चीनची ताठर भूमिका, गलवान खोरे आपलेच असल्याचा दावा

चीनची ताठर भूमिका, गलवान खोरे आपलेच असल्याचा दावा

भारत व चीनने ‘14 (PP14)’, ‘PP15’, ‘PP17’, ‘पँगाँग त्सो सरोवराचा उत्तर भाग’ व ‘चुशूल’ हे महत्त्वाचे ५ गस्तीचे भाग (पॅट्रोलिंग पॉइंट) वादग्रस्त मुद्दे असल्याचे मान्य केले आहे. पण या वादग्रस्त मुद्द्यांमध्ये गलवान नदीच्या खोर्याचा उल्लेख नाही. वास्तविक याच भागात चीनने आपले लष्कर तैनात केले आहे.

लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर चीनचे सैन्य : संरक्षणमंत्र्यांची कबुली
‘चीन, इटलीपेक्षा भारतातून आलेला विषाणू घातक’
चीन-भारत तणाव चिघळला, २० जवान शहीद

लडाखमधील चीनच्या घुसखोरीवरून भारत-चीनदरम्यान गेल्या शनिवारी लडाखमधील चुशूल येथे उभय देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीनंतर उभय देशांच्या लष्करांनी म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मी व भारतीय लष्कराने या समस्येवर बुधवारी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता.

पण लष्करातील काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लडाखमध्ये मे महिन्यात ज्या भागात चीनचे सैन्य घुसले आहे व जो भूभाग ताब्यात घेतला आहे, त्या प्रदेशातून आपले सैन्य हटवले जाणार नाही अशी ठाम भूमिका चीनने घेतल्याचे समजते. एवढेच नव्हे तर शनिवारी उभय देशांमध्ये झालेल्या चर्चेत चीनने गलवान नदीच्या खोर्यात तैनात केलेल्या आपल्या सैन्याचा विषयही चर्चिला जाणार नाही, असे सांगितले आहे.

उभय देशांमध्ये हा तीव्र मतभेदाचा मुद्दा उपस्थित झाल्याने व त्यावर तोडगा न निघाल्याने दोन्ही देशांनी संयुक्त पत्रकही प्रसिद्ध केले नाही. भारताच्या बाजूने लेह कॉर्प्सचे कमांडर लेफ्ट. जनरल हरिंदर सिंग तर चीनच्या बाजूने दक्षिण शिंगजिंयांग लष्करी विभागाचे मेजर जनरल लियू लिन यांच्यात चर्चा झाली. या चर्चेचा तपशील लष्कराकडून जारी करण्यात आला नाही पण दिल्लीत सरकारकडूनही त्यावर काही टिप्पण्णी जाहीर करण्यात आली नाही. जेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लडाखमधील चीनच्या घुसखोरीबद्दल सरकारची काय भूमिका आहे असे प्रश्न विचारल्यानंतर भारतीय लष्कराने एक पत्रक प्रसिद्ध केले.

या पत्रकात असे नमूद करण्यात आले की, भारत व चीनदरम्यान लष्करी अधिकार्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली असून ही चर्चा अजून पुढे होणे आवश्यक आहे. या चर्चेत उभय देशांनी 14 (PP14), PP15, PP17, पँगाँग त्सो सरोवराचा उत्तर भाग व चुशूल हे पाच महत्त्वाचे गस्तीचे भाग (पॅट्रोलिंग पॉइंट) दोन्ही देशांदरम्यानचे वादग्रस्त मुद्दे आहेत. पण या वादग्रस्त मुद्द्यांमध्ये मुख्य प्रश्न गलवान नदीच्या खोर्याचा समाविष्ट करण्यात आला नव्हता. वास्तविक याच भागात चीनने आपले लष्कर तैनात केले आहे.

दौलत बेग ओल्डी रस्त्याचा नकाशा

दौलत बेग ओल्डी रस्त्याचा नकाशा

गलवान नदी खोरे

भारत-चीनच्या बैठकीत चीनने गलवान नदी खोरे आपल्या नियंत्रणात असल्याचे सूचकपणे सांगितले आहे. पण हाच चीन पूर्वी गलवान नदी खोर्याबाबत आग्रही नव्हता. आता चीनची तशी भूमिका राहिलेली नाही. चीनने आता संपूर्ण गलवान नदी खोर्यावर आपला हक्क सांगत असून या खोर्यातील शिखरेही आपल्या ताब्यात असल्याचा दावा चीनने केला आहे.

गलवान नदीच्या पूर्वेकडे भारताने शायोक-गलवान नदी जंक्शन असा एक किमी लांबीचा पक्का मार्ग बांधला असून ही भारताची चीनच्या प्रदेशात घुसखोरी असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीनचे असेही म्हणणे आहे की हा रस्ता पक्का डांबरी स्वरुपाचा आहे.

चीनच्या या दाव्यावर भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले की, ज्या ठिकाणाहून गलवान नदीचा प्रवाह शायोक नदीत मिसळतो तेथून चीनने ५ किमी लांबीचा पक्का रस्ता बांधला असून हा रस्ता प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून जातो. त्यावर चीनचे म्हणणे आहे की, गलवान नदीचे खोरे हा त्यांचाच अधिकृत प्रदेश असल्याने त्यांनी तेथे रस्ता बांधला आहे.

भारताने या बैठकीत चीनने तैनात केलेल्या सैन्यावरही तीव्र आक्षेप घेतला. भारताच्या गोग्रा ठाण्यानजीक चीनचे सैन्य जमा झाले आहे. पण भारताच्या या आक्षेपावरही चीनने योग्य रितीने प्रतिक्रिया दिली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हॉट स्प्रिंग व गोग्रा दरम्यान चीन रस्ता बांधत आहे, या भारताच्या आक्षेपावरही चीनने प्रतिक्रिया दिलेली नाही.

पँगांग त्सो प्रदेश

पँगाँग त्सोच्या उत्तर भागाबाबत चीनने असा दावा केला आहे की, त्यांचा या भागात सैन्य तैनात करण्याचा निर्णय योग्य असून या भागातून फिंगर-4 पर्यंतचा रस्ता त्यांनी आपल्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी बांधला आहे.

मे महिन्याच्या आधी फिंगर-4 च्या पूर्वेकडून सुमारे ८ किमी अंतरावर असलेल्या फिंगर-8 भागापर्यंत भारतीय लष्कराच्या तुकड्यांकडून नियमित गस्त घातली जात असे. पण ५ मे नंतर चीनच्या लष्कराचे हजारो सैन्य या भागात घुसले व त्यांनी गस्तीवर असलेल्या भारतीय सैन्यावर शारीरिक हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्याला फिंगर-4 च्या पलिकडेही गस्त घालणे अशक्य झाले आहे. आता हाच भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असल्याचा चीन दावा करत आहे.

मे महिन्यात चीनच्या सैन्याकडून भारतीय सैनिकांना झालेली मारहाण ही योग्य नव्हती असे चीनने मान्य केले असले तरी भारताचे सैन्य चीन दावा करत असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत घुसले होते असे त्यांचे म्हणणे आहे.

काय मिळवलं, काय गमावलं

भारतीय लष्कराच्या सूत्रांनुसार चीनने अत्यंत महत्त्वाचे गलवान खोरे ताब्यात घेतल्याने दरबुक-शायोक-दौलत बेग ओल्डी मार्ग ते काराकोरम खिंडीतील देस्पांगपर्यंतच्या भूभागावर त्यांना लक्ष ठेवता येणे शक्य झाले आहे. चीनने देस्पांग भागाच्या पलिकडे मोठ्या प्रमाणात चिलखती छावण्या उभ्या केल्या आहेत. चीनच्या या हालचाली निश्चितच अस्वस्थता निर्माण करणार्या आहेत.

दुसरीकडे चीनच्या नाकू ला (सिक्कीम) व हर्सिल आणि लिपू लेख (उत्तराखंड) या भागातील हालचालीही भारतीय लष्कराचे लक्ष अन्यत्र वळवणार्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून अरुणाचल-तिबेट सीमा (मॅकमोहन रेषा) भागावर काटेकोर लक्ष ठेवले जात असून या प्रदेशात चीनने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत, हे विशेष आहे.

मंगळवारी भारतीय लष्कराने चीनच्या घुसखोरीवर लष्करी व राजकीय दृष्टीकोनातून उत्तर शोधले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. जो पर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तोडगा निघत नाही तोपर्यंत अशा घटना, कटूप्रसंग उद्भवत राहणार असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने सीमा प्रदेशात मोठ्या प्रमाणावर फायटर बॉम्बर्स, रॉकेट फोर्सेस, रडार यंत्रणा, जॅमर्स अशी मोठी युद्धसामग्री तैनात केली आहे. त्यामुळे भारतालाही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आपली युद्धसामग्री तैनात करावी लागत आहे. चीन जोपर्यंत आपली शस्त्रसज्जता कमी करत नाही तोपर्यंत भारतही आपली शस्त्रसज्जता कमी करणार नाही, असे लष्करी सूत्रांचे म्हणणे आहे.

लेखाचे छायाचित्र – लडाखचा गुगल मॅपवरील नकाशा  

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0