महिन्याला १०० कोटी द्या, देशमुखांची मागणी – परमवीर सिंग

महिन्याला १०० कोटी द्या, देशमुखांची मागणी – परमवीर सिंग

सचिन वाझे प्रकरणामध्ये बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री

‘बार्क’चा रिपब्लिकवर आरोप
कोविडमध्ये ३० हजार मुले अनाथ
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

सचिन वाझे प्रकरणामध्ये बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वसुलीसाठी टार्गेट देत होते, असा आरोप केला.

गृह रक्षक दलाचे महासंचालक असणारे परमवीर सिंग यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली असून, हेच पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा आरोप केला आहे.

परमबीर सिंग यांनी लिहिलेलया पत्रामध्ये अनेक मुद्दे परमवीर सिंग यांनी मांडले आहेत. “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं”, असा गंभीर आरोप परमवीर सिंग यांनी केला आहे.

“सचिन वाझेंनी त्याच दिवशी माझ्या कार्यालयात येऊन या सगळ्या प्रकाराबद्दल मला माहिती दिली. ते ऐकून मला धक्काच बसला,” असे परमवीर सिंग यांनी म्हंटले आहे.

“या प्रकारानंतर काही दिवसांनंतर सोशल सर्व्हिस ब्रँचचे एसीपी संजय पाटील यांना देखील गृहमंत्र्यांनी चर्चेसाठी घरी बोलावलं होतं. मुंबईतल्या हुक्का पार्लरविषयी चर्चा होती. या बैठकीला पाळंदे आणि इतर अधिकारी होते. दोन दिवसांनी पुन्हा पाटील यांनी डीसीपी भुजबळ यांच्यासोबत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावले गेले. हे दोघे गृहमंत्र्यांच्या केबिनबाहेर वाट पहात असताना पाळंदे आत गेले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी पाटील आणि भुजबळ यांना बाजूला नेऊन माहिती दिली. मुंबईतल्या १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून महिन्याला ४० ते ५० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी दिल्याचे पाळंदे यांनी दोघांना सांगितले. मला गृहमंत्र्यांनी केलेल्या मागणीविषयी एसीपी पाटील यांनी सांगितले. १६ मार्चला पाटील यांना मी मेसेजवर विचारल्यानंतर त्यांनी ४ मार्चला या सगळ्या घडामोडी घडल्याचे मला सांगितले, असे या पत्रात परमवीर सिंग यांनी म्हंटले आहे. एसीपी पाटील यांच्याबरोबर झालेल्या मेसेजेसची प्रत त्यांनी पत्रासोबत जोडली आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणामध्ये चुकीची केस नोंदवायला भाग पाडल्याचेही सिंग यांनी पत्रात म्हंटले आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली होती, असेही पत्रात म्हंटले आहे.

हे पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा आरोप केला”, असे ट्वीट अनिल देशमुख यांनी केले आहे.

देशमुख यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून अथवा न्यायालयाच्या नियंत्रणाखाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

रात्री अनिल देशमुख यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिले. त्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.” असे त्यांनी म्हंटले आहे.

ते पत्रकामध्ये म्हणतात, “सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?

– आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च ला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चाटच्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चाटवरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?

– १८  मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने १९ मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

– – पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.

– परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.

– स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

– सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?

– विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

-स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.”

मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: