काश्मीर ग्राऊंड रिपोर्ट – अस्वस्थता, तणाव व भीती

काश्मीर ग्राऊंड रिपोर्ट – अस्वस्थता, तणाव व भीती

श्रीनगर : जम्मू व काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याची घोषणा जेव्हा सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

काश्मीरमध्ये तीन महिन्यात १२५ योजनांना विक्रमी वन मंजुऱ्या
काश्मीरच्या तिघा छायाचित्रकारांना पुलित्झर सन्मान
जम्मू व काश्मीरमध्ये कलम ३११ची अंमलबजावणी

श्रीनगर : जम्मू व काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याची घोषणा जेव्हा सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात नेमके काय चाललेय याची माहिती कुणालाच नव्हती. संपूर्ण राज्यातील केबल सेवा, दळणवळण यंत्रणा बंद केल्याने केवळ रेडिओ व दूरदर्शनद्वारेच माहिती मिळत होती.

४ ऑगस्टला रात्री ११ वाजता राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली नंतर मध्यरात्री मोबाइल सेवा बंद झाली. ५ ऑगस्टला त्यांना कळाले की आपला राज्याचा दर्जा बरखास्त करण्यात आला आहे. आपला व लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला आहे.

गृहमंत्र्यांच्या भाषणाअगोदर केंद्र सरकारने राज्यात खबरदारीचे सर्व उपाय योजले होते. मोठ्या प्रमाणावर लष्कर, निमलष्करी दले तैनात करण्यात आली होती. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आदेश देण्यात येत होते. राज्यातील सर्व दुकाने, आस्थापने, शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. सगळे रस्ते सुनसान झाले होते.

श्रीनगरनजीक झालदागर परिसरातला २३ वर्षाचा युनिस अहमद संतप्त होऊन घराबाहेर आला आणि त्याने सरकारचा कसा कट होता, सरकारने आम्हाला कसे फसवले, आम्हाला ते चिरडून टाकत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली.

अशा गोंधळाच्या परिस्थिती काही ठिकाणी नागरिक गोळा होऊन सरकारच्या निर्णयावर चर्चा करत होते. वासिम अहमद सारखे अनेक नागरिक, सरकारने हे काय केलंय याचा काय अर्थ (मे तीर तो फिक्र ये क्या कौर इमो), असे प्रश्न एकमेकांना विचारत होते. एक मुलगा त्यांना बदलत्या घटना सांगत असताना वासिमची पहिली प्रतिक्रिया सगळं संपलयं (गोह मकलू) अशी होती. तो असंही म्हणाला की खोऱ्यातील अनेक नागरिकांना नेमकं काय झाले याची माहिती कळलेली नाही. नाहीतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया दिसून आल्या असत्या.

वासिमचा दावा २६ वर्षाच्या आसिफ नाबी हा विद्यार्थी त्याला अधिक विस्तृतपणे सांगू लागला. ‘एवढे सैनिक का तैनात केले त्यावरून तुम्हाला कळत नाही? तुम्ही कोणत्या प्रतिक्रियेची अपेक्षा करताय? जर लोक रस्त्यावर उतरले असते तर २०१६ सारखे चित्र दिसले असते.’

आसिफ नाबीसारखी भावना अनेकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यांना केंद्र सरकारचा ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय आपला विश्वासघात केलाय असे वाटते. राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी काश्मीरी नागरिकांना ३७० किंवा ३५ अ कलमाला धोका नाही असे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात उलटे झाले. सरकारने अनेक विषयांची सरमिसळ करून खोऱ्यात उगीचच तणाव निर्माण केलाय, लोकांमध्ये मतभेद निर्माण केले आहे. अस्मितेचा व विश्वासाला तिलांजली दिली गेली आहे, असे जावैद अहमद यांचे म्हणणे आहे.

गेले तीन दिवस खोऱ्यात काही ठिकाणी व श्रीनगरच्या काही भागात निदर्शने झाली आहेत. काश्मीरी तरुण रस्त्यावर येऊन दगडफेक करत आहेत. ६ ऑगस्टला सहा जखमी नागरिकांना डोळ्यावर दगड लागल्याने शहरातील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करावे लागले. एका जखमी नागरिकाने खोऱ्यात परिस्थिती पुन्हा तणावाची होत असल्याची भीतीही व्यक्त केली.

एसएमएचएस रुग्णालयातील डॉक्टर इफ्त मीर यांनी द वायरला सांगितले की, ‘अशा घटना आमच्यासारख्यांना नव्या नाहीत. अनेक वर्षे आम्ही हेच पाहात आलोय. आमचे प्राधान्य लोकांना शांत करण्याचे असते. त्यांच्यातील संतापाला आवर घालण्याचे असते. हा संवाद आता कमी होऊ लागला आहे, असे वाटते.’

स्थलांतरीतांचा प्रश्न अधिक गंभीर

२०११च्या लोकसंख्या सर्वेक्षणानुसार काश्मीर खोऱ्यात सहा लाख लोक विविध राज्यातून रोजगारासाठी आले आहेत. त्यांना सरकारच्या निर्णयामुळे हा खोऱ्यातून परतावे लागत आहे. श्रीनगर शहरातल्या अनेक टुरिस्ट सेंटरवर रिझर्वेशनसाठी शेकडोंच्या रांगा दिसत आहेत. २००८पासून श्रीनगरमध्ये राहात असलेला प. बंगालमधून आलेला २५ वर्षाचा शहंशाह सांगतो की, काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत भीतीदायक आहे आणि आम्हाला जीवाची भीती वाटू लागली आहे. आम्ही काश्मीरमध्ये तीन वेळा मोठे उद्रेक पाहिले आहेत पण आताची परिस्थिती अधिक भीतीदायक वाटते.

दहशतवादाकडे तरुणाई वळण्याची भीती

कलम ३७० रद्द केल्यानंतर खोऱ्यातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. अशा निर्णयाने स्वतंत्र काश्मीर चळवळीकडे, दहशतवादाकडे तरुणांचा अधिक ओघ वाढेल, अशी भीती पुलवामा येथील सरकारी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली. भारत सरकारने दाखवलेली केवळ स्वप्ने आहेत, ३७० कलम आपले अस्तित्व होते तेच बरखास्त करून आपल्या भावनांशी सरकारने खेळ केलाय, अशी भावना त्यांच्यामध्ये असल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले.

दळणवळण यंत्रणा ठप्प

खोऱ्यातील दळणवळण यंत्रणा बंद केल्याने काश्मीरच्या विविध भागात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आजही दिसून येते. खानयार या भागातले ५१ वर्षाचे अझाज अहमद सोफी सांगतात, माझा २१ वर्षाचा मुलगा जम्मूमध्ये शिकत आहेत. पण त्याच्याशी गेल्या रविवारपासून माझा संपर्क होऊ शकलेला नाही. मला स्वत:ला घरात कोंडून ठेवलेय व माझ्या मुलाचा ठावठिकाणा मला समजू शकलेला नाही.

अशीच परिस्थिती राजबागमध्ये घडली आहे. येथे एका खासगी वसतीगृहात ४० मुली अडकल्या आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता आलेला नाही. या वसतीगृहाचा प्रमुख परवेझ अहमदने या मुली सुखरूप व सुरक्षित असल्याचे द वायरला सांगितले. पण मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या मनातील भीतीचे काय असा त्याचा सवाल आहे.

कैसर अन्द्राबी हे श्रीनगरस्थित ‘द काश्मीर वाला’ या स्थानिक वृत्तमासिकेचे पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0