आदरणीय गृहमंत्री, मला कोणत्या कायद्याखाली स्थानबद्ध केलेय?

आदरणीय गृहमंत्री, मला कोणत्या कायद्याखाली स्थानबद्ध केलेय?

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष व जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची धाकटी मुलगी इल्तिजा मुफ्ती गेल्या ५ ऑगस्टपासून श्रीनगर शहरातील गुपकर मार्गावरील त्यांच्या घरात स्थानबद्ध आहे.

‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा
मुस्लिमांना का वगळले – सुभाषबाबूंच्या नातवाचा सवाल
शेतकऱ्यांचा रेल्वे रोकोचा इशारा

७ ऑगस्टला ‘द वायर’चे संस्थापक संपादक, सिद्धार्थ वरदराजन यांनी इल्तिजा यांची त्यांच्या घरी भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या घराबाहेर तैनात असलेल्या साध्या गणवेशातील पोलिसांनी त्यांना भेट घेण्याची परवानगी दिली नाही. ‘वरून ऑर्डर’ असल्याने तुम्हाला इल्तिजा यांची भेट घेता येणार नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.

१५ ऑगस्टला इल्तिजा यांनी एका विश्वासू सहकाऱ्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संबोधित केलेले पत्र ‘द वायर’ला पाठवले. हे पत्र खालील प्रमाणे.

आदरणीय गृहमंत्री

श्री. अमित शहा,

नॉर्थ ब्लॉक,

नवी दिल्ली ११०००१

 

महोदय,

मला कोणत्या कारणास्तव स्थानबद्ध केलेय हे स्पष्ट कळत नसल्यामुळे मला तुम्हाला एक पत्र लिहावं लागत आहे. माझ्या मूलभूत अधिकारांचा भंग केला म्हणून माझी जी तक्रार आहे त्याबद्दल मला शिक्षा/दंड किंवा अटक केली नसावी अशी मला आशा वाटते.

काश्मीर अंध:कारातून जातोय आणि यावर आपले मत व्यक्त करणाऱ्यांची व अन्य जनतेच्या सुरक्षिततेविषयी मला भीती वाटत आहे. ५ ऑगस्ट २०१९ला ३७० कलम रद्द केल्याने सर्वसामान्य काश्मीरी नागरिक अत्यंत वेदनेतून, दु:खातून जात आहे. त्याच दिवशी माझी आई श्रीमती मेहबुबा मुफ्ती ज्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या त्यांना अटक करण्यात आली. शिवाय त्यांच्यासोबत अनेक लोकप्रतिनिधींनाही अटक करण्यात आली.

आता राज्यात संचारबंदी लागू होऊन १० दिवस होत आहेत. संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील दळणवळण यंत्रणा बंद केल्याने काश्मीरी नागरिक भीतीच्या छायेत आहे. आज संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना काश्मीरी नागरिकाच्या मानवाधिकाराची पायमल्ली करून जनावराला जसे पिंजऱ्यात ठेवण्यात येते तसे त्यांना ठेवण्यात आले आहे.

दुर्दैवाने मलाही माझ्या घरात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यामागील कारण मला माहिती नाही. पण तुम्हाला ते माहिती असावे. आम्हाला घरी भेटायला कोण येतेय आणि त्यांना गेटवरून बाहेर जायला कोण सांगतेय याची मला काहीही माहिती नाही. मलाही बाहेर जाऊ दिले जात नाही. वास्तविक मी कोणत्याही पक्षाची सदस्य नाही. मी या देशाच्या कायद्याचे पालन करणारी एक नागरिक आहे.

मी काही मीडिया पोर्टल, वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना मुलाखती दिल्या होत्या, त्यामुळे मला स्थानबद्ध केले आहे, असे सुरक्षा दलाने माझ्या अटकेमागचे कारण सांगितले आहे. वास्तवात मीडियाशी पुन्हा बोलला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी मला धमकी देण्यात आली आहे.

मी माझी आई, त्याचबरोबर ५ ऑगस्टला तुरुंगात डांबलेले शेकडो राजकीय कार्यकर्ते यांच्या सुरक्षिततेविषयी चिंतित आहे.

तुमच्या पदाचा सन्मान राखून मला असे विचारायचे आहे की, हजारो काश्मीरींचे आवाज बंद केल्याच्याविरोधात मी बोलले म्हणून मला शिक्षा केली जात आहे का? एखाद्याच्या वेदनेबाबत, यातनेबद्दल, रागाबाबत व्यक्त होणे हा गुन्हा आहे का?

मला जाणून घ्यायचे आहे की कोणत्या कायद्यातंर्गत मला ताब्यात घेण्यात आले आहे? आणि मला किती दिवस असे ठेवले जाणार आहे? मला या विरोधात कायद्यांतर्गत दाद मागण्याची गरज आहे का?

आमच्याशी अशा तऱ्हेने वागल्याने आमची प्रचंड घुसमट होते, ते अपमानास्पद वाटतं. माझ्या आजीला तिच्या मुलाला भेटायचे आहे, त्यासाठी परवानगी हवी म्हणून मी लोटांगण घालावं का? का माझी आजीही सरकारला धोका वाटते?

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात दमनशाहीविरोधात बोलणे एवढाही कुणाला अधिकार नाही का? ‘सत्यमेव जयते’ म्हणजे सत्याचा अंतिम विजय असतो. ही धारणा आपल्या देशाची आहे आणि आपली राज्यघटना त्या तत्वावर उभी आहे. पण शोकांतिका अशी आहे की मला सत्य बोलल्याबद्दल युद्धकैद्यासारखं वागवलं जात आहे.

हे पत्र मी तुम्हाला पाठवलं नसल्याबद्दल मी माफी मागते त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे की, जम्मू व काश्मीरमध्ये पोस्टल सेवा अनेक दिवसांपासून बंद आहे.

सत्याचा विजय असो

विनम्र

इल्तिजा मुफ्ती

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0