली होती. यासाठी परराष्ट्र खात्याने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” असा हॅशटॅगही लावला होता.

या घटनेनंतर तासाभरात बॉलीवूडमधील काही सरकार समर्थक सेलेब्रिटींनी सरकारच्या बाजूने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” हा हॅशटॅग वापरत ट्विट करण्यास सुरूवात केली. या सेलेब्रिटींमध्ये अक्षय कुमार, करण जोहर, अजय देवगण, एकता कपूर, सुनील शेट्टी आदींचा समावेश होता. तसेच बहुसंख्य मंत्र्यांनीही हे ट्विट रि-ट्विट केले होते. नंतर भारतरत्न व जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले होते.

भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर म्हटले होते.

अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते कीः शेतकरी भारताचा अत्यंत महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. त्यांच्या प्रश्नाचा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सरकारच्या प्रयत्नांना साथ देणे महत्त्वाचे असून मतभेद निर्माण करणार्यांकडे दुर्लक्ष करणे या घडीला महत्त्वाचे आहे.

करण जोहरने आपल्या ट्विटमध्ये आपण सर्वांनी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाचे त्यातून हित साधले जावे, कुणीही त्यापासून वंचित राहू नये, असे म्हटले होते.

एकता कपूर यांनी आपल्या ट्विटद्वारे, अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचाराविरोधात एकत्र उभे राहूया असे आवाहन केले होते.

अजय देवगण यांनी जनतेने अशा प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन केले होते.

तर सुनील शेट्टी यांनी असा प्रचार अर्ध सत्याहून अधिक भयंकर असल्याचे मत व्यक्त करत परराष्ट्र खात्याचे ट्विट शेअर केले होते.

संगीतकार कैलाश खेर यांनी भारत असा प्रचार सहन करणार नाही, असे ट्विट केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0