गोरखपूर बालहत्याकांड प्रकरण – डॉ. कफील खान निर्दोष

गोरखपूर बालहत्याकांड प्रकरण – डॉ. कफील खान निर्दोष

गोरखपूर : ऑगस्ट २०१७ मध्ये शहरातील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा दाखवल्याचा आरोप असलेले

मुलांमधील कोरोना संसर्गः बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स
कोविडमुळे देशभरातील २४ कोटी ७० लाख मुलांचे नुकसान
आसाम : दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही

गोरखपूर : ऑगस्ट २०१७ मध्ये शहरातील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा दाखवल्याचा आरोप असलेले निलंबित डॉ. कफील खान यांना विभागीय चौकशी समितीने निर्दोष म्हणून सर्व आरोपातून मुक्त केले आहे.

१५ पानाच्या चौकशी समितीच्या अहवालात डॉ. कफील खान यांनी मुलांचे मृत्यू रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांनी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर कमी असल्याची माहिती संबंधितांना दिली होती. प्रत्यक्ष दुर्घटना घडली तेव्हा डॉ. कफील खान यांनी बाहेरून ७ सिलेंडर आणून अनेक मुलांचे प्राण वाचवले असे नमूद करण्यात आले आहे.

डॉ. कफील खान यांनी या दुर्घटनेप्रकरणी पूर्वी ९ महिन्याचा तुरुंगवासही भोगलेला आहे. जामीनावर आल्यानंतर त्यांचे निलंबत्व उ. प्रदेश सरकारने मागे घेतलेले नव्हते.

ऑगस्ट २०१७मध्ये बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या अभावी ७० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उ. प्रदेशमधील आदित्य नाथ सरकारविरोधात देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उ. प्रदेश सरकारमधील प्रशासकीय बेजबाबदारपणा व आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती. पण सरकारने या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई न करता व राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा न देता डॉ. कफील खान यांच्यावर कर्तव्यच्युती, हलगर्जीपणा असे आरोप ठेवत त्यांना निलंबित केले होते व त्यांची रवानगी तुरुंगात केली होती. त्यावेळी डॉ. कफील खान यांनी आपल्याला या प्रकरणात मुद्दामून गोवण्यात आल्याचा आरोप केला होता. वास्तविक डॉ. कफील खान यांनी प्रसंगावधान दाखवत बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर आणून अनेक मुलांचे प्राण वाचवले होते. डॉ. कफील खान यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी प्रसारमाध्यमांसमोर आणून दिल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित केले होते.

गुरुवारी विभागीय चौकशी समितीने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर डॉ. कफील खान यांनी सरकारने क्लिनचीट दिल्याबद्दल आनंदी असल्याचे सांगत आपली अडीच वर्षे मात्र वाया गेल्याचे दु:ख व्यक्त केले. बीआरडी मेडिकल कॉलेजमधील मुलांचे प्राण वाचवण्यासाठी मी बाहेरून ऑक्सिजन मागवला होता आणि त्याने अनेक मुलांचे प्राण वाचले होते पण त्यावेळी कॉलेजमधील वरिष्ठ अधिकारी, आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांना वाचवण्यासाठी सरकारने मला ९ महिने तुरुंगात टाकले. तुरुंगात मला बाथरूमलाही जाऊ न देण्याची शिक्षा देण्यात आली. माझ्या भावावर प्राणघातक हल्ले झाले. माझ्या कुटुंबावर १०० रुपयांसाठी लोकांपुढे हात पसरवावे लागले अशी प्रतिक्रिया दिली.

ऑगस्ट २०१७मध्ये जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजमधील दुर्घटना ऑक्सिजनमुळे नव्हे तर संस्थेतील अंतर्गत गटबाजीमुळे घडल्याची प्रतिक्रिया दिली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0