अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर

अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर

मुंबई: राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान
कोकणसह प. महाराष्ट्राला लवकरच आर्थिक मदत
राज्यात अतिवृष्टीग्रस्तांना मदत

मुंबई: राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत अवजड वाहनाच्या एकेरी वाहतुकीसाठी सुरू राहणार असून, सायंकाळी ०७ वा. ते सकाळी ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सध्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून, नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. तसेच लष्कराचे ०१ पथक, एनडीआरएफचे ०१ पथक, एसडीआरएफचे ०१ पथक व स्थानिक पथकाच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यात जिल्ह्याची सद्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. 

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १६ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, चंद्रपूर-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली-१, चंद्रपूर-१ अशा एकूण  तीन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून गुरुवारी सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0