राज्यात अतिवृष्टीग्रस्तांना मदत

राज्यात अतिवृष्टीग्रस्तांना मदत

मुंबईः गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीच्या दु

‘पुरामुळे नुकसान रोखण्यासाठी कठोर निर्णय हवेत’
कोकणसह प. महाराष्ट्राला लवकरच आर्थिक मदत
भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळेचे तात्पुरते पुनर्वसन

मुंबईः गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम देण्याचा आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपापली जबाबदारी गांभीर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबई मेट्रो मार्गिका -३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता 

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी रु. होता तो आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख रुपयांचा होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे.

सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाख वरून ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख एवढी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख रु. अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

या सुधारित वित्तीय आराखड्यानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे (जायका) कर्ज १३ हजार २३५ कोटी रु.वरून १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख रु. इतके झाले असून वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.

मुंबई मेट्रो मार्ग -३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानक असून वर्ष २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्त्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ ५० मिनिटांत करणे सहज शक्य होणार आहे.

सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के एवढे काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर शासकीय जमीन व २.५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. 

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता 

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

रत्नागिरी शहर हे कोकणातील उच्चशिक्षणाचे देखील प्रमुख केंद्र आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असून लोकसंख्या १६.९६ लाख आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच निर्माण करण्यात येणाऱ्या श्रेणीवर्धित जिल्हा रुग्णालयाचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याची वैद्यकीय व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: