महाजन यांची ‘पूर’ टूर आणि वादग्रस्त जीआर

महाजन यांची ‘पूर’ टूर आणि वादग्रस्त जीआर

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातल्या महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांची सुटका न झाल्याने सरकारच्या एकूणच तथाकथित ‘डिझास्टर मॅनेजमे

पोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार
मुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता – एक घोडचूक
मुख्यमंत्र्यांवर मानहानी, फसवणुकीचे खटले चालणार

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातल्या महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांची सुटका न झाल्याने सरकारच्या एकूणच तथाकथित ‘डिझास्टर मॅनेजमेंट’वर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यात राज्य सरकारने पुरात दोन दिवस अडकलेल्या नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात येईल असा जीआर काढल्याने लोकांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या ७ ऑगस्टच्या जीआरमध्ये पुरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ व १० किलो मोफत गहू देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. हा निकषच अतर्क्य असल्याने सरकारच्या पूरनियंत्रण व्यवस्थेत समन्वय नसल्याचे दिसून आले. हा जीआर दोन वर्षांपूर्वीचा आहे असेही सांगितले जात होते.  पूरग्रस्तांची ही चेष्टाच असून सरकार पूरग्रस्तांविषयी संवेदनशील नसल्याचा मोठा आक्रोश व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया माध्यमातून शुक्रवारी दिसून आला. सरकारच्या मदतीकडे दुर्लक्ष करा आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे धान्य, कपडे, संसाराच्या वस्तू पाठवून देऊ, घरापर्यंत त्या आणून देऊ असे अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी म्हटले आहे.

शुक्रवारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुराचे पाणी काही फूट ओसरले असले तरी शेकडो नागरिक अजूनही पुरात अडकले असल्याने बचावकार्य सुरूच होते. जिल्ह्यात आजपर्यंत २३९ गावांतून २३ हजार ८८९ कुटुंबातील १ लाख ११ हजार ३६५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. नौदल, लष्कर व एनडीआरएफ, पोलिस यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. कोल्हापूर नजीक आंबा, चिखली गावातून अनेक पूरग्रस्तांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. ही खेडी पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर हजारो वाहने अडकली

गेल्या पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ५ हजार ट्रक, शेकडो बस-कार, टेम्पो अडकले असून या वाहनातील हजारो प्रवाशांना अन्नधान्य, पाणी देण्याचे काम एनडीआरएफ, पोलिस, नागरिक, सामाजिक संस्थांकडून केले जात आहे.  या महामार्गावरचे पाणी ओसरत नसल्याने कोल्हापूर सांगलीकडे दूध, अन्नधान्य, भाजीपालाही पोहचवता येत नाही. कोल्हापूर शहराच्या चारही बाजूंना पुराचे पाणी आल्याने शहरात शुक्रवारीही प्रवेश करता येत नव्हता. शहरातील बहुतांश भागात वीज व पाणी पुरवठाही खंडित होता.

जलसंपदामंत्र्यांची सेल्फी ‘पूर’ टूर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती शुक्रवारीही गंभीर असताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची या परिसरातील पुराची पाहणी त्यांच्या सेल्फी व्हिडिओमुळे त्यांच्याच अंगलट आली. शिवाय लोकांचा मोठ्या प्रमाणातला संताप व क्षोभ त्यांना सांगलीत झेलावा लागला. पूरग्रस्तांची भेट घेण्यास गेल्यावर संतप्त जमावाने महाजन यांना घेराव घातला व मदतकार्यात सरकारच्या एकूण कारभाराबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत होते. महाजन यांची पूरग्रस्त पाहणी त्यांच्याच एका कार्यकर्त्याने व्हिडिओद्वारे चित्रित केली. या व्हिडिओत महाजन हसत होते पण त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला रोखलेही नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर हजारो नेटकऱ्यांनी महाजन यांना झापलं. त्यावर महाजन यांनी कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करू नये पूरग्रस्तांना मदत करण्याचे सरकारचे प्राधान्य आहे असा पवित्रा घेत आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला.

कोल्हापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या मुक्तसैनिक भागामध्ये शुक्रवारी दुपारी असणारी स्थिती. महामार्गावर तर ५ फुटांपर्यंत पाणी होते.

व्हिडिओ सौजन्य – राहुल जाधव

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: