देशभरात अभूतपूर्व आंदोलन

देशभरात अभूतपूर्व आंदोलन

नवी दिल्ली/मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गुरुवारी देशभर मोठ्या प्रमाणावर प्रक्षोभ दिसला. राजधानी दिल्लीसह, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेशातील

चेंजमेकर ‘ नंदीग्राम’
३७० कलम रद्द केल्याचे अंतिम साध्य काय?
३७० कलम रद्द करण्याचा संसदेत प्रस्ताव

नवी दिल्ली/मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गुरुवारी देशभर मोठ्या प्रमाणावर प्रक्षोभ दिसला. राजधानी दिल्लीसह, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेशातील लखनौ, प. बंगाल, केरळ, राजस्थान, कर्नाटक या राज्यांत हजारोंच्या संख्येने सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. हा कायदा देशाच्या धर्मनिरपेक्षता मूल्यावर प्रहार असून त्याने हिंदू-मुस्लिम अशी फाळणी पडेल असे आंदोलकांचे म्हणणे होते.

मुंबई व महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद

मुंबईमध्ये झालेली निदर्शने. छायाचित्र – मयूर खैरे

मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर शहरातील सुमारे ५०० विविध संघटना, सर्व धर्माचे हजारो नागरिक, तरुण-तरुणी, बॉलीवूड स्टार उपस्थित होते. अत्यंत संयमाने हजारो नागरिक ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने दुपारी चारच्या सुमारास जमा होत होते. कोणताही अनुचित प्रकार मुंबईच्या आंदोलनात दिसून आला नाही. पोलिसांच्या नियोजनाने मोर्चाही शिस्तबद्ध चालत होता. आंदोलनाला गर्दी वाढत असल्याचे लक्षात आल्याने काही काळ दक्षिण मुंबईत इंटरनेट बंदी घालण्यात आली होती. पण नंतर ती काढण्यात आली. पण मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात ‘डिसेंबर क्रांती’ पाहावयास मिळाली. जे बॉलीवूड स्टार उपस्थित होते त्यांनी आपण पहिले या देशाचे सामान्य नागरिक असून या मानवी हक्कांच्या समर्थनासाठी आपण येथे आलो आहोत असे सांगितले. स्वरा भास्कर यांनी फॅसिस्ट शक्ती, गरीबी, भूक बेरोजगारीच्या विरोधात ‘आझादी’चे नारे दिले.

मुंबईमध्ये झालेली निदर्शने. छायाचित्र – मयूर खैरे

ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेले आंदोलन. छायाचित्र – मयूर खैरे

नागपूरमध्ये राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने गुरुवारी लाखो नागरिक विधानसभेच्या दिशेने चालत होते. अत्यंत शिस्तबद्ध व समाजातील सर्व जातीधर्मातील नागरिक या मोर्चात सामील झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व भारतीय मुस्लीम परिषदेने केले होते. शहरातल्या सर्व पुरोगामी, डाव्या संघटना यात सामील झाल्या होत्या. ‘एक महाराष्ट्र जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद’, ‘हक है हमारा आजादी’, ‘गांधीजी की आजादी’, ‘आंबेडकर की आजादी’, ‘अब्दुल हमीद की आजादी, छिन के लेंगे आजादी’ अशा घोषणा मोर्चेकरी देत होते.

मालेगावातही मोठ्या प्रमाणावर मुस्लिम नागरिक रस्त्यावर उत्स्फुर्तपणे मोर्चात सामील झाले होते. औरंगाबादेतही अनेक दलित व मुस्लिम संघटना हजारो कार्यकर्त्यांच्या मदतीने मोर्चात सामील झाले होते. कोल्हापूर, उस्मानाबादेतही शांततेत मोर्चा झाला.

पुण्यात महात्मा फुले वाडा ते मंडई येथी लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. छायाचित्र – सम्राट शिरवळकर

पुण्यात शेकडो तरुणतरुणी अत्यंत उत्स्फुर्तपणे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सामील झाले होते. नागरिकत्त्व कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली, तर आम्ही कोणतेही कागदपत्र सरकारला सादर करणार नाही,  अशी प्रतिज्ञा मोर्चाच्या शेवटी घेण्यात आली. भारतीयत्व एकात्मतेचे प्रतीक म्हणून एकमेकांना दोस्तीचा धागा बांधण्याचा प्रतीकात्मक कार्यक्रम झाला.

या सर्व शहरांतल्या आंदोलनात अखंड भारताचा नारे नागरिकांच्या तोंडून निघताना दिसले. हुकुमशाहीचा निषेध करणारे अनेक फलक आंदोलनकर्त्यांकडे दिसत होते. नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीमुळे केवळ मुस्लिम नव्हे तर सर्व जातीधर्मातील गरीब वर्गाला त्याची नोटबंदीप्रमाणे जबर किंमत चुकवावी लागेल अशा प्रतिक्रिया मिळत होत्या. केंद्र सरकार असे कायदे आणून भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर व लोकशाहीवर घाला घालत असल्याच्याही टीका नागरिक करत होते. देशापुढे बेरोजगारी, मंदीसारखे भयावह प्रश्न असताना धर्माच्या नावावर फाळणी पाडण्याचा सरकारच्या प्रयत्नांचा सर्व थरातून निषेध होताना दिसला.

दिल्लीत पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन

गेले काही दिवस जामिया मिलियातील पोलिस दडपशाहीविरोधात दिल्लीतले नागरिक रस्त्यावर आले होते. गुरुवारी मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्माचे नागरिक पुन्हा रस्त्यावर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आले. दिवसभर हजारोंच्या जथ्याने महाविद्यालयीन युवक, नागरिक शहरातील जंतरमंतरसह, कॅनॉट प्लेस, मंडी हाऊस, राजीव चौकात, इंडिया गेट, लाल किल्ल्याच्या परिसरात जमा होत होते. आंदोलन कर्ते सीएएसे आझादी, एनआरसी से आझादी, सारे जहाँ से अच्छा अशा घोषणा देत होते.

एवढ्या प्रचंड संख्येने नागरिक रस्त्यावर आल्याने दिल्लीची वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली. २० मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते. संध्याकाळी उशीरा मेट्रो स्टेशन सुरू करण्यात आले.

विरोधीपक्षाचे डी. राजा, सीताराम येचुरी, नीलोत्पल बसू, वृंदा करात, अजय माकन, संदीप दिक्षित, योगेंद्र यादव, उमर खालिद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांना दिले गुलाबाचे फूल

जंतरमंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी गांधीगिरीचा एक अनोखा अनुभव दिल्ली पोलिसांना दाखवून दिला. ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर काही दिवसांपूर्वी अमानुषपणे लाठीमार केला होता, त्याच पोलिसांना विद्यार्थी गुलाबाचे फुल देत होते.

वे हम पर चाहें जितना लाठी चला सकते हैं, हम तब भी उन्हें गुलाब ही देंगे. घृणा के बदले में प्यार. हम उनके वाटर कैनन और आंसू गैस का सामना करने को तैयार हैं. असे संदीप धीमान या विद्यार्थ्याने द वायरच्या प्रतिनिधीला सांगितले.

उत्तर प्रदेशात लखनौमध्ये हिंसाचार

उ. प्रदेशची राजधानी लखनौ व संभल या दोन शहरात हिंसाचाराच्या काही घटना दिसल्या. हजारो नागरिक रस्त्यावर आंदोलनासाठी आले असता काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली व वाहनांना आगी लावल्या. या घटनेनंतर खबरदारी म्हणून राज्यसरकारने संपूर्ण राज्यात १४४ कलम लागू केले. सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी ज्यांनी सार्वजनिक मालमत्तांना आग लावली आहे त्या समाजकंटकांकडून सर्व पैसा वसूल केला जाईल अशी धमकी दिली आहे.

कर्नाटकातही निदर्शने, मंगळुरूच लाठीमार

कर्नाटकात बंगळुरू, हुबली, कलबुर्गी, हासन, म्हैसूर, बेल्लारी या शहरात हजारोच्या संख्येने सर्वधर्माचे नागरिक रस्त्यावर उतरले होते. बंगळुरूमध्ये प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आपले आंदोलन अहिंसा व शांततेत, हातात देशाची राज्यघटना असताना पोलिसांनी आपल्याला का पकडले असा सवाल त्यांनी केला. मंगळुरूत पोलिसांवर आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीमार केला.

कोलकाताही मोठी रॅली

कोलकात्यात समाजातील सर्वथरातील नागरिक, विचारवंत, सेलिब्रिटिज रस्त्यावर उतरले होते. चित्रपट दिग्दर्शक अपर्णा सेन, अभिनेता कौशिक सेन, रिद्धी सेन यांनी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एक भाषण केले. या भाषणात त्यांनी एनआरसीचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला जावा अशी मागणी केली.

अहमदाबादेत आंदोलनकर्त्यांवर लाठीमार

गुजरातमध्येही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. अहमदाबादेत माकपा, भाकपा, डीएसओ व एसयूसीआई या विद्यार्थी संघटनांनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मूळ बातमी

लेखाचे छायाचित्र – मंजिरी धुरी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: