कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्यः आयएमए

कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्यः आयएमए

नवी दिल्लीः सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून होणारी गर्दी, वाहनांची वर्दळ, कोविड-१९ मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन, सरकारने लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता व धा

‘मंदिरातील प्रसादावर, त्या दिवस ढकलत आहेत’
मुख्यमंत्री निधीला काँग्रेस आमदारांकडून मासिक वेतन
‘दिया जलाओ’ : कोट्यवधी रु.च्या महसूलावर पाणी

नवी दिल्लीः सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून होणारी गर्दी, वाहनांची वर्दळ, कोविड-१९ मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन, सरकारने लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता व धार्मिक सण, मेळावे व उत्सवांमध्ये दिसून येत असलेला कायद्याचा भंग यामुळे कोविड-१९ची तिसरी लाट अपरिहार्य असल्याची भीती इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने व्यक्त केली आहे.

पर्यटकांचा वाढता उत्साह, तीर्थस्थळांवर भाविकांची होणारी गर्दी थांबवता आली तर तिसरी लाट रोखता येईल, असेही आयएमएने म्हटले आहे.

कोविड-१९ची तिसरी लाट वेगाने व अधिक भयावह असेल अशी मते अनेक साथरोग तज्ज्ञ व वैद्यकीय जगतातून व्यक्त केली जात आहेत, पण या भीतीकडे प्रशासन, राजकीय पक्ष व नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. सध्या तर अनेक पर्यटन ठिकाणी पर्यटकांची तुफान गर्दी होताना दिसत आहे. या ठिकाणांवर तर कोविड-१९ मार्गदर्शक नियमांचे सरळ सरळ उल्लंघन होताना दिसत आहेत. सरकार अनेक धार्मिक उत्सव, मेळावे यामध्ये होणार्या गर्दीकडेही दुर्लक्ष करताना दिसत आहे. सरकारने अशा सोहळ्यांना, कार्यक्रमांना परवानगी नाकारल्यास किंवा असे धार्मिक कार्यक्रम काही महिने पुढे ढकलल्यास कोविडची तिसरी लाट थोपवता येईल, असे आयएमएचे म्हणणे आहे.

धार्मिक सोहळ्यांमध्ये लसीकरण न झालेल्या अनेकांचा सहभाग होत आहे, त्यामुळे कोविड संसर्ग पसरू शकतो. आपल्याकडे संपूर्ण लसीकरण झालेले नाही. त्यामुळे कोविडची तिसरी लाट वेगाने पसरू शकते असे आयएमएचे मत आहे.

काही दिवसांपूर्वी ओदिशामध्ये जगन्नाथ यात्रेला व उत्तर प्रदेश वा उत्तराखंडमध्ये कांवड यात्रांना दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर आयएमएने आपले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान मंगळवारी संध्याकाळी कांवड यात्रेला उत्तराखंड सरकारने परवानगी नाकारली आहे.

या अगोदर आयएमएने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना एक पत्र लिहून कावड यात्रेला परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. ही यात्रा २ जुलैमध्ये सुरू झाली असून ती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहते. या यात्रेत उ. प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली व हिमाचल प्रदेशातील लाखो भाविक सामील होत असतात. या यात्रेत सामील झालेले भाविक गंगेचे पाणी मिळवण्यासाठी अखेरीस हरिद्वारला जमा होतात.

गेल्या वर्षी या यात्रेला परवानगी नाकारण्यात आली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: