महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि ठिकठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, आत्तापर्यंत वेगेवेगळ्या घटनांमध्ये ४० ल

‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’
भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळेचे तात्पुरते पुनर्वसन
कोकणसह प. महाराष्ट्राला लवकरच आर्थिक मदत

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि ठिकठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, आत्तापर्यंत वेगेवेगळ्या घटनांमध्ये ४० लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेपत्ता आहेत.  यामध्ये दरड कोसळणे, रास्त खचणे आणि वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई या गावामध्ये दरड कोसळून त्याखाली घरे दबली गेली आहेत. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजून ४० जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच साखर सुतार वाडी येथेही दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

तळई येथे सकाळी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यावेळी ढिगारा उपासण्याचे काम सुरू झाले. त्यात अनेकजणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

गुरुवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास तळईमध्ये ही घटना घडली. या घटनेमध्ये ८० जण दबले गेले असल्याची माहिती तळई गावातील नागरिकांनी दिली. ‘एनडीआरएफ’ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून १७ जण अडकल्याची माहिती आली आहे. तर बीरमणी येथे दोन जण अडकल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी ही माहिती समोर आली. या ठिकाणी एनडीआरफच्या दोन टीम पोहोचल्या असून, मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. बीरमणी येथे नुकताच रस्ता खचला होता.

तळई , गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले.

राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे राज्य शासनातर्फे सांगण्यात आले.

अतिवृष्टीमुळे कोकणातील सर्व भागामध्ये पुर आले असून, गावांचा संपर्क तुटला आहे. महाडमध्ये पूरग्रस्तांच्या बचावकार्याला सुरवात झाली आहे. काही ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, वाई तालुक्यांमध्ये दरड कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जावळी व वाई या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन असे चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. पाटण तालुक्यातील ढोकावळे येथे डोंगर कोसळल्यामुळे चार लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर, इतर लोकांना गावातील मंदिरात आश्रय देण्यात आला आहे.

पाटण तालुक्यातील मोरणा विभागात खालचे आंबेघर येथे दरड कोसळून ढिगाऱ्याखाली १४ लोक अडकल्याची घटना घडली. तसेच कोयनानगर, मिरगाव येथेही दरडी कोसळल्या आहेत.

वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुराच्या प्रवाहात मालक आणि बैलांसह बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली.

मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीचे पानी वाढत असून, नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. शहरात पंचगंगा नदी तसेच स्थानिक ओढ्यांचे पाणी नागरी भागात घुसत आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने गुरुवरपासूनच शेकडो आपद्ग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. काही भागांकहा संपर्क तुटला आहे. अनेक घरात पाणी घुसले आहे.

बचावकार्य आणि मदतीचा आढावा घेण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. मध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत.” डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पुरात अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. या परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0