कर्णन : प्रतीकांचा उलटवलेला खेळ

कर्णन : प्रतीकांचा उलटवलेला खेळ

‘कर्णन’ एकीकडे ठळकपणे दलित-सवर्ण लढ्याची कथा उभी करतानाच दुसरीकडे सुर-असुर, अभिजन-बहुजन हा संस्कृतिसंघर्षही अधोरेखित करतो आणि त्यासाठी परंपरेतील प्रतीकांचीच नेमकी निवड करतो.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: हिंदू मुस्लिमांच्या पाठीशी कधी उभे राहतील?
सुवर्णवेध
चकवा देणारा नोबेल

मारी सेल्वराज याचा ‘कर्णन’ हा तमिळ सिनेमा, केवळ दलित-सवर्ण संघर्ष अधोरेखित करतो, असं म्हटलं तर कर्णनचा त्यापेक्षाही व्यापक असलेला परिप्रेक्ष्य आपल्या लक्षातच आला नाही, असंच म्हणावं लागेल. लेखक-दिग्दर्शक असलेला खुद्द मारी सेल्वराज ‘कर्णन’ला नेमक्या कोणत्या चौकटीत बघतो, ते ठाऊक नाही. किंबहुना तो स्वतः आपल्या कलाकृतीचा अर्थ आता काहीही सांगू दे, त्याच्या हातून आता निर्मिती होऊन गेलेली आहे आणि आता तिच्यावर त्याची काहीही सत्ता (कलात्मक) उरलेली नाही. ती कलाकृती आता प्रेक्षकांची-रसिकांची झालेली आहे आणि आता प्रेक्षक-रसिक जो त्या कलाकृतीचा अर्थ लावतील, तोच खरा! अर्थात हा अर्थ सगळ्यांचा एकसारखाच असायला हवा, असा नियम नाही. किंबहुना व्यक्तिगणिक जेवढे अधिकाधिक अर्थ काढले जातील, तेवढी ती कलाकृती श्रेष्ठ ठरेल. शेवटी अनेकार्थक्षमता हीच तर कोणत्याही कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाची निजखूण असते… आणि या निकषावर ‘कर्णन’ ही एक अस्सल आणि श्रेष्ठ भारतीय कलाकृती ठरते. ती केवळ दलित-सवर्ण संघर्षाभोवती फिरत नाही; दलित-सवर्ण संघर्ष हा या सिनेमाचा एक महत्त्वाचा आयाम असला, तरी खरा आयाम संस्कृती-संघर्ष हा आहे आणि त्यासाठीच सिनेमात विविध प्रतिमा-प्रतीकं आणि मिथकांचा येथेच्छ वापर करण्यात आला आहे. ही प्रतीकात्मकता हीच या सिनेमाची मोठी ताकद आहे.

प्रतीकं ही एकूणच मानवाच्या सांस्कृतिक जीवनाचा, कधीच कापून टाकता न येणारा भाग आहेत. पार आदिम काळापासूनचं संचित या प्रतीकांत दडलेलं असतं. ती संपली किंवा टाकून दिली असं म्हणून, त्यांना दूर लोटता येत नाही. रूप बदलून, घाट बदलून ती काळाबरोबर पुनरावृत्त होत राहतात. आदिम ते अद्यतन प्रवास करत, नित्यनूतन राहतात. ‘कर्णन’ सिनेमातील प्रतीकं अशीच आहेत, ती पुराकथा-लोककथांमधून वहन होत आलेली आहेत, तरी त्यांनी त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे व्यंजनेने उमगणारी कलाकृतीतील प्रतीकात्मकताच आजवर सगळ्यात महत्त्वाची मानण्यात आली आहे आणि म्हणूनच ‘कर्णन’ महत्त्वाचा आहे.

नजरेला सरळ सरळ दिसणारा दलित-सवर्ण संघर्ष सिनेमात आहेच, त्याविषयी वेगळं काही भाष्य करण्याची गरज नाही. परंतु सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच, आजूबाजूने वाहनं जात असतानाही, कोणतीच मदत न मिळाल्यामुळे मृत पावलेली कर्णनची धाकटी बहीण आणि तिचं देवतेत झालेलं रूपांतर, गावकऱ्यांचा शिरोविहीन देव, हवेत अधांतरीच मासा कापण्याचा वार्षिक ग्रामविधी ते घारीने कोंबडीचं पिल्लू उचलणं आणि तिच्याशी कर्णनच्या आईने उभा वाद मांडणं, हत्ती, घोडा, गाढव, घोडा आणि सिनेमाच्या अगदी शेवटी गाढवाने आपल्या मातेजवळ जाणं… या सगळ्याला कर्णन सिनेमात काही ना काही प्रतीकात्मक अर्थ आहे. तेव्हा या सिनेमाचा, केवळ नजरेला जे दिसतंय तेवढाच दृश्यअर्थ घेतला, तर आपली फसगत होण्याचीच शक्यता अधिक आहे; कारण हा सिनेमा त्यापेक्षा अधिक काही सांगू पाहत आहे.

सिनेमात सुरुवातीलाच दिसणारा गावकऱ्यांचा शिरोविहीन देव, सिनेमातील संस्कृतीसंघर्ष ठळकपणे अधोरेखित करणाराच आहे. उच्च वर्णीयांशिवाय कुणाकडेही ज्ञानाची मक्तेदारी जाऊ नये, यासाठी पूर्वीच्या काळी काटेकोर बंदोबस्त केला जायचा. त्यासाठी ज्ञानाची कास धरणाऱ्या निम्नस्तरांतील व्यक्तीचा थेट शिरच्छेदच केला जायचा (राम-शंबुक उदाहरण साऱ्यांनाच ठाऊक आहे.) किंबहुना तुम्हाला फक्त धडच आहे, डोकं नाही हे सातत्याने उच्चवर्णीयांकरवी खालच्या जातीच्या लोकांवर बिंबवलं जायचं. याचाच परिणाम म्हणून अनेक आदिवासी-दलित जमातीच्या देवता या पूर्वी शिरोविहीन असायच्या. ‘कर्णन’ चित्रपटातील शिरोविहीन देव याच परंपरेवर भाष्य करतो, मात्र सिनेमाच्या शेवटी आमच्या धडावर आता आमचंच शीर असेल, असा सूचक संदेशही हा सिनेमा देतो.

अगदी लहान वयात रस्त्यावर मृत पावलेली कर्णनची बहीण ग्रामदेवतेच्या रूपात दिसणं, हा तर आपल्या लोककथांतील अतिशय लोकप्रिय आदिबंध आहे. काही काही कारणाने अकाली मृत पावलेल्या किंवा मारल्या गेलेल्या व्यक्ती देव वा झाड रूपाने जिवंत राहतात अशा अनेक कथा लोकवाङ्मयात सापडतात. विशेषतः जीवनाचा कोणताही अनुभव न घेतलेल्या लहान मुली मृत पावल्या असतील, तर त्यांना देवतास्वरूप मानून त्यांच्या नावाचे दगड आपल्या घराच्या आवारात पुरण्याची परंपरा अगदी प्राचीन आहे. यामुळे त्या मुली आपल्या कुटुंबातच राहून जीवनाचा आनंद घेतात, असं मानलं जातं. कर्णन चित्रपटातील मुलगी देवतेच्या स्वरूपात दिसते ती त्यामुळेच. मात्र यातही एक गोम अशी आहे की, निम्न जातींच्या देवता या नेहमीच काहीशा उग्ररूपा असतात, तशी या सिनेमातील देवताही उग्ररूपा आहे आणि ती गावकऱ्यांना एकप्रकारे लढण्याचं बळ पुरवणारी आहे. महत्त्वाचं म्हणजे ये देवतेचं वाहन गाढव आहे. कर्णन सिनेमात अनेक दृश्यांत पुढचे दोन पाय दोरीने बांधलेत अशा रूपातलं गाढव दुडक्या चालीने चालल्याचं दाखवलं आहे आणि कर्णन ज्या वेळी अत्याचाराने पेटून उठतो, तेव्हा तो त्या गाढवाचं पुढच्या पायातील दोर दगडाने ठेचून तोडतो आणि एकाच वेळी ते गाढव आणि तो स्वतःही उधळतो. मात्र सिनेमातील गाढवाचं अस्तित्त्व तेवढ्यापुरतंच सीमित नाही. हे गाढव त्या ग्रामदेवतेचं वाहनही आहे. आपल्याला देवीचं वाहन म्हणून वाघ किंवा सिंहच ठाऊक असतो. परंतु उग्ररूपा-तमोगुणी देवतेचं वाहन गर्दभ म्हणजेच गाढवही असतं, ते फार कमी लोकांना ठाऊक आहे. म्हणूनच सिनेमात गाढव या प्रतीकाचा वापर अगदी यथोचित केला आहे.

घोडा किंवा हत्ती यांचा सिनेमातील वापरही प्रतीकात्मकच आहे. भारतीय संस्कृतीत हत्ती हा प्राणी विद्वत्तेचं आणि वैभवाचं प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळेच कर्णन जेव्हा माशाला हवेत मारण्याचा ग्रामविधी पूर्ण करतो, तेव्हा गावकरी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढतात. या मिरवणुकीवेळी कर्णनच्या हातात गावाची पारंपरिक तलवारही असते. कोणत्याही योद्ध्याची जेव्हा तलवारीसह हत्तीवरून मिरवणूक काढली जाते, तेव्हा तो एकप्रकारे सार्वभौमत्व सिद्ध करण्याचाच प्रयत्न असतो. म्हणजे एकीकडे दलित गाव म्हणून साधी एस्.टी.ही किंवा कुठलं वाहनही या गावाच्या उंबरठ्यात थांबत नाही. परंतु तिथेच हत्तीवरून मिरवणूक काढण्याची मिरास हा गाव बाळगून आहे, म्हणजे एकप्रकारे संस्कृतीसंघर्षाला दिलेलं उत्तरच! याचप्रमाणे ‘कर्णन’ सिनेमातील घोड्याच्या वापराला काहीएक वेगळी अर्थवत्ता आहे. रुढार्थाने सिनेमातील आशयात घोड्याला महत्त्वाचं स्थान नाही, तरीही त्याचं अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक मारी सेल्वराजने जाणीवपूर्वक केला आहे. आपल्या गावावर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी कर्णन घोड्यावर बसून दौडत येतो. कारण घोडा हा भारतीय परंपरेत पूर्ण पुरुष मानला जातो, तसंच घोडा हे पराक्रम-तेजाचंही प्रतीकही आहे.

अगदी कर्णन सिनेमातील कर्ण, दुर्योधन, यम, द्रौपदी अशी पात्रांची नावं पाहिली, तरी त्यातील वेगळेपणा आपल्या लक्षात येतो. सिनेमात पोलिस स्टेशनमधील एक दृश्य आहे, त्या दृश्यात पोलिस इन्स्पेक्टर या ग्रामस्थांना त्यांची नावं विचारतो. तेव्हा गावकऱ्यांनी आपली महाभारतातील राजांची नावं सांगितल्यावर तो पोलिस इन्स्पेक्टर हसतो आणि म्हणतो- राजांची नावं ठेवली म्हणून तुम्ही मोठे झालात काय? म्हणजे दलितांनी देवादिकांची-राजांची नावं ठेवलेलीही सवर्णांना चालत नव्हती. त्यामुळेच तर अगदी अलीकडेपर्यंत दलित समाजातील अनेकांची नावं दगडू-धोंडू अशी असायची. मात्र आपल्या सिनेमातील दलित पात्रांना महाभारतातील पात्रांची नावं ठेवून मारी सेल्वराजने केवळ साधीसुधी क्रांती केलेली नाही, त्याने संस्कृतीरक्षकांना सणसणीत हाणली आहे. त्याने आपल्या दलित पात्रांना महाभारतातील नावं ठेवलीत, पण मुद्दामच धर्म, अर्जुन, भीम किंवा कृष्ण अशी नावं न ठेवता कर्ण-दुर्योधन अशी ठेवलीत, कदाचित त्याला पांडवांच्या दांभिकपणावरच यातून भाष्य करायचे असेल! बहुधा म्हणूनच कर्णनच्या, म्हणजेच सिनेमाचा नायक असलेल्या कर्णाच्या प्रेयसीचं नावही त्याने मुद्दामच द्रौपदी ठेवलं असेल. कारण महाभारतातल्या द्रौपदीने कर्ण सूतपुत्र, म्हणजेच खालच्या जातीचा म्हणून स्वयंवरात त्याला अव्हेरला होता. सेल्वराजने आपल्या सिनेमात कर्णाच्या प्रेयसीचं नाव द्रौपदी ठेवून त्याची खणखणीत भरपाई केली.

ग्रामदेवतेच्या वार्षिक सण-उत्सवात देवतेला दोन-चार पायांचा नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा-परंपरा अद्याप कुठे कुठे टिकून आहेत. तत्संबंधीचे काही विधिविधानंही अनेक गावांत किंवा आदिवासी पाड्यांवरही होतात. या विधींमध्ये देवतेला बळी देणं ही जणू काही पूर्वअटच असते. किंबहुना बळी देऊन त्या बळीचं रक्त देवावर शिंपडणं हा या विधीचा प्रमुख भाग असतो. कारण रक्ताच्या शिंपणाशिवाय दैवत जागृत होत नाही, ही आदिम श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष माणसाचाच बळी दिला जात असेल, कालांतराने माणसाच्या जागी पशू आला. असाच एक बळी देण्याचा ग्रामविधी ‘कर्णन’ चित्रपटात आहे. हा ग्रामविधी काय तर कड्याच्या एका टोकावरून काहीजणांनी एक मोठा मासा हवेत भिरकावून द्यायचा आणि समोरच्या कड्यावर उभ्या असलेल्या (खरंतर ग्रामविधीचं आव्हान स्वीकारलेल्या) व्यक्तीने त्याच वेळी उडी मारून हवेतच त्या माशाचे तलवारीने दोन तुकडे करायचे. सिनेमात अगदी सुरुवातीलाच कर्णन हा पराक्रम करतो आणि पराक्रमाचं द्योतक असलेली गावाची पारंपरिक तलवार त्याच्याकडे येते. सिनेमातील या मासा मारण्याच्या ग्रामविधीतील कूट वा प्रतीक सहजासहजी सुटत नाही. कारण आजवर अनेक पशू-पक्षी ग्रामविधीत मारलेले प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. परंतु ग्रामविधी म्हणून मासा मारण्याची पद्धत या सिनेमात प्रथमच पाहायला मिळाली. मात्र बळी म्हणून मासाच का, याचं स्पष्टीकरण या सिनेमात तरी मिळत नाही. खरंतर बळी म्हणून कोंबडा-बोकड-रेडा असा कोणताही प्राणी प्रतीकात्मक पद्धतीने दाखवताच आला असता, मग मासाच का? इथेही मासा हा संस्कृतीसंघर्षाचाच निदर्शक तर नाही? म्हणजे द्रौपदीच्या स्वयंवरात खाली पाण्यात पाहून वर गोलाकार फिरणाऱ्या मत्स्याचा दृष्टीभेद करायचा होता, तेव्हा केवळ सूतपुत्र म्हणून कर्णाला तो अधिकार नाकारण्यात आला होता. त्याचा वचपा म्हणून इथे मासा कापण्याचा विधी होता का?

किंवा कदाचित यापेक्षा वेगळाही अर्थ लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित असू शकतो, तो म्हणजे विष्णूचा पहिला अवतार असलेल्या मत्स्याचा वध. तसं पाहायला गेलं तर विष्णूचे नऊ अवतार म्हणजे धर्मवाद्यांनी सर्वसामान्यांचा केलेला बुद्धिभ्रमच आहे. म्हणजे आपल्या मार्गातील काटे दूर करण्यासाठीच विष्णूने एकप्रकारे हे नऊ अवतार धारण केलेले आहेत आणि त्यातील पहिलाच अवतार हा मत्स्यावतार आहे. आता हा मत्स्यावतार विष्णूने का घेतला, तर म्हणे- ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलेले ज्ञान देणारे वेद घेऊन काही असूर पळाले आणि समुद्रात जाऊन लपले, तेव्हा त्यांना शोधून काढण्यासाठी आणि वेद परत मिळवण्यासाठी विष्णूने मत्स्यावतार धारण केला. नंतर त्या असुरांना ठार मारून विष्णूने ते वेद पुन्हा नेऊन दिले. मत्स्यावताराची ही कथा म्हणजे सरळसरळ सुर-असुर संस्कृतीसंघर्ष आहे… आणि या मत्स्यावतराचा निषेध म्हणूनच तर सेल्वराजने ग्रामविधीत मासा कापलेला नाही ना, किंवा तसा मासा कापण्याची तमिळनाडूमधील एखाद्या समाजात खरोखरच प्रथा असेल, तर त्यामागे तोच हेतू नाही ना, असा संशय घ्यायला वाव आहे. ही एकप्रकारे केलेली प्रतीकात्मक परतफेड आहे.

…तेव्हा एकूणच ‘कर्णन’ चित्रपटाकडे केवळ दलित-सवर्ण परिप्रेक्ष्यातून पाहणं, म्हणजे त्याच्या व्यापकतेला वेसण घालण्यासारखं आहे. एकीकडे ठळकपणे दलित-सवर्ण लढ्याची कथा उभी करतानाच हा सिनेमा दुसरीकडे सुर-असुर, अभिजन-बहुजन हा संस्कृतिसंघर्षही अधोरेखित करतो आणि त्यासाठी परंपरेतील प्रतीकांचीच नेमकी निवड करतो. आजवर अभिजनांनी ही प्रतीकं त्यांच्या सोयीसाठी वापरलेली होती; आता ही प्रतीकं वापरायची वेळ आपली आहे!

मुकुंद कुळे, हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

मूळ लेख मुक्त शब्द मे २०२१ मधून साभार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0