गुजरात मोदी सरकार पाडण्याचा कट – एसआयटी

गुजरात मोदी सरकार पाडण्याचा कट – एसआयटी

नवी दिल्लीः २००२च्या गुजरात दंगलीनंतर राज्यातील नरेंद्र मोदी सरकार पाडण्याच्या मोठ्या कटात काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या

कर्नाटक : मुस्लिम मांस विक्रेत्यावर हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ला
महाराष्ट्रात उद्या बहुमताची चाचणी, थेट प्रक्षेपणाचे आदेश
देशोधडी : उपऱ्या विश्वातील निरंतर संघर्षाचे वास्तव कथन

नवी दिल्लीः २००२च्या गुजरात दंगलीनंतर राज्यातील नरेंद्र मोदी सरकार पाडण्याच्या मोठ्या कटात काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचा समावेश होता, असा गंभीर आरोप गुजरात पोलिस एसआयटीने आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. गुजरात दंगलीत निरपराधांना गोवण्याच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वीच तिस्ता सेटलवाड, माजी पोलिस अधिकारी श्रीकुमार व संजीव भट्ट यांना एसआयटीने गोवले होते. आता २००२मध्ये गुजरातमधील तत्कालिन मोदी सरकार पाडण्याच्या कटकारस्थानात तिस्ता सेटलवाड, अहमद पटेल यांच्यासोबत होत्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सरकार पाडण्यासाठी तिस्ता सेटलवाड यांना काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी व अन्य मदत मिळाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गुजरात पोलिसांनी या संदर्भात दोन जणांचा जबाबही नोंदवला आहे. यातील एका जबाबात तिस्ता सेटलवाड यांना अहमद पटेल यांच्याकडून ३० लाख रु. मिळाले असा दावा करण्यात आला आहे.

२००२च्या गोध्रा दंगलीनंतर सेटलवाड या दिल्लीतील अनेक प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत होत्या. यातून गुजरात दंगलीत भाजपच्या बड्या नेत्यांची नावे गोवावीत असे त्यांना सांगण्यात येत होते. सेटलवाड दिल्लीतील शाहीबाग सर्किट हाऊस येथे नेत्यांच्या भेटी घेत होत्या, त्यात एक बैठक अहमद पटेल यांच्यासोबत झाली होती, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. एक बैठक अहमद पटेल यांच्या घरी झाली होती त्यात संजीव भट्ट आले होते, असाही पोलिसांचा दावा आहे.

शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर गुजरात पोलिसांनी तिस्ता सेटलवाड यांना जामीन देऊ नये असे अतिरिक्त सेशन न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने एसआयटीचे उत्तर नोंद करून घेतले व या संदर्भातील पुढील सुनावणी १८ जुलैला सोमवारी होईल, असे सांगितले.

काँग्रेसने आरोप फेटाळले

दरम्यान एसआयटीच्या आरोपपत्रावर काँग्रेसने तत्काळ प्रतिक्रिया देत एसआयटी कोणाच्या तालावर नाचत आहे, हे स्पष्ट दिसत असल्याचे म्हटले आहे. अहमद पटेल यांच्यावरील एसआयटीचे आरोप खोडसाळपणाचे आहेत. २००२च्या गुजरात दंगलीची जबाबदारी मोदींवर येऊ नये म्हणून एसआयटी शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. नरेंद्र मोदी गुजरात दंगल हाताळू शकले नाहीत म्हणून तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी मोदींना राजधर्म पाळण्याचे आवाहन केले होते, ते विसरता कामा नये, असे उत्तर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिले आहे.

अहमद पटेल यांच्यावर लावलेल्या आरोपावर त्यांची मुलगी मुमताज पटेल यांनीही तीव्र आक्षेप घेत एसआयटीचे आरोप दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. एखाद्या दिवंगत व्यक्तीवर कोणतेही आरोप करणे सोपे असते, त्याने मथळे बनतात, लाट उमटते. ते स्वतः या आरोपांचा बचाव करण्यास जिवंत नाहीत. या व्यतिरिक्त आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही, असे मुमताज पटेल म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0