नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात १ भारतीय ठार

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात १ भारतीय ठार

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २२ वर्षाचा एक भारतीय तरुण ठार

चीनची ताठर भूमिका, गलवान खोरे आपलेच असल्याचा दावा
सीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा
वादग्रस्त नकाशा नेपाळच्या कनिष्ठ सभागृहात संमत

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २२ वर्षाचा एक भारतीय तरुण ठार झाला तर दोन अन्य जखमी झाले. लगन यादव या भारतीय नागरिकाला नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे.

आत्मसंरक्षणासाठी आमच्या पोलिसाने गोळीबार केला असे नेपाळचे सशस्त्र पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक नारायण बाबू थापा यांनी सांगितले.

मृत झालेल्या युवकाचे नाव विकेश यादव असून त्याच्या पोटात गोळी लागली तर जखमी झालेल्या युवकांची नावे उदय ठाकूर व उमेश राम अशी आहेत.

ही घटना नेपाळमधील पर्सा नगर पालिका क्षेत्रात येणार्या नारायणपूर येथे घडली. हे गाव भारत-नेपाळ सीमेवरील नो मॅन्स लँडपासून ७५ मीटर अंतरावर नेपाळच्या हद्दीत आहे.

लॉकडाऊन असूनही सीतामढी जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याचा नेपाळ पोलिसांचा दावा आहे.

लॉकडाऊनमुळे तणाव

भारत-नेपाळ सीमेच्या परिसरात राहणार्यांमध्ये दैनंदिन व्यवहार होत असतो. अनेकांचे नातेवाईकही दोन्ही देशांच्या या भागात राहात असल्याने तेथे ये-जा असते. पण लॉकडाऊनच्या काळात नेपाळच्या पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या लगन यादवची बायको नेपाळमध्ये नारायणपूरमध्ये राहणारी असून तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी यादव परिवार नेपाळमध्ये जात होता. पण त्यांना पोलिसांनी अडवले. काही पोलिसांचा महिलांशी वादही झाला. या वादातून यादव कुटुंबियांना फोन करून गावातले ६०-७० जणांना बोलावले.

नेपाळ पोलिसांच्या मते, जेव्हा भारताच्या बाजूने लोक जमा होऊ लागले तेव्हा ते आक्रमक झाले व वाद वाढत गेला. त्यात दगडफेक होऊन नेपाळच्या एका पोलिसाची बंदूकही हिसकावली गेली. त्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी बंदुकीच्या १५ फैरी झाडल्या त्यातील १० फैरी हवेत झाडण्यात आल्या. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी जमावावर गोळी झाडली त्यात एक ठार तर दोघे जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी नंतर लगन यादव याला अटक केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावर भारताकडून घुसखोरी होत असून ती थांबवण्यासाठी नारायणपूर परिसरात मोठ्या प्रमाणात नेपाळच्या पोलिसांची गस्त सुरू आहे. तरीही काही भारतीय नागरिकांकडून नेपाळमध्ये घुसखोरी होत असल्याचे नेपाळ पोलिसांचे म्हणणे आहे.

गोळीबाराच्या या घटनेनंतर नेपाळ पोलिसांनी भारतीय पोलिसांशी संपर्क साधला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेशही नेपाळने दिले आहेत.

 मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: