मिलिंद तेलतुंबडे ठार

मिलिंद तेलतुंबडे ठार

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांच्या  चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये नक्षलवादी नेता मोस्ट वॉंटेड मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

झारखंडचे मुक्त पत्रकार रुपेश कुमारवर आणखी २ फिर्यादी
आत्मसमर्पण नक्षलवाद्यांना आयटीआयमध्ये राखीव जागा
मोस्ट वाँटेड माओवादी प्रशांत बोसला अटक

शनिवारी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोटगुल-ग्यारापत्ती जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांचे ‘सी-६०’ पथक यांच्यामध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये २६ नक्षलवादी ठार झाले आणि ४ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत मोस्ट वॉंटेड नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला आहे. गडचिरोली पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर भीमा-कोरेगाव दंगलीच्या काटाचा सूत्रधार म्हणून आरोप ठेवला असून, त्याला पकडून देणाऱ्यास ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मिलिंद तेलतुंबडे अनेक वर्षांपासून भूमिगत होता. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. १९८९-९० च्या सुमारास त्याने चंद्रपूरमधून त्याने कामला सुरुवात केली होती. अगोदर त्याने अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेत काम केले. एका कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो भूमिगत झाला. तो नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य होतं. महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड विभागीय समितीचा प्रमुख म्हणूनही तो कार्यरत होता. १ मे २०१९ रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. नक्षलवादी चळवळ शहरी भागात वाढविण्यात त्याचा सहभाग होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा अनेक नावांनी तो वावरत होता.

जंगलामध्ये सुमारे चार तास चकमक सुरू होती. चकमकीत ४ पोलीस जखमी झाले असून, त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

‘सी-६०’ पोलीस पथक शनिवारी दल’ नक्षलविरोधी मोहीम राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ‘सी-६०’ पथकाने शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. त्याच वेळी लपलेल्या नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यांना पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. चकमक तीन ते चार तास सुरू होती. नंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. चकमकीनंतर अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. या मोहिमेत दुपारपर्यंत नक्षलवाद्यांचे १२  मृतदेह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर जंगलात शोध घेऊन नक्षलवाद्यांचे आणखी १४ मृतदेह आढळले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0