हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड

हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड

कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प असताना ही टोळधाड आल्याने शेतकर्यांपुढे हे दुसरे महासंकट उभे राहिले आहे. शेतमालाला काहीच भाव आला नसल्याने, त्यात या टोळधाडीने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध
अभाविपने व्हॉटसअपवरून हल्ल्याचे नियोजन कसे केले?
ट्रंपभक्तांच्या गुंडगिरीची वर्षपूर्ती

नवी दिल्ली, जयपूर :  भारतामध्ये१९९३ साली मोठी टोळधाड आली होती. त्यानंतर आता कोरोना महासंकटाच्या काळात पुन्हा अशीच टोळधाड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उ. प्रदेश व महाराष्ट्रामधील काही भागावर आली आहे.

गेली दोन दशके राजस्थानवर टोळधाड येत असते पण १९९३मध्ये जेवढा प्रदेश तिने व्याप्त केला होता तेवढी राज्ये या टोळधाडीने यावेळी व्यापली आहेत. १९७३मध्ये महाराष्ट्रावर टोळधाड आली होती. मंगळवारी जयपूर शहरावर ही टोळधाड मोठ्या प्रमाणावर दिसू लागली तेव्हा ट्विटर काही जणांनी हे मानवजातीचे अखेरचे वर्ष अशी प्रतिक्रियाही दिली होती.

कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प असताना ही टोळधाड आल्याने शेतकर्यांपुढे हे दुसरे महासंकट उभे राहिले आहे. शेतमालाला काहीच भाव आला नसल्याने, त्यात या टोळधाडीने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या अन्न व कृषी महासंघटनेच्या मते एक चौरस किमी क्षेत्र आकाराची टोळधाड ३५ हजार मनुष्याचे एकावेळचे अन्न फस्त करते. या एक चौरस किमी क्षेत्रात सुमारे ४ कोटी टोळ असतात. या टोळांची भूक अमर्याद असते. ते आपल्या वजनाएवढे (२ ग्रॅम) अन्न एका दिवशी खाऊ शकतात. टोळांच्या या अमर्याद विध्वंसामुळे शेतीची काय अवस्था होऊ शकते हे लक्षात येते.

मध्य प्रदेशातील महू येथील सूरज पांडे यांच्या शेतावर टोळधाड आली होती. ते सांगतात, २३ मे रोजी ते घरात असताना अचानक टोळधाड आमच्या शेतावर आली. शेतात काम करणार्या मजुराने तात्काळ त्यांना शेतावर कीटक आल्याचे कळवले व संपूर्ण शेतावर हे कीटक बसले असल्याचे त्याने सांगितले. सूरज पांडे शेतावर पोहचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही टोळधाड आहे. त्यांनी तडक आपला ट्रॅक्टर काढला व तो शेतात फिरवण्यास सुरूवात केली. हातात येईल ते भांडे घेऊन ते वाजवत टोळांना हाकलण्याचे प्रयत्न सुरू केले. पण हे प्रयत्न कामी आले नाही. या कमी काळात टोळांनी त्यांच्या ४ एकर जमिनीवर अर्धेअधिक भोपळ्याचे पीक फस्त केले होते. कधीच अन्न न मिळाल्यासारखे हे टोळ पिकावर हल्ला करत होते व ते बघता बघता फस्त करत होते, असे पांडे सांगतात.

महूपासून सुमारे ५०० किमी अंतरावरील झाशी येथे अखिलेश लिटोरिया यांच्या शेतावरही टोळधाड आली. ते सांगतात, माझ्या शेतावर एक पांढरी चादर टाकल्यासारखे दृश्य मला दिसले. माझ्या शेतात मूग लावली होती ती संपूर्णपणे टोळधाडीत नष्ट झाली. झाशीच्या दक्षिणेकडील सुमारे ५०० किमी क्षेत्रातील मूग टोळधाडीत नष्ट झाली आहे. आनंद पटेल यांचे १० एकरमधील मूग टोळांनी फस्त केले. शेतात काहीच शिल्लक ठेवले नाही, असे पटेल सांगतात. आम्ही टोळांना हटवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले पण पिकावर टोळाचे थवेच्या थवे बसले होते ते पिक खाऊनच गप्प बसले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीत राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आलेली टोळधाड पुढे महाराष्ट्रात विदर्भात आल्याचे म्हटले होते. १९७४नंतरची ही पहिलीच घटना आहे. ऐंशीच्या घरात असलेले एक शेतकरी सांगतात, त्यांच्या आयुष्यात त्यांनी असे टोळांचे आक्रमण पाहिलेले नव्हते. जे काही ऐकले होते ती सांगोवांगी माहिती होती. पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळतेय असे ते सांगतात.

टोळधाडीविषयी आगाऊ माहिती नाही

या टोळीधाडीसंदर्भात भारतातील लोकूस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे की, या वर्षी टोळधाड होईल असे कोणतेही इशारे, चेतावणी मिळाली नव्हती. अशा टोळधाडी अनियमित असतात. यंदा मे महिन्यात ही धाड आली पण ती याच महिन्यात येते असेही नसते. यंदा टोळांना हा प्रजननाचा काळ व प्रदेश वाटला असल्याने ते एवढ्या मोठ्या संख्येने आले असावेत अशी माहिती पिक संरक्षण, विलगीकरण व साठवण संस्थेचे उपसंचालक के. एल. गुर्जर यांनी दिली.

वाळवंटातील काही पाणथळ जागा व शुष्क प्रदेशातील हिरवळ या टोळांच्या प्रजननाच्या जागा असतात. २०१९मध्ये आफ्रिका व अरब सामुद्रधुनीच्या प्रदेशात पाऊस खूप पडल्याने इराण, पाकिस्तानमार्गे टोळांचे थवे प्रजननासाठी भारताकडे आले आहेत. इंडियन

इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीमधील हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या मते २०१९मध्ये पश्चिम हिंदी महासागर प्रदेशात उबदार पाण्याच्या प्रवाहांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. हा बदल निश्चितच ग्लोबल वार्मिंगमुळे झाला आहे. या उबदार प्रवाहाला इंडियन ओशन डायपोल असे म्हणतात. हा उबदार प्रवाह व ग्लोबल वॉर्मिगमुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे.

आणि याला एक पूरक घटनाही घडली आहे. यंदा पूर्व मान्सूनही भारताच्या अनेक भागात झाल्याने प्रजजनासाठी हे पोषक वातावरण टोळांसाठी झाले होते.

वास्तविक मान्सूनच्या सुरवातीला टोळ हे शुष्क प्रदेशात येत असतात. ते पाकिस्तानातून भारतात राजस्थानात येतात. पण यंदा ते एप्रिल-मेमध्येच राजस्थान व पंजाबमध्ये आलेले दिसतात.

टोळांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतराला भारतात पडलेला मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे कोल यांचे मत आहे. शुष्क प्रदेशात पावसाचे प्रमाण खूप झाल्यास भाजीपाला, पिकांची वाढ वेगाने होते व त्यामुळे टोळ प्रजननासाठी येतात, यंदा भारतातील पिक त्यांना आकर्षित करून घेत असतील, असे त्यांचे मत आहे.

एफएओचे लोकुस्ट फोरकास्टिंग ऑफिसर किथ क्रेसमन यांच्या मते हिंदी महासागरातील अनेक वादळांमुळे अरब सामुद्रधुनीत व आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्याने वाळवंटातील टोळधाडी वाढत गेल्या.

२०१९मध्ये ८ वादळे झाली होती. ही संख्या अधिक आहे. या वादळांमुळे द. आफ्रिकेतील वाळवंटात टोळधाडी तयार झाल्या व त्यांनी इथिओपिया, सोमालिया, केनियापर्यंत प्रवास केला. हा प्रवास असाच पुढे चालू राहिला तर अनेक टोळधाडींचा सामना आपल्याला करावा लागेल असे क्रेसमन यांचे म्हणणे आहे.

गंभीर परिणाम

कोरोनाच्या महासंकटात टोळधाडीत अनेक हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट होणे ही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर समस्या होऊ शकते. पण दुसरा एक धोका आहे की, जूनमध्ये प्रौढावस्थेत असलेले टोळ पुन्हा आक्रमण करू शकतात. हा धोका भारत व पाकिस्तानला आहे असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. टोळांचे प्रजनन तीन महिन्यात तिप्पट होऊ शकते, त्यामुळे आज बाल्यावस्थेत असलेले व प्रजनन अवस्थेत असलेले टोळ दोन्ही देशांतल्या शेतीचे किती नुकसान करू शकतात याचा अंदाज येऊ शकतो. या टोळधाडीत खरीप पिकांचे नुकसान दिसत आहे. पुढे जून-जुलैतही त्याचा परिणाम लक्षात येऊ शकेल.

नुकसान टाळण्याचे प्रयत्न हवेत

टोळधाडीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भारत-पाकिस्तानने संयुक्त मोहीम हाती घेण्याची गरज आहे. आणि तसे प्रयत्नही सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यान अधिकार्यांमध्ये स्काइप द्वारे बैठका होत असून नुकसानीचा अंदाजही घेतला जात आहे, अशी माहिती गुर्जर यांनी द वायरला दिली.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: