इंटरनेट बंद झाल्याने काश्मीरमधील मीडियाची कोंडी

इंटरनेट बंद झाल्याने काश्मीरमधील मीडियाची कोंडी

श्रीनगर : या हिवाळ्यातील पहिला हिमवर्षाव काश्मीर खोऱ्याने अनुभवला पण या पहिल्याच हिमवर्षावाने येथील मीडिया फॅसिलिटेशन सेंटरमधील इंटरनेट फायबर तुटल्यान

महिला अत्याचार सर्वाधिक प्रकरणे भाजप खासदारांच्या विरुद्ध
मोदींची उघडलेली मूठ…अर्थात संघ काय करणार?
मोदी सरकारची १० लाख रोजगार देणारी अग्निपथ योजना

श्रीनगर : या हिवाळ्यातील पहिला हिमवर्षाव काश्मीर खोऱ्याने अनुभवला पण या पहिल्याच हिमवर्षावाने येथील मीडिया फॅसिलिटेशन सेंटरमधील इंटरनेट फायबर तुटल्याने काश्मीरमधील घडामोडी जगाला कळवण्यात पत्रकारांना समोर आव्हान उभे राहिले. अगोदरच इंटरनेटवर बंदी असल्याने काश्मीरमधील वृत्तपत्रांना माहितीच देता येत नव्हती आता त्यात मीडिया सेंटरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. गेले कित्येक दिवस पत्रकारच नव्हे समाजातील सर्व थरातून काश्मीरमध्ये मोबाईल फोर जी इंटरनेट सेवा सुरू करावी असा सरकारकडे सातत्याने आग्रह सुरू आहे. पण सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. आता ज्या ब्रॉडबँड सेवेचा फायदा पत्रकारांना होत होता तोही गुरुवारी पहिल्या हिमवृष्टीमुळे बंद झाला आहे.

या तांत्रिक अडचणीमुळे पत्रकार आपली बातमी आपल्या संबंधित वर्तमानपत्रांना पाठवू शकत नाहीत. ईमेलवर आलेली एखादी माहिती पत्रकार डाउनलोड करू शकत नाहीत. जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून जी माहिती प्रसारमाध्यमांना दिली जात असते ती माहितीही सरकारला पाठवता येत नाही. त्यामुळे सर्व व्यवस्थाच ठप्प झाल्यासारखी आहे.

गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास अचानक इंटरनेट बंद झाले आणि सगळीकडे अस्वस्थता पसरली. खोऱ्यातल्या बातम्यांची देवाणघेवाण एकदम बंद झाली. विविध ठिकाणाहून आलेली छायाचित्रे, व्हिडिओही पाठवता येत नव्हते. बातमीचे टंकनही करूनही ती पाठवता येत नसल्याने अनेक पत्रकार हताश झालेले दिसत होते. त्यामुळे केवळ फोनच्या माध्यमातून ते आपल्या संबंधित कार्यालयाला फोन करून नेमक्या काय घटना घडल्या आहेत हे सांगताना दिसत होते. पण व्हिडिओ जर्नालिस्ट व छायाचित्रकारांना त्याचीही सोय नव्हती. त्यामुळे खोऱ्यातील काही वर्तमानपत्रे शुक्रवारी प्रकाशित होऊ शकली नाहीत. काही वर्तमानपत्रांना आपल्या पानांची संख्या कमी करावी लागली. काही राष्ट्रीय वृत्तपत्रांनाही या इंटरनेट बंदचा फटका बसला.

काश्मीरमधल्या पहिल्या बर्फवृष्टीने अनेक पत्रकार मीडिया सेंटरमध्येही पोहचू शकले नाहीत. साधारण दिवसभरातल्या बातम्या गोळ्या करून पत्रकार संध्याकाळी सहाच्या सुमारास सेंटरमध्ये येत असतात. पण गुरुवारी तसे झाले नाही. अचानक इंटरनेट बंद झाल्यानंतर अनेक पत्रकारांनी इंटरनेट प्रोव्हायडरला फोन करून माहिती मिळवली. पण इंटरनेटची फायबर लाइन तुटल्याने ती किती दिवसांनी दुरुस्त होईल हे सांगण्यास आपण असमर्थ असल्याची उत्तरे मिळाल्याने हताश होण्याशिवाय पर्याय नव्हता अशी प्रतिक्रिया ‘काश्मीर लाइफ’चे पत्रकार ताहीर भट यांची होती.

मीडिया फॅसिलिटेशन सेंटरच्या जे प्रमुख आहेत त्यांनी इंटरनेटची लिझ लाइन तुटल्यामुळे इंटरनेट बंद झाल्याचे सांगितले आहे पण सरकारने पर्यायी सोय करण्याची गरज असल्याचेही भट यांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यापासून काश्मीर इंटरनेटबंदीचा सामना करत आहे. सरकारला इंटरनेट बंद असल्याने त्याच्या जनजीवनावर काय परिणाम होतोय याची माहिती आहे. सर्व व्यवसाय इंटरनेट बंद असल्याने ठप्प झाल्याचे दिसत असताना सरकारने अन्य मार्गाने इंटरनेट सेवा सुरू ठेवण्याचा का विचार केला नाही असा सवाल भट यांचा आहे. आम्ही पत्रकार बातम्या मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. माहिती मिळत नसल्याने त्याचा लोकांच्या जगण्यावर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत मीडियासमोरच्या समस्या सरकारने समजून घ्याव्यात अशी आमची अपेक्षा असल्याचे भट सांगत होते.

श्रीनगरमधील मीडिया फॅसिलिटेशन सेंटरमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली तेव्हा माध्यमांनी थोडा सुस्कारा टाकला होता आणि आहे त्या अडचणींचा सामना करत पत्रकार आपल्या बातम्या जनतेपर्यंत पोहचवत होते. पण प्रत्येक पत्रकाराला मीडिया सेंटरवर जाऊन बातमी करता येते असेही नसते. कारण या सेंटरमध्ये इंटरनेट मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. प्रत्येक पत्रकाराला काही मिनिटेच बातमी करण्यासाठी इंटरनेट मिळते. त्यामुळे आपल्या डेडलाइन अनेकांना सोडाव्या लागतात. रोज आपल्या बातम्या फोनवरून ऑफिसला सांगणे शक्य नसते. अशा परिस्थितीत इंटरनेटच बंद झाल्याने काम करणार कसे असा सवाल बीबीसी व रॉयटर्ससाठी काम करणारे पत्रकार युसुफ जमील यांचा आहे. तर ‘स्क्रोल’चे पत्रकार सफात झरगर म्हणतात, काश्मीरी पत्रकारांचा कोणी वालीच नाही. झरगर काश्मीर प्रशासनातील बेजबाबदारपणाला अंगुलीनिर्देश करतात. ‘हिमवृष्टी होणार याची माहिती प्रशासनाला असते पण त्याच्या अगोदर खबरदारीचे, आपतकालिन उपाय करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. प्रशासनाने रस्तेही मोकळे केलेले नाही. लाल चौकात एक मोठा चिनार वृक्ष पडला तो अद्याप बाजूलाही केलेला नाही,’ असे झरगर सांगतात.

शहरातील मीडिया फॅसिलिटेशन सेंटर यापूर्वी अनेकदा चर्चेत आले आहे. कारण या सेंटरमध्ये अधिस्वीकृती असलेल्याच पत्रकारांना इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी आहे. त्यावर अनेक स्थानिक, मुक्त पत्रकार नाराज आहेत. त्यात या सेंटरमध्ये अन्य राज्यांच्या अधिस्वीकृती धारक पत्रकारांनाही इंटरनेट वापरण्याची परवानगी नसल्याने देशभरातून परदेशातून आलेल्या पत्रकारांपुढे काश्मीरमधल्या घडामोडींचे वृत्तांकन कसे करायचे हा मोठा गहन प्रश्न आहे. काश्मीरमध्ये फोर जी इंटरनेट सेवा नसल्याने मोबाइल इंटरनेट, डेटा कार्डचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे फोनवरून बातमी देणे हा एकमेव पर्याय आहे पण या पर्यायाने प्रश्नच सुटू शकत नाही. तरीही या समस्येवर सरकारने तोडगा काढलेला नाही.

पल्लवी सरीन, या जम्मू-काश्मीरस्थित ‘स्ट्रेट लाइन’च्या मुख्य संपादक आहेत. त्यांचा इमेल : [email protected].

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0