गांधी आणि विज्ञान

गांधी आणि विज्ञान

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस विशेष - केवळ आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच विज्ञान नव्हे. विज्ञान ही कोणताही प्रश्न सोडवण्याची एक पद्धत आहे. आधुनिक यंत्रांना, तंत्रज्ञानांना माणसाच्या डोक्यावर बसू न देता मानवी जीवन अधिक समाधानी, अधिक मानवतावादी बनवण्यासाठी विज्ञानाचा वापर केला पाहिजे हा गांधीजींचा दृष्टिकोन होता.

जेएनयू : एक महान विद्यापीठ बरबाद झाले त्याची गोष्ट
९६६ आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया सुरू
अभ्यासक्रमात वैदिक गणिताच्या समावेशाचा प्रस्ताव

सामान्यपणे असे मानले जाते की गांधीजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विरोधी होते. परंतु खरेतर तसे नाही. सत्याचा शोध घेणे ही विज्ञानाची प्रेरणा आहे. गांधीजींचे संपूर्ण जीवन हे सत्याचा शोध घेणे आणि त्याकरिता सतत प्रयोग करत राहणे यांनाच वाहिलेले होते.

गांधीजींच्या प्रयोगांमध्ये अनेक विषय दिसून येतात, जसे आहार, आरोग्य, शिक्षण, खादी, शेती, सफाई, ग्रामोद्योग, उत्पादन-तंत्र, अर्थव्यवहार, लोकव्यवहार, इत्यादी. गांधीजी यंत्रविरोधी नव्हते. गांधीजीं स्वत:च म्हटले आहे की मी यंत्रांच्या विरोधी कसा असू शकेन, जेव्हा माझे शरीरच एक नाजुक आणि गुंतागुंतीचे यंत्र आहे! मात्र अशी यंत्रे असू नयेत की त्यामुळे माणसालाच काम न राहिल्यामुळे तो निष्क्रिय व बेकार बनेल. गांधीजींचा विज्ञानविषयक विचारही त्यांच्या सर्व विचारांप्रमाणेच मानवतेवर आधारित आहे. केवळ वस्तूंचे ज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे, अशी त्यांची धारणा आहे.

गांधीजींनी विज्ञानाचे, वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व जाणले होते. विज्ञानात सत्याला स्थान आहे, सत्याच्या शोधाला स्थान आहे. पूर्वापार चालत आली आहे म्हणून त्याच एका कारणाने एखादी गोष्ट वैज्ञानिक ठरत नाही तर ती पुन्हा पुन्हा तपासणी करून घेतली पाहीजे असा गांधीजींचा आग्रह असे. विज्ञानात सत्याबरोबर अहिंसा या तत्त्वालाही स्थान असावे असा गांधीजींचा आग्रह होता. हिंसा म्हणजे दुसऱ्याला ठार मारणे, भोसकाभोसकी करणे, रक्तपात करणे, इजा पोचवणे आणि अहिंसा म्हणजे याविरूद्ध वर्तन एवढाच अर्थ गांधीजींना अपेक्षित नव्हता. एखाद्या व्यक्तिला वा समाजाला काम, रोजगार यांपासून वंचित करणे म्हणजेही हिंसा आहे. द्वेष वाढवण्यासाठी, युद्धे करण्यासाठी प्रवृत्त करणारे, हिंसेकडे नेणारे संशोधन वैज्ञानिकांनी करू नये असे गांधीजी सांगत. गांधीच्या काळात दोन जागतिक महायुद्धे झाली त्या युद्धांची भयानकता विज्ञान तंत्रज्ञानाने किती वाढवली ते गांधीजींना दिसले होते. युद्ध सोडून विज्ञान संशोधनाची दुसरी प्रेरणा व्यापार आणि नफेखोरी आहे. त्यातून माणुसकीपेक्षा विषमता वाढत जाते. या गोष्टी टाळण्यासाठी संशोधनात अहिंसा मूल्य असण्याचा गांधाजींचा आग्रह होता.

गांधीजींच्या अनेक साथींनी गांधीजींच्या वैज्ञानिक धारणांची तपासणी केली, त्यांना पारखले आणि त्यांमध्ये प्रयोग केले, त्यांचा विकास केला. एकप्रकारे त्यांनी गांधी-विज्ञान-तंत्रज्ञानाला साकार करण्याचे प्रयत्न केले. विनोबा भावे, मगनलाल गांधी, जे. सी. कुमारप्पा, वैद्य गंगाधरशास्त्री जोशी, जव्हेरभाई पटेल, वल्लभराम बैद, आप्पासाहेब पटवर्धन, कुंदर दिवाण, वाळुंजकरजी, लॉरी बेकर, बाबा आमटे अशी कितीतरी नावे या संदर्भात आपल्यापुढे येतात; ज्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत वैज्ञानिक योगदान दिले. अशा विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास केला की ज्यायोगे माणसाचे श्रम सुलभ होतील, बेरोजगारी न वाढता उलट रोजगारनिर्मिती होईल, ही तंत्रे तयार करण्यास व वापरण्यास सोपी असतील, स्थानिक पातळीवर, शक्यतो घरच्या घरी निर्माण होऊ शकतील, ती पर्यावरणस्नेही असतील व त्याने व्यक्ती व समाज स्वावलंबी बनेल. सर्वोदयाच्या व अंत्योदयाच्या प्रेरणेतून,त्याद्वारे त्यांनी जातीव्यवस्थेतील बंदिस्तपणा आणि विषमतेवरही आघात केला. गांधीजींची इच्छा अशी होती की सारे ‘सेवा संघ’ हे संशोधन संस्था बनावेत, ज्यातून ग्रामस्वावलंबनाच्या व ग्रामस्वराज्याच्या दिशेने वाटचाल होऊ शकेल.  गांधीजीचे कुठलेही प्रयोग सुटे-सुटे नव्हते तर त्यांच्या प्रत्येक प्रयोगात जीवनाशी जोडलेपण, सेंद्रियत्व आणि समग्रत्व होते. म्हणूनच त्यांचे प्रयोग ही जीवनदृष्टी आहे – व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि वैश्विक पातळीवर ही!

प्रत्येक व्यक्तिकडे असणाऱ्या क्षमता समाजाच्या भल्यासाठी वापरत सर्वांचा अधिक माणूसपणाकडे विकास करणे हे ध्येय्य गांधीजींना अभिप्रेत होते. जात, धर्म प्रांत, भाषा, लिंग हे भेद ओलांडून अखेरीस समाज आणि व्यक्ती यांच्यात परस्परपूरक संबंध राहतील ते त्याग आणि निष्ठा यांचे संगोपन करतील हा गांधींचा आशावाद होता तो आपण त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करून दाखवला पाहिजे.

विनय र. र. हे मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष असून, ते विज्ञानाच्या प्रसारासाठी सातत्याने कार्यरत असतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0