ती ऑफर नाकारली – पवार

ती ऑफर नाकारली – पवार

एकत्र काम करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली होती, मात्र आपण ती नाकारल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ‘एबीपी

उ.प्रदेशात हिंसाचारात ६ ठार, दिल्लीत निदर्शने सुरूच
मोदींच्या सुरक्षिततेला काँग्रेसकडून धोका: भाजप
नव्या संसद इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

एकत्र काम करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली होती, मात्र आपण ती नाकारल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीला शरद पवार यांनी मुलाखत दिली. त्यामध्ये हा खुलासा त्यांनी केला.

“राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत मोदींची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर मोदींनी मला थांबण्यास सांगितले आणि माझ्यासमोर एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. आपण एकत्रित काम केले तर मला त्याचा आनंद होईल, असे मोदी म्हणाले. त्यावर आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत आणि ते यापुढेही राहतील. पण राजकीयदृष्ट्या तुमच्यासोबत काम करणे मला शक्य होणार नाही, असं सांगून मी त्यांची ऑफर नाकारली,” असे पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले, “देशाचा विकास, उद्योग आणि शेतीबाबतची आपली मते सारखी आहेत. त्यात आपली भूमिका वेगळी नाही, मग मतभिन्नता कुठे आली? असा सवाल करत विरोधकांनीही आमच्यासोबत येऊन देशासाठी काम केलं पाहिजे, असे मोदी म्हणाले. त्यावर विरोधाला विरोध करणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे तुम्हाला विरोधाला विरोध होणार नाही. तसेच मी एक छोटासा पक्ष चालवतो. माझ्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आजपर्यंत जी दिशा दिली आहे, ती बदलणे आता मला शक्य होणार नाही, त्यामुळे तुमचा एकत्रित येण्याचा आग्रह मी स्विकारू शकत नाही.”

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीबाबतही पवार यांनी काही खुलासे केले. पवार म्हणाले, “एके दिवशी अजित पवार मला म्हणाले, की देवेंद्र फडणवीस काही बोलायचे म्हणतात, मी जाऊ का? राजकारणात संवाद महत्त्वाचा असतो, त्यामुळे मी म्हणालो, की बोलायला काहीच हरकत नाही. पण दुसऱ्या दिवशी असे काही घडेल, याची मला अजिबात कल्पना नव्हती.”

पवार पुढे म्हणाले,”आजच्या आज तुम्ही शपथ घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, अशी अट अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना घातली होती. मात्र यातील मला काहीही माहित नव्हते. मलाही सकाळीच फोन येऊ लागल्यावर आल्यावर मी टीव्ही पाहिला तेव्हा अजितने शपथ घेतल्याचे मला समजले. एवढ्या सकाळी हे घडतंय हे पाहून मला विश्वासच बसला नाही. मात्र शपथविधीला उपस्थित असलेले चेहरे पाहिल्यानंतर मी निर्धास्त झालो. कारण माझ्या शब्दाचा मान ठेवणारे हे लोक होते. ते परत येतील आणि जे घडलंय ते आपण दुरुस्त करू शकतो, याचा मला विश्वास होता,. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे सुद्धा एवढ्या पहाटे किती जोमाने काम करतात, हे सुद्धा मला पहिल्यांदाच पाह्यला मिळाले.”

देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील आणि दिल्लीतील अनेक नेते नाराज असल्याचेही पवार यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: