झारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन

झारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन

रांचीः झारखंडमधील धनबाद शहरात बुधवारी सकाळी सत्र न्यायाधीश उत्तम आनंद तीन चाकी ऑटोरिक्षाने मारलेल्या धडकेत मरण पावले. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत झाल

आशा, संताप आणि लोकशाही…
सर्व मुस्लिमांचे स्वागत करू, असे म्हणून दाखवा : अमित शाह
काँग्रेसला झटका; जितीन प्रसाद भाजपमध्ये

रांचीः झारखंडमधील धनबाद शहरात बुधवारी सकाळी सत्र न्यायाधीश उत्तम आनंद तीन चाकी ऑटोरिक्षाने मारलेल्या धडकेत मरण पावले. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत झाल्याने पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकासह अन्य दोघांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर रिक्षाही ताब्यात घेतली आहे. न्यायाधीशांचा हा मृत्यू संशयास्पद असल्याने विशेष पोलिस पथक स्थापन करण्यात आले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार उत्तम आनंद यांच्या न्यायालयात माफियांशी संबंधित काही प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी दोन गुंडाचा जामीन अर्ज फेटाळला होता.

तर द क्विंटनुसार उत्तम आनंद यांच्यापुढे रंजय हत्याकांड प्रकरणाचाही सुनावणी सुरू होती.

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयातही जेष्ठ विधिज्ञ विकास सिंह यांनी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही घटना मांडली व न्यायाधीशांवरचा झालेला हल्ला हा न्यायव्यवस्थेवर हल्ला असल्याचे मत मांडले. सिंह यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी केली.

त्यावर न्या. चंद्रचूड यांनी हा मुद्दा सरन्यायाधीशांसमोर ठेवावा असे सांगितले. त्यानंतर सिंह यांनी हा मुद्दा सरन्यायाधीशांसमोर मांडला. त्यावर सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची माहिती आपण सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव व मुख्य रजिस्ट्रार आणि झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दिली आहे, असे सांगितले. उच्च न्यायालय यावर पुढील कारवाई करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी पहाटे ५च्या सुमारास धनबाद जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम आनंद फिरण्यासाठी बाहेर पडले होते. ते रस्त्यावरून चालत असताना त्यांच्या मागून एका तीन चाकी ऑटोरिक्षाने धडक मारली. या धडकेत आनंद जागीच ठार झाले. धडक मारल्यानंतर रिक्षा सहजपणे जाताना दिसली. त्यानंतर काही मिनिटांनी एका अन्य ऑटो चालकाने आनंद यांचे रक्ताने माखलेले शरीर पाहिले व त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आनंद यांना रुग्णालयात आणल्यानंतर त्यांची बराच काळ ओळखही पटू शकत नव्हती. जेव्हा आनंद यांच्या नातेवाईकांनी ते घरी परत आले नसल्याची तक्रार पोलिसांकडे केली तेव्हा सर्व सूत्रे हलली. एका रुग्णालयात अज्ञात व्यक्तीचे शव आल्याचे पोलिसांना कळले व त्यानंतर आनंद यांची ओळख पटली.

आनंद यांना त्यांच्या ड्रायव्हरने ओळखले. आनंद हे हजारीबाग येथे राहात होते. त्यांचे वडील व एक भाऊ हजारीबाग न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असून त्यांचे दोन मेहुणे आयएएस सेवेत आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0