कर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी

कर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी

कर्तारपूर मार्गिकेमधील पायाभूत सोयी वाढवण्याच्या दृष्टीने या मार्गिकेवर पूल बांधण्याची भारताची मागणी पाकिस्तानने मान्य केली आहे. त्याचबरोबर ५ हजार शीख

प्रतिमेला गोळ्या घालाल, विचारांचे काय?
समलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी
भारतीय स्टेट बँकेने एनपीएमध्ये ११,९३२ कोटी रुपये लपवले

कर्तारपूर मार्गिकेमधील पायाभूत सोयी वाढवण्याच्या दृष्टीने या मार्गिकेवर पूल बांधण्याची भारताची मागणी पाकिस्तानने मान्य केली आहे. त्याचबरोबर ५ हजार शीख भाविकांना रोज पाकिस्तानात येण्याची परवानगी दिली आहे.

रविवारी सकाळी भारत व पाकिस्तान दरम्यान वाघा सीमेरेषेवर कर्तारपूर मार्गिकेचा फायदा अधिकाधिक शीख भाविकांना व्हावा यासाठी एक बैठक झाली. या बैठकीत या मार्गिकेवर नव्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यात याव्यात, व्हिसा प्रणाली सोपी व्हावी हे मुद्दे विशेष करून चर्चेला आले होते.

येत्या नोव्हेंबर महिन्यात शीखांचे धर्मगुरु गुरु नानक देव यांची ५५० जयंती असून या निमित्ताने भारतातून हजारो शीख भाविक कर्तारपूर मार्गिकेतून पाकिस्तानात जाणार आहेत. त्या दृष्टीने भारताने या मार्गिकेतील व्यवस्थापनाची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे. यापूर्वी भारताने १९७४च्या करारानुसार दररोज १० हजार शीख भाविकांना कर्तारपूर गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी पाकिस्तानने प्रवेश द्यावा अशी विनंती केली होती. या विनंतीवर पाकिस्तानने अंशत: सहमती दर्शवली असून ५ हजार शीख भाविकांना त्यांच्याकडे भारतीय पारपत्र असेल तर व्हिसाशिवाय त्यांना पाकिस्तानात प्रवेश करण्यास मुभा दिली आहे.

भारताने कर्तारपूर मार्गिकेत शीख भाविकांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा उपस्थित केला. कर्तारपूर गुरुद्वारामध्ये भाविकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासातील एक अधिकारीही असावा अशी विनंती भारताने केली आहे. त्यावर पाकिस्तानने या मार्गिकेवर भारताविरोधात कोणत्याही स्वरुपाच्या कारवाया होणार नाही, अशी हमी भारताला दिली आहे.

पाकिस्तानने या मार्गिकेतील पायाभूत त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. या त्रुटी दूर केल्यास टप्प्याटप्प्याने शीख भाविकांना कर्तारपूर गुरुद्वार दर्शनासाठी प्रवेश देणे शक्य होईल, असे पाकिस्तानने म्हटले.

या बैठकीला पाकिस्तानच्या परराष्ट्रखात्याचे २० अधिकारी उपस्थित होते. भारत-पाकिस्तान दरम्यानचे संबंध तणावाचे असताना रविवारची, ही बैठक महत्त्वपूर्ण समजली जाते. यापूर्वी कर्तारपूर मार्गिकेवरून दोन बैठका झाल्या होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0