हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध

हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला पाहून, २६/११ च्या हल्ल्याची आठवण झाली, इतका तो भयानक होता. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्

अभाविपने व्हॉटसअपवरून हल्ल्याचे नियोजन कसे केले?
कुलगुरुंनी राजीनामा द्यावा – आयेशी घोष
जेएनयूतील सर्व्हरची तोडफोड मुलांनी केलीच नव्हती

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला पाहून, २६/११ च्या हल्ल्याची आठवण झाली, इतका तो भयानक होता. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या हल्ला प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “तोंड लपवून हल्ला करणारे हे घाबरट आहेत. हल्ल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर २६/११ दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करू नये, असेही उद्धव यांनी म्हटले.

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निषेध केला. केंद्र सरकारच्या आशीर्वादामुळेच देशातील तरुणांचा आवाज दाबला जात असून, गुंडांद्वारे हिंसा भडकवली जात आहे, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला लोकांच्या असहमतीचा आवाज दाबण्यासाठी सरकारने घडवून आणला असल्याचा आरोप सोनिया यांनी केला.

बुरखाधारी गुंडांनी विद्यार्थ्यांवर केलेला हा हल्ला धक्कादायक आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीरपणे जखमी झाले आहेत. सध्या आपला देश फॅसिस्टांच्या नियंत्रणात आहे. मात्र अशा शक्तींना विद्यार्थी घाबरत नाहीत, असं राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.

नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी हल्ला कोणी केला याचे सत्य बाहेर, यावे अशी अपेक्षा नरेंद्र मोदी सरकारकडे व्यक्त केली. जे भारताच्या जगातील प्रतिमेबाबत दक्ष आहेत, त्यांना काळजी वाटली पाहिजे, असा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “चेहरे झाकलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांवर भ्याडपणे हल्ला केला. जे लोक हिंसेत सामील आहेत, त्यांना तेथे बसलेल्या शक्तींचा पाठिंबा आहे यात शंका नाही.”

स्वरा भास्कर, तापसी पन्नू, अनिल कपूर, राजकुमार राव, रितेश देशमुख, सोनम कपूर, दिया मिर्झा, ट्विंकल खन्ना, शबाना आझमी, कोंकणा सेन शर्मा आणि ऋचा चड्ढा या हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी जेएनयुतील हल्ल्याचा निषेध केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका त्यांनी म्हंटले आहे, “आता भाजप निंदा करणार. ज्यांनी केलं ते चुकीचं होतं असं ते म्हणणार, पण, सत्य हेच आहे, की जे काही झालं ते भाजप आणि अभाविपने केलं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरून झालं. हेच एकमेव सत्य आहे.’

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहा हे दहा तोंडांचे रावण आहेत, अशी टीका केली. हा हल्ला बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यातील लोकांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत बघ्याची भूमिका घेतली आहे. हे म्हणजे गुजरात पॅटर्न दिल्लीत लादण्याचा शाहांचा प्रयत्न आहे, असा आरोप केला. अमित शाहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

जेएनयूमधील हल्ल्याचा निषेध करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कम्युनिस्ट, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष देशभरातील विद्यापीठांमध्ये वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0