‘मतदानयंत्र नको मतपत्रिका हवी’

‘मतदानयंत्र नको मतपत्रिका हवी’

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याने संभ्रमावस्थेत असलेल्या राज्यातल्या सर्व विरोधी पक्षांनी शुक्रवारी ईव्हीएमच्या विश

राजस्थान- बसपा व्हीप काढू शकत नाहीः तज्ज्ञांचे मत
महिला उमेदवारावर टिप्पणीने कमल नाथ अडचणीत
पाठींब्याबाबत काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याने संभ्रमावस्थेत असलेल्या राज्यातल्या सर्व विरोधी पक्षांनी शुक्रवारी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा सामूहीकपणे शंका व्यक्त करत येत्या २१ ऑगस्ट रोजी आगामी निवडणुकांत मतपत्रिकेवर घ्याव्यात या मागणीसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमान पक्षाचे राजू शेट्‌टी, शेकापचे जयंत पाटील, माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. राज ठाकरे व अजित पवार जवळ बसले होते. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमवर नव्हे तर मतपत्रिकेवर (बॅलेटवर) व्हायला हव्यात अशी मागणी केली.

सर्व विरोधी पक्षांची एकत्रित भूमिका मांडताना अजित पवार म्हणाले, मतपत्रिकेवर निवडणुका घ्या अशी आम्हा राजकीय पक्षांची मागणी नाही तर ती जनतेची मागणी आहे. जनतेच्या मनात निवडणूक प्रक्रियेविषयी शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका होत असताना पारदर्शकता बाळगली गेली पाहिजे, असे आमचे मत असल्याचे ते म्हणाले.

तर राज ठाकरे यांनी, २१ ऑगस्ट रोजी होणारा मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही ती जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नाही. लोकांना काय वाटते ते आम्ही या मोर्चाद्वारे सांगणार आहोत असे सांगितले. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोतच पण भाजप-शिवसेनेही या आंदोलनात यायला पाहिजे असे ते म्हणाले. पारदर्शक निवडणुकांसाठी आम्ही सर्व मतदारांना एक फॉर्म देणार असून तो महाराष्ट्रातल्या घराघरात जाईल, त्या फॉर्मवर मतदाराचे नाव, सही असेल व बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी फॉर्मवर मागणी केली असेल. २१ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या सर्व पक्षीय मोर्चात हे फॉर्म निवडणूक आयोगाकडे दिले जातील असे राज ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी हे आंदोलन लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी आवश्यक असून ईव्हीएमवरून जनतेत संभ्रम आहे ही भावना लोकशाहीसाठी पोषक नसल्याचे मत प्रकट केले.  सर्व जनतेने या आंदोलनात सहभाग अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर राजू शेट्‌टी यांनी २१ ऑगस्टला होणारा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून तो सर्वसामान्य मतदारांचा, जनतेचा असेल. त्यामध्ये सर्वांनी मोठ्या ताकदीने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर १५ ऑगस्टमध्ये प्रत्येक गावात गावसभा होत असते. या गावसभेत ईव्हीएमच्या विरोधात ठराव करावा व तो २१ ऑगस्टच्या आंदोलनात घेऊन यावा असे ग्रामीण मतदारांना त्यांनी आवाहन केले.

छगन भुजबळ यांनी या सर्वपक्षीय आंदोलनामागे राज ठाकरे यांच्या प्रयत्नांबद्दल प्रशंसा व्यक्त करत ज्या देशांनी ईव्हीएमची निर्मिती केली त्या देशांनीच ही पद्धत बाजूला ठेवल्याचे सांगितले. भुजबळ यांनी मोदींवर ‘सबका विश्वास’ या घोषवाक्यावर निशाणा साधत मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी मतपत्रिकेवर का निवडणूका घेत नाही असा सवाल केला. तुम्ही निवडून येणार आहेत व तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे तर लोक तुम्हाला पुन्हा निवडून देतील. तुम्हाला बॅलेट पेपरला घाबरण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: